अमर्त्यत्वाचा शोध २३
मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०७
पहिली लढाई लढायची तीच मुळात भीषण असते; सामूहिक सूचनेच्या विरोधात ही मानसिक लढाई असते. प्रकृतीच्या अजूनपर्यंत निरपवाद भासणाऱ्या एका नियमावर आधारित, हजारो वर्षांच्या अनुभवांवर आधारित अशा प्रचंड आणि दबाव टाकणाऱ्या, सक्ती करणाऱ्या सामूहिक सूचनेविरुद्ध ही लढाई असते. “मृत्यू हा कायमचाच आहे, तो वेगळा असा काही असूच शकत नाही; मृत्यू अटळ आहे आणि तो काहीतरी वेगळा असू शकतो अशी आशा बाळगणे म्हणजे वेडेपणा आहे,’’ अशा एका हटवादी विधानामध्ये ती सामूहिक सूचना स्वतःला अनुवादित करते. आणि याबाबतीत सर्वांचे एकमत असते आणि आजवर एखाद्या अत्यंत प्रगत अभ्यासकानेदेखील याला विसंवादी सूर लावल्याचे म्हणजे भविष्याबद्दल आशा बाळगण्याचा सूर लावल्याचे धाडस केलेले दिसत नाही. बऱ्याचशा धर्मांनी तर मृत्युच्या वास्तवावरच स्वतःच्या कार्याची शक्ती आधारित केली आहे. आणि देवाने माणसाला नश्वर बनविलेले आहे त्यामुळे माणूस मृत पावावा हेच त्याला अपेक्षित आहे असे प्रतिपादन ते धर्म करतात. त्यातील अनेक धर्मांनी मृत्युकडे एक सुटका म्हणून, मुक्ती म्हणून आणि कधीकधी तर बक्षीस म्हणूनदेखील पाहिले आहे. त्यांचा असा आदेश असतो की, “सर्वोच्चाच्या इच्छेला शरण जा, कोणतेही बंड न करता, मृत्युची संकल्पना स्वीकारा म्हणजे मग तुम्हाला शांती आणि आनंद लाभेल.’’ हे सारे असे असतानादेखील, विचलित न होणारा संकल्प तसाच टिकून राहावा यासाठी मनाने स्वत:चा दृढ विश्वास अविचल राखला पाहिजे. अर्थात ज्याने मृत्युवर विजय मिळविण्याचा निश्चय केला आहे त्याच्यावर या सगळ्या सूचनांचा कोणताही परिणाम होत नाही आणि प्रगल्भ साक्षात्कारावर आधारित असलेल्या त्याच्या दृढ विश्वासावर याचा कोणताही परिणाम होऊ शकतही नाही. (क्रमश:)
– श्रीमाताजी
(CWM 12 : 85)
- स्वत:ला न फसविणे अवघड - March 16, 2026
- प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन - March 15, 2026
- द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४ - March 14, 2026






