वासनामुक्तीची प्रामाणिक आस

 

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

श्रीमाताजींच्या दिशेने अभिमुख झालेले असणे आणि त्यांना आवाहन करणे हे ठीक आहे. पण आणखी काहीतरी गरजेचे आहे. कारण ती फक्त पहिली आवश्यक गोष्ट आहे. साधकाने संपूर्ण आत्मदान केले पाहिजे आणि समर्पित असले पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्ही मनमानी करत राहणे हे काही योग्य नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर, अन्नग्रहण वर्ज्य करणे हा वासनांपासून सुटका करून घेण्याचा योग्य मार्ग आहे, ही तुमची संकल्पना अशीच आहे. तुमची ही संकल्पना हास्यास्पद आहे कारण एखादी व्यक्ती उपासतापास करत असूनही, वासनामय जीवन जगणारी असू शकते. श्रीमाताजी आणि मी अशा रितीने स्वतःची उपासमार करण्यास संमती देत नाही, हे तुम्हाला चांगले माहीत आहे आणि असे असूनही तुम्ही एखादी संधी मिळण्याचा अवकाश, तसेच वागू इच्छिता. या व यासारख्या उदाहरणांमध्ये दिसून येतात त्याप्रमाणे, तुमच्या ज्या काही कल्पना असतील त्या तुम्ही सोडून दिल्या पाहिजेत.

इच्छा-वासनांच्या बाबतीत सांगायचे झाले तर, त्या वासनांपासून सुटका व्हावी अशी प्रामाणिक आस बाळगणे आणि श्रीमाताजींच्या शक्तीने तुमच्यामध्ये कार्य करावे म्हणून त्यांना आवाहन करणे, हा योग्य मार्ग आहे. श्रीमाताजींचा प्रकाश आणि त्यांची शक्ती जेव्हा तुमच्यामध्ये कार्य करू लागेल तेव्हा ती शक्ती व तो प्रकाशच तुम्हाला तुमच्यामध्ये काय बदल घडवणे आवश्यक आहेत ते दाखवून देतील आणि तुम्ही जर त्यास प्रामाणिकपणाने, पूर्ण सहमती दिलीत तर तसे परिवर्तन ती शक्ती आणि तो प्रकाश तुमच्यामध्ये घडवून आणेल.

• श्रीअरविंद (CWSA 32 : 393)

श्रीअरविंद
Latest posts by श्रीअरविंद (see all)