दृढ निश्चयातून बदल

 

(बदलाची इच्छा असणाऱ्या व्यक्तीमध्ये, बदलास नाखूष असणारा एक घटक कसा दडलेला असतो हे श्रीमाताजींनी सांगितले आहे. ते आपण कालच्या भागात पाहिले.)

तुमची अभीप्सा जेव्हा क्षीण होते, प्रयत्न मंदावतात तेव्हा तुमच्यामधील बदलास नाखूष असणारा हा घटक गाजावाजा न करता पण पटकन उसळी मारून वर येतो. तो त्याची इच्छा तुमच्यावर लादू पाहतो आणि तुम्हाला जे करायचे नसते नेमके तेच करायला तो तुम्हाला भाग पाडतो. तुम्ही अमुक एक गोष्ट करायची नाही असे ठरविलेले असते पण तुमच्याही नकळत, तुम्ही ती गोष्ट करून मोकळे झालेला असता. असे का झाले, कसे झाले याची तुम्हाला अजिबात कल्पना येत नाही. हे असे घडलेले असते कारण तो घटक तिथे असतो. आणि त्याची वेळ आता आलेली असते. गोष्टी छोट्या असू देत किंवा मोठ्या असू देत, तपशिलाचा भाग असू दे किंवा जीवनाची दिशा ठरविणे असू दे, या सर्व बाबतीत या घटकाची वेळ कधी ना कधी येतच असते.

अशी अनेक माणसं असतात, त्यांना स्वतःमध्ये काय बदल केला पाहिजे हे नेमकेपणाने माहीत असते, पण तरीसुद्धा त्यांना असे वाटत असते की, नाही, तो बदल ते करू शकणार नाहीत. पण असे का वाटत असते, याचे कारण मात्र त्यांना माहीत नसते. पण दुसरेतिसरे काही नसून, हा घटक हेच ते कारण असते. बदल करण्यास नाखूष असणारा हा असा छोटासा भाग असतो आणि तो त्याला संधी मिळण्याची वाट पाहत बसलेला असतो.

आणि मग त्याला संधी मिळण्याचा अवकाश! मग ती संधी तुमच्या ढिलाईमुळे असो, थकव्यामुळे असो, किंवा निद्रानाशामुळे असो, किंवा काहीशा कंटाळ्यामुळे असो, त्या घटकाला डोकं वर काढण्याची संधी तुम्ही दिलीत की मग तो घटक त्याच्या पूर्ण ताकदीनिशी, अगदी एकवटून उफाळून वर येतो आणि तुम्ही जे करायचे ठरविलेले असते त्याच्या अगदी विरूद्ध असे तो तुम्हाला बोलायला, वागायला भाग पाडतो. आणि मग तुम्हाला असे वाटायला लागते की, “छे, हे किती नाउमेद करणारे आहे!” आणि मग काही लोकं विचार करायला लागतात की, “काय करणार, माझं नशीबच फुटकं आहे.” पण हे काही त्यांचे नशीब नसते, तर ते स्वतःच त्याला जबाबदार असतात.

लक्षात घ्या की, त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या शोधविजेरीचा (searchlight), प्रकाशाचा उपयोग केलेला नसतो. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या छोट्याछोट्या कानाकोपऱ्यात विजेरीचा प्रकाश टाकून पाहिलेले नसते, तिथे सांदीकोपऱ्यात काय दडलेले आहे हे त्यांनी पाहिलेले नसते. ती गोष्ट त्यांनी तिथे तशीच पडीक ठेवलेली असते आणि ती गोष्ट दृष्टीस पडू नये म्हणून त्यांनी स्वतः तिच्याकडे जणू पाठ फिरवलेली असते. असे कितीदा तरी घडते की व्यक्तीला आता काहीतरी (म्हणजे तो घटक) हाती लागणार असते. पण ती गोष्ट तिला दुखावणारी असते, त्रासदायक असते.. मग अशा वेळी ती गोष्ट चिमटीत पकडण्याऐवजी व्यक्ती दुसरीकडेच आपला मोहरा वळवते. आणि मग काय होते तर, प्रगती करण्याची ती संधी तुम्ही दवडलेली असते.

आणि मग त्या गोष्टीची शेपूट पकडून तिला बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी किंवा तिचे कान उपटण्यासाठी तुम्हाला बराच काळ वाट पाहावी लागते, त्यापूर्वी पुन्हा काही चुका घडतात. तेव्हा कुठे एकदा तुमच्या पकडीत ती गोष्ट येते आणि मग तुम्ही म्हणता, “नाही. आता तू माझ्यापासून लपून राहू शकत नाहीस. तू जशी आहेस तशी मला तू स्पष्टपणे दिसत आहेस, आता एकतर तुला माझ्यामधून बाहेर पडावे लागेल नाहीतर तुला स्वतःमध्ये बदल तरी करावा लागेल.” पण हे असं सारं करण्यासाठी, व्यक्तीची स्वतःवर मजबूत पकड हवी आणि तिच्यापाशी अविचल दृढ निश्चय असला पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 06 : 243-244)

श्रीमाताजी