अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३
आपल्या ‘मी’ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये खरी विनम्रता सामावलेली असते.
*
विनम्र असणे म्हणजे, ईश्वराविना आपल्याला काहीच कळत नाही, आपण कोणीच नाही आणि त्याविना आपण काहीही करू शकत नाही हे मन, प्राण आणि शरीर यांनी कधीही न विसरणे. ईश्वराविना आपण अक्षम आहोत, आपण म्हणजे जणू अज्ञान व गोंधळ आाहोत; आपण कोणीच नाही हे आपल्या मन, प्राण आणि शरीर यांनी कधीही न विसरणे म्हणजे विनम्र असणे. केवळ ईश्वर हाच सत्य असतो. तोच जीवन, शक्ती, प्रेम आणि आनंद असतो.
आणि म्हणून, मन, प्राण व शरीर यांनी एकदाच आणि कायमसाठी हे शिकले पाहिजे, अनुभवले पाहिजे की, ईश्वराला समजून घेण्यास आणि त्याचे मूल्यमापन करण्यास ते (मन, प्राण आणि शरीर) सर्वथा अक्षम आहेत; ईश्वराच्या केवळ सारतत्त्वाला जाणून घेण्यात नव्हे तर, त्याला त्याच्या कृतीमध्ये आणि आविष्करणामध्ये जाणून घेण्यातही ते अक्षम आहेत, (याची त्यांना जाणीव असणे) हीच खरी विनम्रता होय. या विनम्रतेसोबत अविचलता आणि शांती येते. सर्व विरोधी हल्ल्यांपासून संरक्षण करणारे खात्रीशीर चिलखत हेच असते.
खरंच, शत्रू नेहमी मनुष्यामधील गर्वाचे दारच ठोठावत राहतो, कारण हे गर्वाचे दारच शत्रुला आत शिरकाव करण्याची संधी देते.
– श्रीमाताजी (CWM 14 : 152-153)
- स्वत:ला न फसविणे अवघड - March 16, 2026
- प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन - March 15, 2026
- द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४ - March 14, 2026





