अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – ०४
लोक तुमच्याविषयी द्वेषपूर्ण उद्गार काढतात, तुम्हाला मूर्खात काढतात त्यामुळे तुम्ही जर चिंताग्रस्त झालात, दुःखी झालात किंवा नाउमेद झालात तर तुम्ही (योग)मार्गावर फार प्रगत होऊ शकणार नाही. अशा गोष्टी तुमच्या वाट्याला येतात याचे कारण तुम्ही दुर्दैवी आहात किंवा तुमच्या नशीबातच सुख नाही असे मुळीच नाही; तर उलट दिव्य चेतनेने व दिव्य कृपेने तुमचा संकल्प गांभीर्याने घेतला आहे असा त्याचा अर्थ होतो. तुमचा निश्चय किती प्रामाणिक आहे, मार्गातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही खंबीर आहात का, याची पारख करण्यासाठी, तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा कसोटीच्या दगडाप्रमाणे (सोन्याची पारख करण्याचा सोनाराकडे असणारा कसोटीचा दगड) दिव्य चेतनेकडून व दिव्य कृपेकडून वापर केला जात असतो, हे त्यामागचे खरे कारण असते.
म्हणून जर कोणी तुमचा उपहास केला किंवा कोणी तुमच्याविषयी निंदाजनक शब्द उच्चारले तर, तुमच्या खऱ्या गुणांची लोकांना कदरच नाही असे वाटून तुम्ही उदास, संतप्त किंवा उद्विग्नही होता कामा नये. उलट, अशावेळी पहिली गोष्ट तुम्ही केली पाहिजे ती अशी की, तुमच्यातील कोणत्या दुर्बलतेमुळे वा कोणत्या अपूर्णतेमुळे तुमच्याविषयी तसे उद्गार काढले गेले ते तुम्ही अंतर्मुख होऊन पाहिले पाहिजे. एवढेच नव्हे तर, तुमच्यातील कोणता दोष, कोणती दुर्बलता वा कोणती विकृती तुम्ही दुरुस्त केली पाहिजे हे दाखवून दिल्याबद्दल, तुम्ही दिव्य कृपेविषयी कृतज्ञ असले पाहिजे. दुःखीकष्टी होण्याऐवजी, तुम्ही पूर्णपणे समाधानी झाले पाहिजे आणि तुमचे अहित व्हावे असा जो तुमच्या निंदकांचा हेतू होता, त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ करून घेतला पाहिजे.
– श्रीमाताजी (CWM 03 : 282)
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७ - January 29, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६ - January 28, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४ - January 26, 2026







