अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – ०२
(पूर्वार्ध)
जीवनामध्ये कित्येक वेळा एक प्रकारचे रिकामपण जाणवते, कधी एखादा रिकामा क्षण किंवा काही मिनिटे किंवा कधीकधी त्याहूनही अधिक वेळ मिळतो. अशा वेळी तुम्ही काय करता? तुम्ही स्वतःचे लक्ष लगेचच दुसरीकडे कोठेतरी वळविण्याचा प्रयत्न करता आणि वेळ जाण्यासाठी मूर्खपणाच्या या नाही तर त्या गोष्टी शोधून काढता. ही गोष्ट सर्वत्र दिसून येते. लहानमोठे सारेच जण कंटाळा येऊ नये म्हणून, काही ना काही तरी करत राहण्यात वेळ घालवितात. कंटाळा या गोष्टीचा त्यांना सर्वात जास्त तिटकारा असतो आणि मूर्खपणाच्या गोष्टी करत राहणे हा त्यांचा, त्या कंटाळ्यापासून सुटका करून घेण्याचा मार्ग असतो.
पण कंटाळ्यापासून सुटका करून घेण्याचा एक अधिक चांगला मार्ग आहे. तो म्हणजे पुढील गोष्टी लक्षात ठेवायच्या – जेव्हा तुम्हाला थोडा रिकामा वेळ मिळतो, एक तास असो किंवा काही मिनिटे असोत, तेव्हा स्वतःला सांगा, “निदान आता तरी मला काही वेळ एकाग्र होण्यासाठी, विखुरलेल्या ‘मी’चे एकत्रीकरण करण्यासाठी, जीवनाचे उद्दिष्ट पुनर्जीवित करण्यासाठी, सत्य आणि शाश्वत यांच्याप्रत स्वतःला समर्पित करण्यासाठी मिळाला आहे. (तो वेळ मी व्यर्थ दवडता कामा नये.)’’
तुम्ही जेव्हा बाह्य परिस्थितीने गांजलेले नसता तेव्हा, त्या प्रत्येक वेळी तुम्ही जर मी आत्ता सांगितले त्याप्रमाणे केलेत तर, तुम्ही (योग)मार्गावर वेगाने प्रगती करत आहात, असे तुम्हाला आढळेल. वायफळ गप्पांमध्ये, निरुपयोगी गोष्टींमध्ये किंवा तुमची चेतना ज्यामुळे निम्न पातळीवर उतरते अशा गोष्टींचे वाचन करण्यामध्ये तुमचा वेळ घालविण्यापेक्षा किंवा तुम्हाला विचलित करणाऱ्या इतर सर्व गोष्टींमध्ये वेळ घालविण्यापेक्षा, वर सांगितलेल्या गोष्टींसाठी म्हणजेच योग्य कारणांसाठी वेळ व्यतीत करणे अधिक उत्तम…
(उत्तरार्ध उद्या…)
– श्रीमाताजी (CWM 03 : 250)
- प्रामाणिकपणा हेच तुमचे एकमेव संरक्षण - February 17, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – ३० - February 14, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – २९ - February 13, 2026






