अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – ०१

तुम्ही जर सरळ मार्गाचा अवलंब करू पाहात असाल, तुम्ही विनम्र असाल, तुम्ही विशुद्धतेसाठी प्रयत्नशील असाल, तुम्ही जर निरपेक्ष असाल, तुम्हाला एकांतवासाचे जीवन जगायचे असेल, तुम्हाला विवेकपूर्ण जीवन जगायचे असेल तर त्यामुळे तुमचा मार्ग सुकर होईल, गोष्टी सोप्या होतील या भ्रमात तुम्ही राहता कामा नये…

खरेतर परिस्थिती याच्या अगदी उलट असते. जेव्हा तुम्ही आंतरिक व बाह्य पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागता, त्यावेळी एकदम सर्व अडचणी यायला सुरुवात होते. मी अनेकदा लोकांना असे बोलताना ऐकले आहे की, “काय हे? मी आत्ता जरा कुठे चांगले वागायचा प्रयत्न करतो आहे तर, प्रत्येकजण माझ्याशी वाईटच वागतोय.” पण हे असे का घडते? तर, चांगले वागताना तुम्ही कोणताही अंतःस्थ हेतू ठेवू नये, ही शिकवण तुम्हाला देण्यासाठीच ते घडत असते. म्हणजे असे की, इतरांनी तुमच्याशी चांगले वागावे म्हणून केवळ तुम्ही त्यांच्याशी चांगले वागायचे, असे नाही तर, व्यक्तीने चांगल्यासाठीच चांगले वागले पाहिजे. नेहमीसाठी तोच धडा आहे.

व्यक्तीने जितके काही चांगले, उत्तम करता येईल तेवढे करावे, परंतु फळाची अपेक्षा बाळगू नये, परिणाम दिसावेत म्हणून काही करू नये. म्हणजे, कोणत्यातरी बक्षिसाची अपेक्षा बाळगून सत्कृत्य करायचे, जीवन सुखकर व्हावे म्हणून चांगले वागायचे, असे करू नये. कारण या अशा दृष्टिकोनामुळे सत्कार्याचे मोलच नाहीसे होऊन जाते. चांगुलपणाबद्दलच्या प्रेमापोटीच तुम्ही चांगले असले पाहिजे, न्यायाच्या प्रेमापोटीच तुम्ही न्यायी असले पाहिजे; पावित्र्याच्या, शुद्धतेच्या प्रेमापोटीच तुम्ही पवित्र व शुद्ध असले पाहिजे आणि निरपेक्षतेवर असणाऱ्या प्रेमापोटीच तुम्ही निरपेक्ष असले पाहिजे, तरच तुम्ही (योग)मार्गावर प्रगत होण्याची खात्री बाळगू शकता.

– श्रीमाताजी (CWM 03 : 264-265)

श्रीमाताजी