पूर्णयोगाचे अधिष्ठान – ७५

आंतरिक आध्यात्मिक प्रगती ही बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते, तर बाह्य परिस्थितीला आपण अंतरंगातून कशी प्रतिक्रिया देतो यावर ती अवलंबून असते. आध्यात्मिक अनुभवाचा तो नेहमीच अंतिम निष्कर्ष राहिलेला आहे. आणि म्हणूनच योग्य दृष्टिकोन बाळगण्यावर आणि त्यात सातत्य राखण्यावर आम्ही इतका भर देत असतो; बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसणाऱ्या आंतरिक स्थितीवर म्हणजे समतेच्या आणि स्थिरतेच्या स्थितीवर आम्ही भर देत असतो. आंतरिक आनंदाची स्थिती एकाएकी येऊ शकणार नाही पण, जीवनातील धक्के व आघात यांच्या नेहमीच अधीन असणाऱ्या पृष्ठवर्ती मनामध्ये राहण्यापेक्षा, अंतरंगात अधिकाधिक प्रवेश करून, तेथून जीवनाकडे पाहण्यावर आमचा भर असतो. या आंतरिक स्थितीमुळेच व्यक्ती जीवन आणि त्याच्या अस्वस्थकारी शक्तींपेक्षा अधिक शक्तिशाली बनू शकते आणि विजय प्राप्त करण्याची थोडीफार तरी आशा बाळगू शकते.

अंतरंगामध्ये अविचल (quiet) राहणे, अडीअडचणी किंवा चढउतार यांमुळे अस्वस्थ किंवा नाउमेद होण्यास नकार देऊन, त्यामधून सहीसलामत पार होण्याचा दृढ संकल्प बाळगणे, या योगमार्गावरील शिकण्यायोग्य गोष्टींपैकी काही प्रारंभिक गोष्टी आहेत.

या व्यतिरिक्त अन्य काही करणे म्हणजे चेतनेच्या अस्थिरतेस प्रोत्साहन देण्यासारखे आहे, परंतु तुम्ही अंतरंगामध्ये स्थिर आणि अविचल राहू शकलात तर मग, अनुभवांचा प्रवाह काहीशा स्थिरपणाने वाहू लागेल. अर्थात या वाटचालीमध्ये व्यत्यय आणि चढउतार येणारच नाहीत, असे नाही. परंतु या गोष्टी योग्य रितीने हाताळल्या गेल्या तर, या कालावधीमध्ये साधनाच झाली नाही, असे होत नाही. तर हाच कालावधी अडचणी संपुष्टात येऊन, आधी आलेले अनुभव पचवण्यासाठीचा कालावधी ठरू शकतो.

बाह्य परिस्थितीपेक्षा आध्यात्मिक वातावरण हे नेहमीच अधिक महत्त्वाचे असते. साधकाला जर ते प्राप्त होऊ शकले आणि तो स्वतः ज्यामध्ये श्वास घेऊ शकेल व ज्यामध्ये जीवन जगू शकेल असे स्वतःचे आध्यात्मिक वातावरण साधक स्वत: तयार करू शकेल तर, ती परिस्थिती प्रगतीसाठी खरी सुयोग्य परिस्थिती असेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 140)

(आज ही मालिका समाप्त होत आहे.)

श्रीअरविंद