पूर्णयोगाचे अधिष्ठान – ५६

मन किंवा प्राण हे जेव्हा विचारांमुळे आणि भावनांमुळे त्रस्त झालेले नसतात, अस्वस्थ नसतात किंवा ते विचार व भावनांमध्ये गुंतून पडलेले नसतात, तसेच जेव्हा त्यांच्यामध्ये विचार व भावनांचा कल्लोळ नसतो, तेव्हा तेथे ‘अविचलता’ (Quietness) असते. प्रामुख्याने मन जर अलिप्त असेल आणि विचार व भावनांकडे ते पृष्ठवर्तीय गतीविधी म्हणून पाहत असेल तर, ‘मन अविचल आहे’ असे आपण म्हणतो. तसेच प्राणाबाबतही म्हणता येते.

अस्वस्थतेचा तसेच अस्वस्थपणे केलेल्या हालचालींचा किंवा अशांततेचा अभाव असणे म्हणजेच स्थिरता (Calmness) नव्हे, तर स्थिरता ही त्याहूनही एक अधिक सकारात्मक अवस्था असते.

कोणतीही गोष्ट जिला अशांत करत नाही किंवा करू शकत नाही अशी महान आणि सघन प्रशांतता असल्याची सुस्पष्ट जाणीव जेव्हा मनाला किंवा प्राणाला असते; तेव्हा आपण म्हणतो की, तेथे ‘स्थिरता‌’ प्रस्थापित झालेली आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 137-138)

श्रीअरविंद