पूर्णयोगाचे अधिष्ठान – १२

योगसाधनेचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग असतो ज्ञानाचा व व्यक्तीच्या स्वत:च्या प्रयत्नांचा आणि दुसरा मार्ग असतो श्रीमाताजींवर भिस्त ठेवण्याचा. या दुसऱ्या मार्गामध्ये, श्रीमाताजींच्या शक्तीने आपल्यावर कार्य करावे म्हणून, व्यक्तीने आपले मन व हृदय आणि सर्वकाही श्रीमाताजींना अर्पण करणे अभिप्रेत असते तसेच सर्व अडीअडचणींच्या वेळी त्यांना आवाहन करणे आणि त्यांच्यावर श्रद्धा व भक्ती ठेवणे अभिप्रेत असते.

चेतनेची ही अशी तयारी होण्यासाठी सुरुवातीला वेळ लागतो, बरेचदा खूप काळ लागतो आणि त्या दरम्यान पुष्कळ अडचणी येऊ शकतात. परंतु व्यक्तीने प्रयत्नसातत्य ठेवले तर एक वेळ अशी येते की, जेव्हा सर्व तयारी झालेली असते, अशा वेळी ‘श्रीमाताजींची शक्ती‌’ व्यक्तीच्या चेतनेला पूर्णत: ईश्वराभिमुख करते. अशा वेळी, जे जे काही विकसित होणे आवश्यक असते ते ते सारे व्यक्तीच्या अंतरंगामध्ये विकसित होते, आध्यात्मिक अनुभूती येतात आणि त्यासोबतच ज्ञान येते आणि ईश्वराशी ऐक्य घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 200)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ११

व्यक्ती ईश्वरी प्रभावाप्रत स्वतःला खुली करू शकते की नाही यावरच पूर्णयोगामध्ये सर्व काही अवलंबून असते. अभीप्सेमध्ये जर प्रामाणिकता असेल आणि उच्चतर चेतनेप्रत पोहोचण्याचा धीरयुक्त संकल्प असेल तर, कितीही अडथळे आले तरी, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये खुलेपण (opening) हे निश्चित येते. यासाठी कमी वेळ लागेल की जास्त हे मन, हृदय आणि शरीराच्या कमी-अधिक तयारीवर अवलंबून असते. आणि म्हणून व्यक्तीकडे आवश्यक तेवढा धीर नसेल तर, आरंभ करताना येणाऱ्या अडचणीमुळेच ती व्यक्ती ते प्रयत्न सोडून देईल, अशी शक्यता असते.

आपले (समग्र) अस्तित्व श्रीमाताजींनी हाती घ्यावे म्हणून त्यांच्या उपस्थितीला आणि त्यांच्या शक्तीला, शक्यतो हृदयामध्ये लक्ष एकाग्र करून आवाहन करणे आणि त्यांच्या शक्तिकार्याद्वारे चेतनेचे रूपांतरण होणे याखेरीज पूर्णयोगामध्ये अन्य कोणतीही पद्धत नाही. तुम्ही मस्तकामध्ये किंवा भ्रूमध्यामध्ये देखील चित्त एकाग्र करू शकता परंतु बऱ्याच जणांना अशा प्रकारे उन्मुख, खुले होणे फारच कठीण जाते.

जेव्हा मन अविचल होते आणि एकाग्रता दृढ होते, जेव्हा अभीप्सा तीव्र होते, तेव्हा अनुभव येऊ लागतात. जितकी श्रद्धा अधिक तितकेच परिणाम लवकर प्राप्त होण्याची शक्यता असते. इतर साऱ्या गोष्टींसाठी व्यक्तीने फक्त स्वतःच्या प्रयत्नांवर विसंबून राहता कामा नये तर, ईश्वराशी संपर्क प्रस्थापित करण्यामध्ये आणि श्रीमाताजींची शक्ती व उपस्थिती ग्रहण करण्यामध्ये यश संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 107)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १०

ईश्वरी प्रभावाप्रत स्वत:ला खुले करणे हा पूर्णयोगाचा समग्र सिद्धान्त आहे. ईश्वरी प्रभाव तुमच्या ऊर्ध्वस्थित असतो आणि एकदा का तुम्ही त्याबाबत सचेत (conscious) होऊ शकलात तर मग, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही केवळ त्याला आवाहन करायचे असते. तो ईश्वरी प्रभाव तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये शांतीच्या, प्रकाशाच्या, कार्यकारी शक्तीच्या रूपाने अवतरतो; आनंदरूपाने अवतरतो. ईश्वरी उपस्थिती म्हणून साकार किंवा निराकार रूपात तो अवतरतो. ही चेतना प्राप्त होण्यासाठी अगोदर व्यक्तीने श्रद्धा बाळगली पाहिजे आणि खुलेपणाची (opening) आस बाळगली पाहिजे.

अभीप्सा (aspiration), आवाहन (call), प्रार्थना (prayer) या सर्व गोष्टी म्हणजे एकाच गोष्टीची विविध रूपे असतात आणि या साऱ्याच गोष्टी सारख्याच प्रभावी असतात. यांपैकी, तुमच्यापाशी जी कोणती गोष्ट असते किंवा जी तुम्हाला अगदी सहजसोपी, स्वाभाविक वाटते त्या गोष्टीचा तुम्ही अवलंब करण्यास हरकत नाही.

दुसरा मार्ग एकाग्रतेचा. तुम्ही तुमची चेतना तुमच्या हृदयामध्ये एकाग्र करायची (काहीजण मस्तकामध्ये वा मस्तकाच्या वर एकाग्र करतात.) आणि अंत:करणामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करायचे आणि तेथे त्यांना आवाहन करायचे.

व्यक्ती यांपैकी कोणत्याही गोष्टीचे अनुसरण करू शकते किंवा वेगवेगळ्या वेळी (आलटून-पालटून) या दोन्ही गोष्टी करू शकते. यापैकी जी गोष्ट तुम्हाला सहजस्वाभाविक वाटेल किंवा ज्या क्षणी तुम्ही जी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त व्हाल ती गोष्ट तुम्ही करावी.

विशेषत: सुरुवातीला एक गोष्ट आत्यंतिक निकडीची असते ती म्हणजे, मन निश्चल करायचे आणि ध्यानाच्या वेळी, साधनाबाह्य असे सारे विचार, स्पंदने हद्दपार करायची. अशा शांत मनामध्ये, अनुभूती येण्यासाठीची प्रगतिशील तयारी चालू होते.

परंतु हे सारे जरी एकदम जमले नाही तरी त्यामुळे तुम्ही अधीर, अस्वस्थ होता कामा नये. कारण मनामध्ये संपूर्ण निश्चलता येण्यासाठी बराच काळ लागतो; तुमच्या चेतनेची तयारी होईपर्यंत तुम्हाला वाटचाल करत राहावी लागते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 106)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०९

प्रकाश, शांती, आनंद इ. गोष्टी सोबत घेऊन येणाऱ्या ‘दिव्य शक्ती’ला व्यक्तीने स्वत:मध्ये प्रवाहित होऊ देणे आणि तिला रूपांतरणाचे कार्य करू देणे, हे आत्म-उन्मुखतेचे (self-opening) उद्दिष्ट असते. अशा रितीने, व्यक्ती जेव्हा दिव्य शक्तीचे ग्रहण करते आणि ती शक्ती त्या व्यक्तीमध्ये कार्य करते आणि जेव्हा त्या कार्याचे परिणाम दिसू लागतात (भलेही मग, त्या व्यक्तीला त्या प्रक्रियेची जाणीव असो किंवा नसो) तेव्हा ती व्यक्ती खुली (open) आहे, असे म्हटले जाते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 106)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०८

पूर्णयोगाच्या साधनेमध्ये, कोणतीही एकच एक अशी ठरावीक साचेबंद मानसिक शिकवण नसते किंवा ध्यानधारणेचे कोणते नेमून दिलेले प्रकार किंवा कोणत्या मंत्र-तंत्रादी गोष्टीदेखील नसतात.

तर अभीप्सेद्वारे आणि अंतर्मुख व ऊर्ध्वमुख अशा आत्म-एकाग्रतेद्वारे, आणि आपल्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘दिव्य शक्ती’प्रत व तिच्या कार्याप्रत, तिच्या ‘दिव्य प्रभावा’प्रत स्वतःला उन्मुख केल्यामुळे, तसेच हृदयामध्ये असणाऱ्या ‘दिव्य अस्तित्वा’प्रत स्वतःला खुले केल्यामुळे ही साधना घडत जाते. तसेच या सर्वांना विरोधी असणाऱ्या सर्व गोष्टींना नकार देणेही या साधनेमध्ये अभिप्रेत असते.

श्रद्धा, अभीप्सा आणि समर्पण यांद्वारेच केवळ ही आत्म-उन्मुखता (self-opening) घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 20)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०७

पूर्णयोगामध्ये आत्म-निवेदनाचे (self-consecration) आणि आत्म-दानाचे (self-giving) सर्वसाधारण तत्त्व सर्वांसाठी समानच आहे पण प्रत्येकाचा आत्म-निवेदनाचा आणि आत्म-दानाचा स्वतःचा असा एक मार्ग असतो. ‘क्ष‌’ या साधकाचा मार्ग हा ‘क्ष‌’साठी चांगला आहे, तसाच तुम्ही निवडलेला मार्ग हा तुमच्यासाठी चांगला आहे, कारण तो तुमच्या प्रकृतीशी मिळताजुळता आहे. अशा प्रकारची लवचीकता आणि विविधता योगामध्ये नसती आणि सर्वांना एकाच साच्यामध्ये बसवावे लागले असते तर योग म्हणजे चैतन्यमय शक्ती न राहता, तो एक अलवचिक अशी मानसिक यंत्रणा ठरला असता.
*

योगमार्ग ही एक जिवंत, चैतन्यमय गोष्ट असली पाहिजे. व्यक्तीपरत्वे विभिन्नता असते आणि (एक प्रकारे) ती आवश्यकदेखील असते. पण त्या विभिन्नतेला न मानता, ज्याला चिकटून राहावे असे कोणते एकच एक मानसिक तत्त्व किंवा पद्धती म्हणजे योगमार्ग, असे असता कामा नये.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 103), (SABCL 24 : 1463)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०६

ज्यांच्या अंतरंगामध्ये ईश्वरासाठीची एक प्रामाणिक हाक आलेली असते, त्यांच्या मनाने किंवा प्राणाने कितीही विघ्ने निर्माण केली किंवा अशा व्यक्तींवर कितीही आघात झाले किंवा त्यांची प्रगती अगदी संथगतीने व वेदनादायक झाली; जरी ते काही काळासाठी मार्गच्युत झाले किंवा ते पथभ्रष्ट झाले तरी सरतेशेवटी चैत्य अस्तित्वच (psychic) नेहमी विजयी होते आणि ईश्वरी साहाय्य प्रभावी ठरल्याचे सिद्ध होते. त्यावर विश्वास ठेवा आणि चिकाटी बाळगा, मग ध्येय निश्चितपणे साध्य होईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 29)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०५

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

योग-चेतनेमध्ये भलेही तुमचा नुकताच प्रवेश झालेला असला तरी पण, एकदा का तो प्रवेश झाला की, सर्व काही करता येणे शक्य आहे, हे तुमच्या लक्षात येते. सुरुवात करणेच महत्त्वाचे असते. दिव्य शक्ती आणि दिव्य ऊर्जा तेथे असल्या की, अगदी प्रारंभसुद्धा पुरेसा असतो.

वास्तविक, यश हे बाह्य प्रकृतीच्या क्षमतेवर अवलंबून नसते तर, ते आंतरिक पुरुषावर (inner being) अवलंबून असते आणि आंतरिक पुरुषाला सर्व काही शक्य असते. मात्र व्यक्तीला आंतरिक पुरुषाशी संपर्क साधला आला पाहिजे आणि तिने बाह्य दृष्टिकोन व चेतना ही अंतरंगातून बदलली पाहिजे; हेच साधनेचे कार्य असते. प्रामाणिकपणा, अभीप्सा आणि सहनशीलता यामधून ते निश्चितपणे साधते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 31-32)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०४

पूर्णयोगाची साधना करण्याची कोणाचीच योग्यता नसते, (असे जेव्हा मी म्हणालो तेव्हा) त्याचा अर्थ असा आहे की, कोणीही फक्त स्वत:च्या एकट्याच्या क्षमतेवर ही साधना करू शकत नाही. प्रश्न आहे तो, ती दिव्यशक्ती पूर्णत: प्राप्त करून घेण्यासाठी स्वत:ला घडविण्याचा!

ही साधना व्यक्ती केवळ स्वबळावर करू शकत नाही. जर व्यक्तीची सहमती व अभीप्सा असेल तर ती दिव्य शक्तीच ही साधना करून घेऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 32)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०३

पूर्णयोगामध्ये केवळ ईश्वराचा साक्षात्कार अपेक्षित नाही तर संपूर्ण आत्मनिवेदन (consecration) अभिप्रेत आहे, तसेच जोपर्यंत ईश्वरी चेतनेचे आविष्करण करण्यासाठी व्यक्तीचे आंतरिक व बाह्य जीवन सुपात्र ठरत नाही आणि जोपर्यंत व्यक्तीचे जीवन हे ईश्वरी कार्याचाच एक भाग बनून राहत नाही तोपर्यंत, आंतरिक व बाह्य जीवनामध्ये परिवर्तन घडवत राहणे हे या योगामध्ये अभिप्रेत आहे. याचा अर्थ असा की, निव्वळ नैतिक आणि शारीरिक उग्र तपस्येहून कितीतरी अधिक अचूक आणि कठोर असे आंतरिक अनुशासन (discipline) येथे अभिप्रेत आहे.

पूर्णयोगाचा मार्ग हा इतर बहुतांश योगमार्गांपेक्षा अधिक विशाल व अधिक दुःसाध्य आहे. त्यामुळे, आपल्याला अंतरात्म्याकडून हाक आली आहे आणि अंतिम ध्येयाप्रत वाटचाल करत राहण्याची आपली तयारी आहे, या गोष्टीची खात्री पटल्याशिवाय व्यक्तीने या मार्गात प्रवेश करता कामा नये.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 27)