पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३२

अभीप्सा (aspiration) जशी असेल अगदी तंतोतंत त्यानुसारच उच्चतर चेतना अवतरित होईल असे नाही; पण म्हणून अभीप्सा काही निष्फल ठरत नाही. अभीप्सेमुळे चेतना खुली ठेवली जाते; तसेच येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मूकसंमती देण्याची साधकामध्ये जी एक निष्क्रिय अवस्था असू शकते त्या अवस्थेला अभीप्सेमुळे एक प्रकारचा आळा बसतो. आणि उच्चतर चेतनेच्या स्रोतांप्रति एक प्रकारची ओढ निर्माण होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 58)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३१

कोणतेही साहाय्य नसताना, केवळ स्वतःच्या अभीप्सेच्या आणि संकल्पशक्तीच्या आधारे, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींवर मात करता येईल असे बळ क्वचितच एखाद्याकडे असते. आणि अगदी कोणी जरी अशी मात केलीच तरी त्याला या कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींवर केवळ एका विशिष्ट प्रकारचेच नियंत्रण मिळविता येते, त्यांच्यावर पूर्ण प्रभुत्व मिळविता येत नाही.

कनिष्ठ शक्तींशी सामना करत असताना, आपण ईश्वरी शक्ती‌च्या बाजूचे असावे यासाठी आणि ईश्वरी शक्ती‌चे साहाय्य मिळविता यावे यासाठी (साधकाकडे) संकल्पशक्ती व अभीप्सा असणे आवश्यक असते. आध्यात्मिक संकल्पाची आणि हृदयाच्या आंतरात्मिक अभीप्सेची परिपूर्ती करणारी ईश्वरी शक्तीच केवळ (कनिष्ठ प्रकृतीवर) विजय मिळवू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 721)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३०

साधक एका विशिष्ट अवस्थेपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तरी त्याने वैयक्तिकरित्या अभीप्सा बाळगणे आवश्यकच असते. सारे काही आपोआप घडून येत आहे आणि विकासासाठी विशिष्ट ज्ञान व सहमतीचीच तेवढी आवश्यकता आहे अशी अवस्था येत नाही तोपर्यंत तरी, ही वैयक्तिक अभीप्सा आवश्यक असते.

*

ईश्वराला केलेले आवाहन म्हणजे ‘अभीप्सा’ आणि चेतना-शक्तीने प्रकृतीवर टाकलेला दबाव म्हणजे ‘संकल्पशक्ती’.

*

‘अभीप्सा’ म्हणजे शक्तींना केलेले आवाहन. शक्तींकडून जेव्हा त्या आवाहनाला प्रतिसाद मिळतो तेव्हा साधकामध्ये अविचल ग्रहणशीलतेची एक केंद्रिभूत झालेली पण सहजस्फूर्त अशी स्वाभाविक स्थिती असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 58, 57, 57)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २९

‘ईश्वरी शक्ती’ नेहमीच अस्तित्वात असते, तुम्हाला तिची जाणीवही झाली होती आणि तुमच्या चेतनेतून जरी ती तुम्हाला काही काळ हरवल्यासारखी किंवा दूरस्थ झाल्यासारखी भासली तरीदेखील, ती तिथेच आहे आणि तीच प्रबळ ठरणार हे निश्चित, याची तुम्ही स्वतःला सतत आठवण करून देत जा. कारण ती ‘ईश्वरी शक्ती’ ज्या कोणाला स्पर्श करते आणि जवळ घेते, ते सारे जण तेव्हापासून त्या ‘ईश्वरी शक्ती’चेच होऊन जातात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 189)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २८

(इच्छावासनांचा किंवा रागलोभादी विकारांचा आघात झाल्यास काय करावे असा प्रश्न एका साधकाने विचारलेला आहे. त्यावर उपाय म्हणून आधी साधकाने स्वत:ची संकल्पशक्ती उपयोगात आणावी, असे श्रीअरविंद यांनी त्याला सांगितले असावे. पण तसे करता नाही आले तर काय करावे, हे श्रीअरविंद त्या साधकाला लिहीत आहेत…)

तुम्ही तुमची संकल्पशक्ती उपयोगात आणू शकत नसाल तर मग एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे ‘दिव्य शक्ती’ला आवाहन करणे. एखाद्या आघातापुढे हार पत्करणे आणि काहीच न करणे यापेक्षा, त्या शक्तीला आवाहन करणे अधिक बरे. मग ते आवाहन केवळ मनाने केलेले असो किंवा मानसिक शब्दांनी केलेले असो! या आवाहनाचा अगदी त्वरित परिणाम घडून आला नाही तरी, चेतना पुन्हा एकदा (चैत्य पुरुषाप्रत) खुली होण्यामध्ये आणि ‘दिव्य शक्ती’चे आगमन होण्यामध्ये त्याची परिणती होऊ शकते. कारण प्रत्येक गोष्ट त्यावरच अवलंबून असते.

बहिर्मुख झालेल्या चेतनेमध्ये (externalised consciousness) नेहमीच अंधकार आणि दुःखभोग असू शकतात; मात्र (तुमच्यामध्ये) आंतरिक चेतनेची सत्ता जितकी वाढत जाईल तेवढ्या प्रमाणात दुःखभोगादी गोष्टी मागे सारल्या जातील आणि (कालांतराने) त्या निघून जातील. कारण पूर्णतया आंतरिकीकरण झालेल्या चेतनेपुढे (internalised consciousness) त्यांचा टिकाव लागू शकत नाही. आणि समजा दुःखभोगादी गोष्टी अगदी आल्याच तर, त्या गोष्टी बाह्यवर्ती स्पर्शाप्रमाणे (वरवरच्या) असतात, त्या तुमच्या अस्तित्वामध्ये घर करू शकत नाहीत.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 721-722)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २७

ज्या ऊर्जेमुळे व्यक्तीला सत्कृत्य करण्याची प्रेरणा मिळते आणि जी ऊर्जा व्यक्तीला दुष्कृत्य करण्यापासून रोखते ती ऊर्जा म्हणजे ‘संकल्पशक्ती’ होय.

*

संकल्प हा चेतनेचाच एक भाग असतो आणि मनुष्यामध्ये तो (कनिष्ठ) प्रकृतीच्या गतीविधींचे नियंत्रण करणारा मुख्य घटक असलाच पाहिजे.

*

आपण जर सातत्याने संकल्पाचा उपयोग करत राहिलो तर आपल्या अस्तित्वाचे इतर घटकदेखील हळूहळू त्या संकल्पाची आज्ञा प्रमाण मानू लागतात आणि मग आपल्या कृतीदेखील प्राणिक भावना वा इच्छावासनांनुसार न होता, त्या संकल्पाच्या बरहुकूम होऊ लागतात. उर्वरित सर्व गोष्टी (भावना, इच्छा इ. स्वयमेव) जर कल्पनेमध्ये किंवा कृतीमध्ये आणल्या गेल्या नाहीत आणि त्यांना जर संकल्पाची जोड दिली गेली नाही आणि त्या मनात उमटतील तेव्हा नुसते त्यांचे अवलोकन केले आणि त्यांना नकार दिला तर, थोड्याशा संघर्षानंतर त्या गोष्टी क्षीण होत जातात आणि कालांतराने नाहीशा होतात.

*

साधकामध्ये जोवर ध्येय साध्य करून घेण्याची इच्छा आणि दृढ संकल्प नसतो तोवर ती ‘दिव्य शक्ती’सुद्धा निश्चित आणि चिरस्थायी परिणाम निर्माण करू शकत नाही.

*

साधकामध्ये जोपर्यंत वरून होणारे ‘दिव्य शक्ती’चे कार्य किंवा अंतरंगातील गहनतर ‘दिव्य संकल्पा’चे कार्य सातत्यपूर्ण रितीने घडून येत नाही तोपर्यंत मानसिक इच्छेची आवश्यकता असतेच.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 718, 716, 716, 720, 720)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २६

‘ईश्वरी कृपा’ आणि ‘ईश्वरी शक्ती’ (साधकाच्या बाबतीत) सर्व काही करू शकते, पण ते ती साधकाच्या पूर्ण सहमतीनेच (assent) करू शकते. अशी पूर्ण सहमती द्यायला शिकणे हाच साधनेचा समग्र अर्थ आहे. अशा सहमतीसाठी मनामधील कल्पना, प्राणामधील इच्छावासना किंवा शारीरिक चेतनेमधील जडत्वामुळे, तामसिकतेमुळे कदाचित वेळ लागेल परंतु, या गोष्टी दूर केल्याच पाहिजेत आणि ते शक्य असते. ईश्वरी शक्तीने कार्य करावे यासाठी तिला आवाहन केल्याने आणि ईश्वरी शक्तीच्या साहाय्याने त्या गोष्टी दूर करता येऊ शकतात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 171)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २५

विश्वाची समस्त लीला व्यक्तीच्या विशिष्ट अशा सापेक्ष मुक्त इच्छेवर आधारलेली आहे. ती मुक्त इच्छा साधनेमध्येसुद्धा शिल्लक असते आणि (म्हणूनच) व्यक्तीची सहमती ही प्रत्येक पावलागणिक आवश्यक असते. ईश्वराला समर्पित झाल्यामुळे व्यक्ती अज्ञान, विभक्तपणा आणि अहंकारापासून मुक्त होते परंतु त्यासाठी ते समर्पण प्रत्येक पावलागणिक ‘मुक्त समर्पण’ असणे आवश्यक असते. (मुक्त समर्पण म्हणजे समर्पित व्हायचे की नाही याचे स्वातंत्र्य व्यक्तीला असते.)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 68)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २४

साधकाकडून अभीप्सा, नकार आणि समर्पण (aspiration, rejection and surrender) या तीन गोष्टींबाबत प्रयत्नांची अपेक्षा असते. या गोष्टी जर साधकाने केल्या तर उर्वरित गोष्टी स्वतःहूनच श्रीमाताजींच्या कृपेमुळे आणि त्यांचे तुमच्यामध्ये जे कार्य चालू असते त्यामुळे घडून येतात. या तिन्हीपैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ‘समर्पण’. विश्वास, भरवसा आणि अडीअडचणींमध्ये देखील धैर्य टिकवून ठेवणे हे या समर्पणाचे पहिले आवश्यक रूप असते.

अभीप्सा असेल तरच विश्वास आणि भरवसा असतो असा काही नियम नाही. उलट, अगदी अभीप्सा नसतानासुद्धा, जडत्वाच्या, तामासिकतेच्या दबावामुळे भरवसा, विश्वास आणि धैर्यसुद्धा टिकून राहू शकते. अभीप्सा झाकोळलेली असताना, जर विश्वास आणि धैर्य अपयशी ठरले तर, तेव्हा साधक स्वतःच्या प्रयत्नांवरच निर्भर आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे असा साधक म्हणत असतो की, “अरेरे, माझी अभीप्सा असफल ठरली, तेव्हा आता मला आशेला काही जागाच नाही. माझी अभीप्साच जिथे कुचकामी ठरली, तेथे आता श्रीमाताजी तरी काय करू शकतील?”

पण याच्या उलट, साधकाला असे वाटले पाहिजे की, “काही हरकत नाही, माझी अभीप्सा पुन्हा पूर्ववत होईल. आत्ता जरी मला श्रीमाताजींची उपस्थिती जाणवत नसली तरीही त्या माझ्या सोबतच आहेत; त्या मला घनांधकारामधूनही पार घेऊन जातील.” हा अगदी पूर्णपणे सुयोग्य असा दृष्टिकोन तुम्ही बाळगला पाहिजे. ज्यांनी असा दृष्टिकोन अंगीकारलेला असतो त्यांच्यावर नैराश्याचादेखील काही परिणाम होऊ शकत नाही; पण समजा अगदी नैराश्य आलेच तर त्या नैराश्यालाच अपयशी होऊन परतावे लागते. हे काही ‘तामसिक समर्पण’ नव्हे.

पण “मी काहीच करणार नाही. श्रीमाताजींनीच सर्वकाही करावे; अगदी अभीप्सा, नकार, समर्पण या गोष्टीदेखील आवश्यक नाहीत. त्या गोष्टीसुद्धा त्यांनीच माझ्यामध्ये घडवून आणाव्यात,” असे जेव्हा व्यक्ती म्हणते, तेव्हा ते ‘तामसिक समर्पण’ असते. हा जो दृष्टिकोन असतो तो काहीही न करणाऱ्या कामचुकार माणसाचा असतो आणि दुसरा दृष्टिकोन असतो साधकाचा. या दोन दृष्टिकोनांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो.

असा साधक जे जे सर्वोत्तम असते ते ते सारे काही करतो, परंतु जेव्हा गोष्टी प्रतिकूल असतात आणि साधक काही काळासाठी अक्रिय होतो तेव्हा असा साधक श्रीमाताजींच्या शक्तीवर विश्वास ठेवून असतो आणि (बऱ्यावाईट) साऱ्या गोष्टींमागे त्यांचीच उपस्थिती आहे असा विश्वास बाळगतो. त्याच्या या विश्वासामुळेच तो विरोधी शक्तीवर मात करतो आणि पुन्हा एकदा साधना करू लागतो.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 139-140)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २३

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

योग हा एक प्रयत्न असतो, ती तपस्या असते. व्यक्ती जेव्हा अतीव प्रामाणिकपणाने उच्चतर शक्तीच्या कार्याप्रत स्वतःचे समर्पण करते; ते समर्पण सतत जागते ठेवते आणि ते परिपूर्ण करत राहते तेव्हाच मग योगाचे तपस्यापण (म्हणजे त्यातील खडतरता) संपुष्टात येते.

योग म्हणजे सुसंगती नसलेली, तर्कहीन अशी काही एक कविकल्पना नाही किंवा योग म्हणजे निव्वळ चमत्कारही नाही. योगाचे स्वतःचे असे काही नियम असतात, काही अटी असतात आणि असे असताना, (स्वत: काहीही प्रयत्न न करता) कोणत्यातरी एखाद्या जबरदस्त चमत्काराद्वारे ईश्वरानेच सारे काही घडवून आणावे अशी तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा कशी काय करू शकता, हेच मला समजत नाही.

‘पूर्णयोग’ निर्धोक आहे असे मी कधीही म्हटलेले नाही, कोणताच योग निर्धोक नसतो. मानवी जीवनातील कोणत्याही महान उद्यमामध्ये असतात त्याप्रमाणेच, प्रत्येक योगमार्गाचे त्याचे त्याचे स्वतःचे असे काही धोके असतात. मात्र व्यक्तीमध्ये केंद्रवर्ती प्रामाणिकपणा आणि ईश्वराबद्दल निष्ठा असेल तर त्या धोक्यांमधून सहीसलामत पार पडता येते. (केंद्रवर्ती प्रामाणिकपणा आणि ईश्वराबद्दल निष्ठा) या दोन आवश्यक अटी आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 81, 43)

सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक

आमच्या AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.