नैराश्यापासून सुटका – ३७

नैराश्यापासून सुटका – ३७

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

जे काही घडत आहे ते घडणे एक प्रकारे आवश्यकच होते आणि तुमच्यासाठी काय सर्वोत्तम आहे हे ईश्वराला चांगले माहीत आहे, अशी चढतीवाढती श्रद्धा जर तुमच्यामध्ये असेल तर, ही मुळातच एक खूप मोठी गोष्ट आहे. त्याशिवाय तुम्ही जर कायम ध्येयाभिमुख राहण्याची इच्छा आणि कितीही अडीअडचणी आल्या किंवा वरकरणी कितीही नकार मिळाले तरी त्या सगळ्यातून तुम्हाला त्या ध्येयाच्या दिशेने नेले जात आहे, असा विश्वास यांची भर त्यामध्ये घातलीत तर, साधनेसाठी यापेक्षा अन्य कोणतेच अधिक चांगले मानसिक अधिष्ठान असू शकणार नाही. तसेच फक्त मानसिकच नव्हे तर, प्राणिक व शारीरिक चेतनेमध्येदेखील (vital and physical consciousness) हीच श्रद्धा बाणवता आली तर, निराशा येणेच एकतर शक्य नाही किंवा ती चेतनेचा भाग नसून, ती बाहेरून लादण्यात आलेली एक बाह्य गोष्ट आहे, हे तुम्हाला इतके स्पष्टपणे जाणवेल की, त्यामुळे निराशा तुमचा अजिबात ताबा घेऊ शकणार नाही.

अशा प्रकारची श्रद्धा असणे हे अतिशय उपयुक्त असे पहिले पाऊल असते. चेतनेच्या ज्या प्रतिक्रमणामुळे (reversal of consciousness) व्यक्ती गोष्टींच्या बाह्यवर्ती दृश्यमान वैशिष्ट्यांकडे पाहण्याऐवजी, त्यांच्या आंतरिक सत्याकडे पाहू लागते, त्या प्रतिक्रमणाच्या दिशेने पडलेले हे पहिले पाऊल असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 195)

श्रीअरविंद