नैराश्यापासून सुटका – ०७

नैराश्यापासून सुटका – ०७

(नैराश्य कोणत्या कारणांनी येऊ शकते यासंबंधी श्रीअरविंद एका साधकाला पत्राद्वारे सांगत आहेत.)

सहसा निराशेच्या लाटा या सामान्य ‘प्रकृती’मधून येतात. जेव्हा कोणतेच कारण नसते तेव्हा मन निराशेसाठी आंतरिक किंवा बाह्य असे एखादे निमित्त शोधून काढते. निराशेचे कारण न कळण्याचे हे एक कारण असू शकते.

दुसरे असेही एक कारण असू शकते की, कर्माची किंवा साधनेची जी वाटचाल चालू आहे, तिचे अनुसरण करण्याची जिवामधील (being) एखाद्या भागाची उमेद नाहीशी झालेली असू शकते किंवा तो भाग त्या वाटचालीचे अनुसरण करण्यास अनिच्छुक असू शकतो किंवा तो श्रान्तक्लान्त झालेला असू शकतो.

तो जर प्राणिक अस्तित्वामधील (vital being) एखादा भाग असेल तर, आपले पितळ उघडे पडू नये म्हणून किंवा ते कारण दूर होऊ नये म्हणून तो स्वतःला दडवून ठेवू शकतो. तो जर शारीरिक अस्तित्वामधील एखादा भाग असेल तर तो नुसताच मंद आणि अंधुक, स्वतःला व्यक्त करण्यास अक्षम असणारा असा असू शकतो.

आणि शेवटचे एक कारण म्हणजे ती निराशा अवचेतन (subconscient) भागामधून आलेली असू शकते. विनाकारण नैराश्य दाटून येणे, हेही निराशेच्या अनेकविध कारणांपैकी एक कारण असू शकते. व्यक्तीने स्वतःच स्वतःचे निरीक्षण करून, नक्की काय कारण आहे ते शोधले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 185)

श्रीअरविंद