नैराश्यापासून सुटका – ०१

नैराश्यापासून सुटका – ०१

जीवन विविधरंगी असते. कधी चैत्रपालवी तर कधी वैशाख-वणवा, कधी नयनरम्य तर कधी ओसाडरुक्ष दृश्य, कधी मोरपंखी कोमलता तर कधी पाषाणाची कठोरता; अशा बहुरंगी, बहुढंगी चढ-उतारावरून, खाच-खळग्यातून जीवनप्रवाह खळाळता राहतो. मानवी जीवनही आशा-निराशेच्या हिंदोळ्यांवर हेलकावत राहते. कधी तप्त वाळूवर अनवाणी पावलांनी चालण्याचा अनुभव येतो तर कधी दवबिंदू-भिजल्या कोवळ्या गवतावर फेरफटका मारण्याचा स्पर्श-सुखद अनुभव येतो. यापैकी कोणताही अनुभव आला तरी, अध्यात्म आपल्याला या सगळ्याकडे पाहण्याची एक सम-दृष्टी प्रदान करते. आजच्या स्पर्धात्मक जगात आशेपेक्षा निराशेचे प्रसंगच अधिक येताना दिसतात. अशा वेळी तर हमखास आपल्या मदतीला येतो तो अध्याम-विचार! व्यक्तीला निराशेकडून आशेकडे आणि नंतर आशा-निराशातीत अवस्थेकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य या विचारामध्ये असते.

उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘नैराश्यापासून सुटका’ या मालिकेमध्ये श्रीअरविंद व श्रीमाताजी यांचे या विषयावरील विचार आपण समजावून घेणार आहोत. वाचक नेहमीप्रमाणेच या मालिकेचे स्वागत करतील अशी आशा आहे.

यदाकदाचित मनावर निराशेची काजळी जमली असेल तर, ती झटकून टाकू या आणि नव-वर्षानिमित्त नव-आशेचा स्फुल्लिंग मनात तेवता ठेवू या.

– संपादक, अभीप्सा मराठी मासिक

अभीप्सा मराठी मासिक