जीवन जगण्याचे शास्त्र – ०२

जीवन जगण्याचे शास्त्र – ०२

ज्या क्षणी आविष्काराचा खटाटोप नाहीसा होतो तेव्हा, तो आविष्कार सहजस्वाभाविक होऊन जातो. एखादे फूल जसे सहजतेने उमलते, त्याचे सौंदर्य अभिव्यक्त करते; कोणताही गाजावाजा न करता किंवा कोणत्याही आवेशाविना अगदी सहजतेने आपला सुगंध पसरविते तसा तो आविष्कार असतो. या सहजतेमध्ये मोठी शक्ती सामावलेली असते, ती शक्ती निर्भेळ असते; त्यामुळे त्यातून कोणत्याही विघातक प्रतिक्रिया उद्भवत नाहीत; उद्भवल्याच तर त्या अगदीच अल्प असतात.

प्राणाच्या (vital) शक्तीवर फार विसंबून राहता कामा नये कारण ती कर्ममार्गावरील प्रलोभक (tempter) असते. तिच्यामुळे तुम्हाला त्वरित परिणाम अनुभवता येतात त्यामुळे तिच्या जाळ्यामध्ये फसण्याचा नेहमीच धोका असतो. कर्म चांगले करण्याच्या आपल्या अतिउत्साहामुळे, त्या शक्तीचा उपयोग करण्याच्या नादात, आपण वाहवत जातो. मात्र असे केल्यामुळे, योग्य दिशेने चाललेल्या आपल्या सर्व प्रयत्नामध्ये अचानकपणे बाधा निर्माण होते आणि आपण जे काही करत असतो त्यामध्ये भ्रांतीचे आणि विनाशाचे बीज पेरले जाते.

सहजता, सहजता! हे ईश्वेरा, तुझ्या उपस्थितीची विशुद्धता किती मधुर आहे!

– श्रीमाताजी (CWM 01 : 17)

श्रीमाताजी