आत्मसाक्षात्कार – १४

आत्मसाक्षात्कार – १४

(अहंची आवश्यकता का असते ते कालच्या भागात आपण पाहिले. आता व्यक्तीचे स्वतंत्र, पृथगात्म व्यक्तित्व निर्माण झाल्यावर काय होते त्याबद्दल आणि अहंच्या विलीनीकरणाबद्दल त्या येथे सांगत आहेत.
या मालिकेतील भाग ०८ ते १४ सलग वाचल्यास हा विषय अधिक नेमकेपणाने लक्षात येईल, असे वाटते.)

तुम्ही व्यक्ती म्हणून स्वतंत्र, पृथगात्म (individualised) झाला आहात आणि आता योग्य वेळ आली आहे, असे ईश्वराला जेव्हा वाटते, तेव्हा मग ईश्वर तुमचा अहं त्याच्यामध्ये विलीन करण्याची आणि इथून पुढचे तुमचे सर्व जीवन केवळ ईश्वरासाठी व्यतीत करण्याची तुम्हाला अनुमती देतो. हा निर्णय ईश्वर घेत असतो. मात्र त्याआधी तुम्ही हे सगळे काम पूर्ण केले पाहिजे, तुम्ही स्वतः आधी एक सचेत व्यक्ती बनले पाहिजे. तुमच्या अस्तित्वाचे तुम्ही पूर्णपणे, अगदी अनन्यपणे केवळ ईश्वराभोवतीच केंद्रीकरण केले पाहिजे आणि ईश्वर हाच तुमचा चालविता धनी असला पाहिजे. पण एवढे सगळे झाल्यावरही, अहं शिल्लक असतोच. कारण त्या अहंनेच तर आजवर तुम्हाला एक व्यक्ती म्हणून घडवण्यामध्ये योगदान दिलेले असते.

परंतु एकदा का (स्वतंत्र व्यक्ती म्हणून घडण होण्याचे) ते काम पूर्ण झाले, ते निर्दोष, परिपूर्ण झाले की मग, त्या क्षणी तुम्ही ईश्वराला म्हणू शकता की, “हा मी इथे उभा आहे, मी तयार आहे. माझा तू स्वीकार करशील का?” आणि तेव्हा ईश्वर बहुधा नेहमीच ‘हो’ म्हणतो. तेव्हा सारे काही पूर्ण झालेले असते, सारे काही सिद्धीस गेलेले असते. आणि अशा वेळी मग तुम्ही ईश्वरी कार्य करण्यासाठी ‘खरे साधन’ बनलेले असता.

(सारांश : सरमिसळ अशा सामूहिक अस्तित्वामधून, अहंच्या सहाय्याने व्यक्तीची स्वतंत्र, पृथगात्म अशी घडण – व्यक्तीच्या सर्व घटकांचे ईश्वराभोवती केंद्रीकरण – ईश्वराप्रत आत्मदान – अहंचा विलय करण्यास ईश्वराची अनुमती – अहंचा विलय – आणि व्यक्ती ईश्वरी कार्याचे साधन बनते.)

– श्रीमाताजी (CWM 06 : 260-261)

श्रीमाताजी