श्रीमाताजी आणि समीपता – २१

श्रीमाताजी आणि समीपता – २१

साधक : मला नेहमीच असे आढळून आले आहे की, जेव्हा जेव्हा दिव्यत्वाबद्दल एक प्रकारचे आंतरिक प्रेम उफाळून वर येते तेव्हा डोळ्यांमधून अश्रूधारा वाहू लागतात.

श्रीअरविंद : ते भक्तीचे आंतरात्मिक (psychic) अश्रू असतात.

*

साधक : (थोडे दिवसांसाठी आश्रमात वास्तव्यास आलेल्या) एक साधिका आज आश्रमातून घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. जेव्हा श्रीमाताजींच्या दर्शनाचा कार्यक्रम संपला आणि श्रीमाताजी जिन्याने वर जाऊ लागल्या, तेव्हा त्या साधिका रडू लागल्या. काही काळासाठी त्यांचे चैत्य अस्तित्व (psychic) अग्रभागी आल्याचा परिणाम म्हणून त्या रडू लागल्या असाव्यात का?

श्रीअरविंद : चैत्य अस्तित्व अग्रभागी येण्याशी अथवा न येण्याशी याचा काही संबंध नाही. त्यांचे चैत्य अस्तित्व जागृत झालेले आहे आणि आंतरिक स्तरावर त्या श्रीमाताजींच्या दीर्घकाळपासून संपर्कात आहेत.

*

साधक : श्रीमाताजींच्या दर्शनाची वेळ आली तेव्हा माझी चेतना निःस्तब्ध आणि रोमांचित झाली होती. तो एक अद्भुत अनुभव होता आणि त्यामुळे माझा चैत्य पुरुष अग्रभागी आला. माझी काया अशा रीतीने रोमांचित का झाली आणि काही काळासाठी माझा देह असा स्तब्ध का झाला?

श्रीअरविंद : अर्थातच, श्रीमाताजींच्या उच्च स्तरावरून होणाऱ्या स्पर्शामुळे तुमची काया रोमांचित झाली होती आणि त्या स्पर्शाचे अस्तित्व अंतरात्मा आणि प्राण या दोघांनाही एकत्रिपणे जाणवले.

*

साधक : चैत्य पुरुष (psychic being) पूर्णतः अग्रभागी येण्याआधी अंतःकरणातील चैत्य अस्तित्वाच्या माध्यमातून श्रीमाताजींशी सचेत संपर्क साधणे शक्य आहे का?

श्रीअरविंद : हो. शक्य आहे. चैत्य अस्तित्व नेहमीच तेथे असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 467-468)

श्रीअरविंद