श्रीमाताजी आणि समीपता – २६

साधक : आज सकाळी ‘क्ष’च्या मार्फत मी श्रीमाताजींना पत्र पाठविले. परंतु मला त्यांच्याकडून अजूनपर्यंत उत्तर मिळाले नाही. माझ्या हातून काही चूक घडली का? त्यांचा एकेक शब्द ऐकण्यासाठी मी अगदी व्याकुळ झालो आहे.

श्रीअरविंद : अशा प्रकारच्या भावनांना नेहमी नकारच दिला पाहिजे. ईश्वराबरोबर असलेले नाते, श्रीमाताजींबरोबर असलेले नाते हे प्रेमाचे, श्रद्धेचे, विश्वासाचे, खात्रीचे, समर्पणाचे असले पाहिजे. या व्यतिरिक्त असणाऱ्या कोणत्याही अन्य प्राणिक सामान्य प्रकारच्या नात्यामुळे साधनेला विरोधी असणाऱ्या प्रतिक्रिया निर्माण होतात; इच्छावासना, अहंकारी अभिमान, अपेक्षा, बंडखोरीची भावना आणि तत्सम अज्ञानी राजसिक मानवी प्रकृतीच्या साऱ्या अस्वस्थता या गोष्टी निर्माण होतात आणि त्यांच्यापासून सुटका करून घेणे हे तर साधनेचे उद्दिष्ट असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 450-451)

श्रीमाताजी आणि समीपता – २५

साधक : माझ्या मनामध्ये श्रीमाताजींविषयी शुद्ध भक्तीचा उदय कसा होईल?

श्रीअरविंद : विशुद्ध भक्ती, आराधना असणे आणि कोणताही दावा किंवा मागणी न बाळगता ईश्वराविषयी प्रेम असणे याला म्हणतात शुद्ध भक्ती.

साधक : ती कोठून आविष्कृत होते?

श्रीअरविंद : अंतरात्म्यामधून.

*

साधक : श्रीमाताजींविषयीची आंतरात्मिक भक्ती, मानसिक भक्ती आणि प्राणिक भक्ती यांचे स्वरूप कसे असते? ती कशी ओळखायची?

श्रीअरविंद : कोणतीही अपेक्षा न बाळगता केलेले आत्मदान आणि प्रेम हे ’आंतरात्मिक भक्ती’चे स्वरूप असते, तर श्रीमाताजींनी मला त्यांचे अंकित करावे आणि मी त्यांची सेवा करावी अशी इच्छा असणे हे ‘प्राणिक भक्ती’चे स्वरूप असते. आणि श्रीमाताजी जशा आहेत, त्या जे सांगतात आणि त्या जे करतात त्याविषयी कोणतीही शंका न बाळगता, त्याचा केलेला स्वीकार आणि श्रद्धा हे ‘मानसिक भक्ती’चे स्वरूप असते. वस्तुतः भक्तीची ही बाह्यांगी लक्षणे आहेत. त्यांचे आंतरिक स्वरूप ओळखता येण्याइतके सुस्पष्ट असते पण त्यातील भेद शब्दांत मांडायची आवश्यकता नाही.

साधक : ‘पूर्णयोगा’मध्ये मानसिक आणि प्राणिक भक्तीला काहीच स्थान नाहीये का?

श्रीअरविंद : असे कोण म्हणते? प्रत्येक भक्ती, ती जर खरीखुरी भक्ती असेल, तर त्या भक्तीस येथे स्थान आहे.

*

प्रेम व भक्ती ही चैत्य पुरुषाच्या खुले होण्यावर अवलंबून असते आणि त्यासाठी इच्छावासना नाहीशा होणेच आवश्यक असते. बऱ्याच जणांकडून श्रीमाताजींना आंतरात्मिक प्रेमाऐवजी प्राणिक प्रेम अर्पण करण्यात येते; इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा या प्राणिक प्रेमामुळेच अधिक अडथळे निर्माण होतात कारण त्यामध्ये इच्छावासना मिसळलेल्या असतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 476-477, 475)

श्रीमाताजी आणि समीपता – २४

साधक : आज ‘बाल्कनी दर्शना’च्या वेळी संध्याकाळी जेव्हा मी श्रीमाताजींचे दर्शन घेत होतो तेव्हा मला माझ्यामध्ये भक्तीचा एक उमाळा आलेला आढळला. ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असे मला वाटले. जोपर्यंत अशी भक्ती माझ्या हृदयामध्ये जिवंत आहे तोपर्यंत माझी अन्य कोणतीच इच्छा नाही. अशी ‘अहैतुकी भक्ती’ मला लाभावी, असे आपण मला वरदान द्यावे. श्रीरामकृष्ण परमहंस म्हणत असत की, भक्तीची इच्छा ही काही इच्छावासना म्हणता यायची नाही. म्हणून मला असा विश्वास वाटतो की, अशी इच्छा बाळगून मी कोणत्याही प्रकारचा व्यवहार करत नाहीये, कारण भक्ती हा ‘दिव्यत्वा’चा गाभा आहे, त्यामुळे माझे मागणे रास्त आहे ना?

श्रीअरविंद : ईश्वराबद्दलची इच्छा किंवा ईश्वराविषयी भक्ती ही अशी एक इच्छा असते की, जी व्यक्तीला अन्य सर्व इच्छांपासून मुक्त करते; (आपल्याला असे आढळते की,) त्याच्या गाभ्याशी ‘इच्छा’ नसते, तर ‘अभीप्सा’ असते. ती आत्म्याची निकड असते, आपल्या अंतरात्म्याच्या अस्तित्वाचा ती श्वास असते आणि असे असल्यामुळेच तिची गणना इच्छावासनांमध्ये केली जात नाही.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 476-477)

श्रीमाताजी आणि समीपता – २३

साधक : गेली चार वर्षे माझा अंतरात्मा नेहमीच सक्रिय आणि अग्रभागी होता, हे माझे म्हणणे योग्य आहे का? माझ्या प्रकृतिगत घटकांना धक्का न लावता, म्हणजे त्यासंबंधी कोणताही विचार करण्याची आवश्यकता न पडता, आता श्रीमाताजी माझ्यावर कार्य करू शकतात का?

श्रीअरविंद : तुमचा अंतरात्मा अग्रभागी आलेला असेल आणि सक्रिय असेल म्हणजेच जर तो मन, प्राण व शरीर यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात आणि त्यांचे परिवर्तन करण्यात व्यग्र असेल तर, श्रीमाताजींच्या तुमच्या बाबतीतल्या कार्यामुळे तुमची प्रकृती अस्वस्थ होते, हे कसे काय?

अंतरात्मा हा जर अग्रभागी आला असता आणि तो सक्रिय झाला असता तर, त्याने अस्वस्थ होऊ पाहणाऱ्या प्रकृतिगत कोणत्याही घटकाला त्वरेने सांगितले असते की, “श्रीमाताजी जे करू पाहत आहेत किंवा त्यांनी जे ठरविलेले आहे ते पूर्ण समर्पित वृत्तीने आणि आनंदाने स्वीकारलेच पाहिजे. काय केले पाहिजे हे श्रीमाताजींपेक्षा आपल्याला अधिक चांगले समजते असे तुमच्या मनाला कदापिही वाटता कामा नये आणि आपल्या स्वतःच्या इच्छाआकांक्षा आणि पसंती-नापंसतीनुसार श्रीमाताजींनी वागावे, असे तुमच्या प्राणाला वाटता कामा नये. कारण अशा प्रकारच्या कल्पना, इच्छा या जुन्या प्रकृतीशी संबंधित असतात आणि त्यांना आंतरात्मिक आणि आध्यात्मिक प्रकृतीमध्ये जागा नसते, या साऱ्या अहंकाराच्या त्रुटी असतात.” आणि जर तुमच्या अंतरात्म्याचे तुमच्या प्रकृतीवर नियंत्रण असते तर, कोणतीही अस्वस्थता ही एकाएकी नाहीशी तरी झाली असती अन्यथा ती विरून तरी गेली असती. तुमच्या अंतरात्म्याचे तुमच्या प्रकृतीवर खरोखरच नियंत्रण असते तर अशा प्रकारची कोणतीही अस्वस्थता शिल्लक राहणे शक्यच नाही.

त्यामुळे असे समजायला हरकत नाही की, अंतरात्मा तुमच्या अस्तित्वावर काही प्रमाणात प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्यांचे नियंत्रण ही अजून खूपच दूरची गोष्ट आहे किंवा तुमचा प्राण पुन्हा उफाळून वर आला आहे आणि त्याने अंतरात्म्याला झाकून टाकले आहे आणि त्यामुळे अंतरात्म्याचा प्रभाव तात्पुरता का होईना पण नाहीसा झालेला आहे. पण जर अंतरात्मा हा पूर्णपणे पुढे आलेला असेल, म्हणजे तो झाकोळलेला किंवा नुकताच उदयोन्मुख अवस्थेत आलेला नसेल तर, तो कशानेही झाकला जाणे हे केवळ असंभव. फार फार तर पृष्ठभागावर काहीशी अस्वस्थता जाणवत आहे पण अंतरंगामध्ये मात्र सारे काही शांत, सचेत आणि भक्तिमय आहे असे असू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 470)

श्रीमाताजी आणि समीपता – २२

साधक : माझी चेतना ही फक्त श्रीमाताजींच्या हृदयावर स्थिरावलेली आहे, जणू काही ती चेतना त्यांच्यामध्येच वसत असावी आणि त्यांच्याशी एकात्म पावलेली असावी. ती केवळ श्रीमाताजींशी एकत्व पावण्याचाच विचार करत असते, ती म्हणते, “मी त्यांच्यामध्ये वसत आहे, आणि माझी वसती तेथेच असली पाहिजे. मला एवढेच पुरेसे आहे, मला त्याव्यतिरिक्त अन्य काहीच नको.” माझी चेतना या विचारांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही विचारांना थाराच देत नाही, अगदी उच्चतर किंवा आध्यात्मिक विचारांनासुद्धा त्यामध्ये थारा नाही. या माझ्या भूमिकेकडे तुम्ही कशाप्रकारे पाहता?

श्रीअरविंद : साधारणपणे, आंतरिक अस्तित्व आणि चैत्य अस्तित्व (psychic) जागृत करण्यासाठी ही भूमिका ठीक आहे. परंतु तुम्हाला जर उच्चतर अनुभव आलाच तर त्याला मात्र अडवू नका.

*

साधक : श्रीमाताजींच्या प्रेमाचा भौतिक आविष्कार जेव्हा माझ्या अनुभवास येत नाही, तेव्हा मी विचलित होतो.

श्रीअरविंद : प्रेमाच्या भौतिक आविष्काराची ही अपेक्षा नाहीशी झालीच पाहिजे. साधनेच्या मार्गावरील हा एक घातक असा अडथळा आहे. अशा अपेक्षेची पूर्ती व्हावी म्हणून जी प्रगती घडून येते ती असुरक्षित असते, आणि ज्या शक्तीने ही अपेक्षा निर्माण केलेली असते त्या शक्तीकडून ती प्रगती कोणत्याही क्षणी फेकून दिली जाऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 470, 474)

श्रीमाताजी आणि समीपता – २१

साधक : मला नेहमीच असे आढळून आले आहे की, जेव्हा जेव्हा दिव्यत्वाबद्दल एक प्रकारचे आंतरिक प्रेम उफाळून वर येते तेव्हा डोळ्यांमधून अश्रूधारा वाहू लागतात.

श्रीअरविंद : ते भक्तीचे आंतरात्मिक (psychic) अश्रू असतात.

*

साधक : (थोडे दिवसांसाठी आश्रमात वास्तव्यास आलेल्या) एक साधिका आज आश्रमातून घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. जेव्हा श्रीमाताजींच्या दर्शनाचा कार्यक्रम संपला आणि श्रीमाताजी जिन्याने वर जाऊ लागल्या, तेव्हा त्या साधिका रडू लागल्या. काही काळासाठी त्यांचे चैत्य अस्तित्व (psychic) अग्रभागी आल्याचा परिणाम म्हणून त्या रडू लागल्या असाव्यात का?

श्रीअरविंद : चैत्य अस्तित्व अग्रभागी येण्याशी अथवा न येण्याशी याचा काही संबंध नाही. त्यांचे चैत्य अस्तित्व जागृत झालेले आहे आणि आंतरिक स्तरावर त्या श्रीमाताजींच्या दीर्घकाळपासून संपर्कात आहेत.

*

साधक : श्रीमाताजींच्या दर्शनाची वेळ आली तेव्हा माझी चेतना निःस्तब्ध आणि रोमांचित झाली होती. तो एक अद्भुत अनुभव होता आणि त्यामुळे माझा चैत्य पुरुष अग्रभागी आला. माझी काया अशा रीतीने रोमांचित का झाली आणि काही काळासाठी माझा देह असा स्तब्ध का झाला?

श्रीअरविंद : अर्थातच, श्रीमाताजींच्या उच्च स्तरावरून होणाऱ्या स्पर्शामुळे तुमची काया रोमांचित झाली होती आणि त्या स्पर्शाचे अस्तित्व अंतरात्मा आणि प्राण या दोघांनाही एकत्रिपणे जाणवले.

*

साधक : चैत्य पुरुष (psychic being) पूर्णतः अग्रभागी येण्याआधी अंतःकरणातील चैत्य अस्तित्वाच्या माध्यमातून श्रीमाताजींशी सचेत संपर्क साधणे शक्य आहे का?

श्रीअरविंद : हो. शक्य आहे. चैत्य अस्तित्व नेहमीच तेथे असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 467-468)

श्रीमाताजी आणि समीपता – २०

साधक : सकाळपासून मला असे जाणवते आहे की, मी श्रीमाताजींच्या सन्निध आहे, जणू काही आम्हा दोघांमध्ये काही द्वैतभावच शिल्लक राहिलेला नाहीये. पण हे कसे शक्य आहे? कारण त्यांच्या आणि माझ्यामध्ये केवढी मोठी दरी आहे? मी मानसिक स्तरावर आहे आणि त्या तर अत्युच्च अतिमानसिक (Supramental) स्तरावर आहेत.

श्रीअरविंद : श्रीमाताजी या फक्त अतिमानसिक स्तरावरच नाहीत तर त्या सर्व स्तरांवर असतात. आणि विशेषतः त्या आंतरात्मिक भागामध्ये (अंतःकरणामध्ये) सर्वांच्या अगदी निकट असतात, आणि म्हणून जेव्हा तो भाग खुला होतो तेव्हा साहजिकपणे ही निकटतेची भावना जागी होते.

*

साधक : मी ज्या ज्या वेळी श्रीमाताजींचे दर्शन घेतो त्या प्रत्येक वेळी मला प्रेम आणि आनंद का जाणवत नाही?

श्रीअरविंद : प्रेम आणि आनंद या गोष्टी अंतरात्म्याच्या (psychic) अग्रभागी येण्यावर अवलंबून असतात.

*

साधक : दोन दिवस माझ्या मनात श्रीमाताजींबद्दल आणि तुमच्याबद्दल अगदी उत्कट प्रेम दाटून आले होते, माझे संपूर्ण अस्तित्व त्या प्रेमाने भारून गेले होते. आणि नंतर मात्र त्याचा परिणाम अंशतःच टिकून राहिला. म्हणजे तुमच्याबद्दल आणि श्रीमाताजींबद्दल उत्कट आणि अपार आदर आणि कोणत्याही ऐहिक सुखाने मिळणार नाही असा आनंद तेवढा शिल्लक राहिला.

श्रीअरविंद : अर्थातच तो आनंद आंतरात्मिक (psychic) होता.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 467-468)

श्रीमाताजी आणि समीपता – १९

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

साधक : श्रीमाताजींच्या नुसत्या दर्शनानेच समाधान आणि आनंद लाभतो, ही कोणत्या प्रकारची जाणीव आहे?

श्रीअरविंद : ही आंतरात्मिक जाणीव (psychic feeling) आहे.

साधक : श्रीमाताजींच्या स्मरणानेच समाधान आणि आनंद लाभतो, ही कोणत्या प्रकारची भावना आहे?

श्रीअरविंद : ही आंतरात्मिक जाणीव आहे.

साधक : श्रीमाताजींच्या विरोधात कोणी काही बोललेले ऐकले की काळजाला घरं पडतात, ही कोणत्या प्रकारची भावना आहे?

श्रीअरविंद : ही आंतरात्मिक जाणीव आहे.

साधक : श्रीमाताजींपासून भौतिकदृष्ट्या खूप दूर असूनसुद्धा, श्रीमाताजींचे अस्तित्व हृदयामध्ये अनुभवास येते, ही कोणत्या प्रकारची जाणीव आहे?

श्रीअरविंद : ही आंतरात्मिक जाणीव आहे.

साधक : मी आंतरात्मिक प्रेमाच्या पूर्ण स्थितीमध्ये आहे हे मला कसे जाणता येईल?

श्रीअरविंद : अहंकाराचे अस्तित्व नसणे, शुद्ध भक्ती, आणि ईश्वराप्रति शरणागतता आणि समर्पण यांद्वारे ते जाणून घेता येईल.

*

साधक : जेव्हा सारे काही स्थिर, आणि शांत असते तेव्हा मला माझ्या हृदयात खोलवर असे काहीतरी अनुभवास येते, अंतरंगातून सातत्याने सर्वांसाठी समानतेने एक प्रकारची अतिशय मधुर अशी भावना उचंबळून वर येते. आणि ती सातत्याने श्रीमाताजींपाशी जाऊन पोहोचते. ईश्वराबरोबर असलेल्या एका मधुर नात्याची जाणीव त्यामध्ये असते. त्यामुळे माझे संपूर्ण अस्तित्व अगदी मृदुमुलायम होऊन जाते; ते स्थिरचित्त, शांत, मधुर शांतीने आणि समाधानाने भरून जाते.

श्रीअरविंद : याला म्हणतात ‘आंतरात्मिक प्रेम’! (psychic love.)

– श्रीअरविंद (CWSA 32 : 466-467)

श्रीमाताजी आणि समीपता – १७

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

श्रीमाताजींचे प्रेम सदोदित असतेच आणि त्यांच्या प्रेमापुढे मानवी प्रकृतीच्या अपूर्णतांचा पाडावच लागू शकत नाही. एकच गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे, तुम्हाला ते प्रेम सदोदित मिळत असल्याची जाणीव असणे आवश्यक असते. तुमचा चैत्य पुरुष (psychic being) अग्रभागी येण्यासाठी ती गोष्ट आवश्यक असते कारण त्या चैत्य पुरुषाला त्याची जाण असते; मन, प्राण आणि शरीर हे घटक फक्त बाह्य वरवरच्या दृष्यांकडे पाहत असतात आणि ते त्या दृष्यांचा चुकीचा अर्थ लावतात. आणि असे होऊ नये म्हणून श्रीमाताजींची शक्ती कार्यरत असते.

जेव्हा जेव्हा तुमचा चैत्य पुरुष पृष्ठभागाजवळ आलेला होता तेव्हा तेव्हा तुम्हाला श्रीमाताजींच्या प्रेमाची आणि त्यांच्या समीपतेची जाणीव झाली होती. परंतु तुमच्या इतर भागांनाही तीच जाणीव होण्यासाठी, तसाच अनुभव येण्यासाठी त्या भागांचीही तयारी होणे आवश्यक असते आणि त्यासाठी वेळ लागतो. म्हणून धीर धरणे आवश्यक असते. साधनेमध्ये कितीही अडीअडचणी आल्या, दिरंगाई झाली तरी त्या सर्व गोष्टींमधून मार्ग काढत, श्रीमाताजी तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत आणि त्या तुम्हाला त्यांच्या परमधामी घेऊन जाणार आहेत याची खात्री बाळगणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 481)

श्रीमाताजी आणि समीपता – १६

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुम्हाला श्रीमाताजींबद्दल जे एवढे प्रगाढ प्रेम वाटते ते प्रेम आणि तुम्ही ज्यांच्या समवेत राहता किंवा काम करता त्यांच्याविषयी वाटणारी आत्मीयता व सौहार्दाची भावना या दोन्ही गोष्टी चैत्य पुरुषाकडून (psychic being) येतात. जेव्हा चैत्य पुरुषाचा प्रभाव वाढू लागतो तेव्हा ‘श्रीमाताजीं’बद्दलचे हे प्रेम अधिक उत्कट होते आणि ते प्रेमच तुमच्या प्रकृतीचे मुख्य सारथी बनते. आणि त्याचबरोबर इतरांविषयी एक प्रकारची सद्भावना, सुसंवाद, दयाळूपणा किंवा आत्मीयता या भावनासुद्धा उदयाला येतात.

श्रीमाताजींची बालके असणाऱ्या सर्वच जिवांशी आपल्या आत्म्याचे जे आंतरिक नाते असते त्याचा हा परिणाम असतो आणि त्यामुळे त्यामध्ये (व्यक्तीचे) वैयक्तिक असे काही नसते. या आंतरात्मिक भावनेमध्ये काही अपाय नाही, उलट ती भावना संतोष आणि सुसंवाद निर्माण करते. आंतरात्मिक भावनेमुळे अंतरात्म्याचे श्रीमाताजींच्या चेतनेमध्ये विकसन होण्यास साहाय्य लाभते आणि त्यामुळे कार्यालाही हातभार लागतो तसेच आंतरिक जीवन वृद्धिंगत होण्यासदेखील मदत होते.

व्यक्ती-व्यक्तींमध्ये असणारे प्राणिक प्रेम (vital love) तेवढे नाकारले पाहिजे कारण ते प्रेम ‘ईश्वरा’प्रति करायच्या पूर्ण आत्म-निवेदनापासून (consecration) व्यक्तीला दूर नेते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 463)