श्रीमाताजी आणि समीपता – ०६
श्रीमाताजी आणि समीपता – ०६
(एका साधकाला मार्गदर्शन करणारे श्रीअरविंद लिखित पत्र…)
“श्रीमाताजींपासून लपवावीशी वाटेल अशी कोणतीही गोष्ट करू नका, अशी कोणतीही गोष्ट बोलू नका अथवा अशा कोणत्या गोष्टीचा विचारही करू नका.” आणि येथेच, तुमच्याकडून म्हणजे तुमच्या प्राणाकडून जी शंका उपस्थित करण्यात आली आहे त्याचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल. अशा ‘किरकोळ गोष्टी’ श्रीमाताजींच्या नजरेस कशा आणून द्यायच्या ही तुमची शंका आहे. श्रीमाताजींना या गोष्टींचा त्रास होईल किंवा त्या या गोष्टींना क्षुल्लक मानतील असे तुम्हाला का वाटते? सर्व जीवन योगमय करायचे असेल तर, येथे क्षुल्लक किंवा बिनमहत्त्वाचे असे काही कसे काय असू शकेल?
तुमच्या कृतीची आणि स्वयं-विकासाची कोणतीही गोष्ट सुयोग्य वृत्तीने त्यांच्यासमोर मांडणे म्हणजे ती गोष्ट श्रीमाताजींच्या संरक्षणछत्राखाली नेण्यासारखी आहे; रूपांतरणासाठी कार्यरत असणाऱ्या त्यांच्या शक्तीकिरणांमध्ये, ‘सत्या’च्या प्रकाशात नेण्यासारखी आहे. कारण श्रीमाताजींच्या नजरेला जे आणून देण्यात आलेले असते त्या गोष्टीवर त्यांचे शक्तीकिरण लगेचच कार्य करू लागतात. तुमचा अंतरात्मा तुम्हाला एखादी गोष्ट करण्यासाठी प्रेरित करत असेल आणि तेव्हा तुमच्यामधीलच कोणीतरी, तुम्हाला ती गोष्ट तुम्ही करू नये असे सुचवत असेल तर ते म्हणजे, तो ‘प्रकाश’किरण आणि त्या ‘शक्ती’चे कार्य टाळण्यासाठी तुमच्या प्राणाने वापरलेले ते एक हत्यार असण्याची खूपच शक्यता असते.
आणखी एक गोष्टसुद्धा लक्षात घेतली पाहिजे आणि ती अशी की, तुम्ही जर तुमच्या कोणत्याही भागाच्या वृत्ती-प्रवृत्ती श्रीमाताजींनी पाहाव्यात म्हणून त्यांच्या नजरेसमोर ठेवून, श्रीमाताजींप्रति स्वतःला खुले केलेत तर, त्यातूनच स्वयमेव त्यांच्याबरोबरचे तुमचे एक नाते तयार होते आणि त्यातून एक वैयक्तिक जवळीक निर्माण होते. त्यांचे सर्व साधकांबरोबर जे एक सर्वसाधारण, मूक नाते असते किंवा श्रीमाताजींनी आपल्यामध्ये कार्य करावे अशी कोणतीही विनवणी व्यक्तीने केलेली नसतानाचे त्या व्यक्तीचे श्रीमाताजींशी जे नाते असते (not directly invited action) त्यापेक्षा हे जवळीकीचे नाते काहीसे निराळे असते.
अर्थातच, हे सारे केव्हा घडून येऊ शकते? अशा प्रकारच्या खुलेपणासाठी तुम्ही तयार झाले आहात, असे जर तुम्हाला वाटत असेल आणि तुमच्या अंतरंगामध्ये जे काही आहे ते जसेच्या तसे अगदी उघडपणे श्रीमाताजींसमोर ठेवण्यासाठी तुमचा अंतरात्मा तुम्हाला प्रेरित करत असेल तेव्हाच हे घडून येऊ शकते. जेव्हा ही गोष्ट अंतरंगातून उमलून येते आणि जेव्हा ती उत्स्फूर्त, खरीखुरी असते तेव्हाच ती फलदायी ठरते.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 449)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ - December 7, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ - December 6, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ - December 5, 2025







