श्रीमाताजी आणि समीपता – ०५

श्रीमाताजी आणि समीपता – ०५

(एका साधिकेला मार्गदर्शन करणारे श्रीअरविंद लिखित पत्र…)

“श्रीमाताजी इतर सर्वांची त्यांच्या मुलांप्रमाणे काळजी घेतात आणि फक्त माझीच त्यांना काळजी नाही,” हा तुमचा स्वतःबद्दलचा विचार ही स्पष्टपणे एक निराधार कल्पना आहे आणि त्याला कोणताही ठोस आधार नाही. त्या इतरांवर जेवढे प्रेम करतात तेवढेच प्रेम त्या तुमच्यावरही करतात, त्या इतरांची जशी आणि जितकी काळजी करतात तेवढीच आणि तितकीच काळजी त्या तुमचीही घेतात; किंबहुना काकणभर अधिकच!

मी एक पाहिले आहे की, अशा प्रकारच्या कल्पना नेहमीच साधक, साधिकांच्या मनात येत असतात. (परंतु श्रीमाताजी सर्वांवर सारखेच प्रेम करतात.) (विशेषतः साधिकांच्या मनात) जेव्हा त्या निराश होतात किंवा बाहेरच्या कोणाच्या सूचना त्या ऐकतात तेव्हा त्यांच्या मनात असे विचार यायला लागतात. …परंतु जेव्हा चैत्य पुरुष (psychic being) जागृत असतो, तेव्हा हे विचार, ही निराशा, या चुकीच्या कल्पना नाहीशा होणे अपरिहार्यच असते. त्यामुळे तुम्हाला हे जे काही वाटत आहे ते निराशा आणि त्या निराशेतून येणाऱ्या चुकीच्या सूचनांमुळे वाटत आहे… तुमचे आंतरिक अस्तित्व (inner being), तुमचा अंतरात्मा जसजसा अधिकाधिक अग्रभागी येईल तेव्हा बाकीच्या सर्व गोष्टींबरोबरच या (भ्रांत) कल्पनासुद्धा नाहीशा होतील; कारण तुमच्यामध्ये वसणाऱ्या आत्म्याला हे माहीत आहे की, तो श्रीमाताजींवर प्रेम करतो आणि श्रीमाताजी तुमच्यावर प्रेम करतात; मन आणि प्राणिक प्रकृतीला फसवू शकणाऱ्या बाह्य सूचनांनी आत्मा अंध होऊ शकत नाही.

त्यामुळे, केवळ निराशेमधून किंवा बाह्य सूचनांमधून जे विचार निर्माण झाले आहेत, अशा निराधार असणाऱ्या विचारांमध्ये गुंतून पडू नका. तुमच्यातील चैत्य पुरुषास अधिक विकसित होऊ द्या आणि श्रीमाताजींच्या शक्तीस तुमच्यामध्ये कार्य करू द्या. श्रीमाताजींचे आणि तुमच्या आत्म्याचे आई व मुलाचे नाते आहे. हे नाते स्वतःहूनच तुम्हाला तुमच्या मनामध्ये, प्राणामध्ये आणि शारीर-चेतनेमध्येही त्याची जाणीव करून देईल. जोपर्यंत हे नाते तुमच्या समग्र चेतनेचे अधिष्ठान बनत नाही आणि त्यावर तुमची समग्र साधना स्थिर व सुरक्षित होत नाही, तोपर्यंत हे नाते तुम्हाला त्याची जाणीव करून देत राहील.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 454-455)

श्रीअरविंद