ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

मला अभिप्रेत असणारे रूपांतरण

साधना, योग आणि रूपांतरण – २३४

(एका साधकाने श्रीअरविंदांना असे सांगितले की, काही जणांना असे वाटते की, ‘आध्यात्मिक’ आणि ‘अतिमानसिक’ या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

तसे जर असते तर, आजवर युगानुयुगे होऊन गेलेले ऋषीमुनी, भक्त, योगी, साधक हे सारे ‘अतिमानसिक जीव’ होते असे म्हणावे लागेल आणि मग अतिमानसाविषयी मी आजवर जे काही लिहिले आहे ते अगदी उथळ, निरुपयोगी, आणि अनावश्यक ठरेल. आध्यात्मिक आणि अतिमानसिक या दोन्ही गोष्टी समानच असतील तर मग ज्या ज्या कोणाला आध्यात्मिक अनुभव आलेले असतील ते सारेजण म्हणजे अतिमानसिक जीव आहेत असे होईल. आणि मग हा आश्रम (श्रीअरविंद-आश्रम) किंवा भारतातील प्रत्येक आश्रमच अतिमानसिक जिवांनी ओसंडून वाहत आहेत, असे म्हणावे लागेल.

व्यक्तीची इच्छा असेल तर आध्यात्मिक अनुभव हे आंतरिक चेतनेमध्ये स्थिरस्थावर होऊ शकतात; आणि त्यानंतर ते तिच्यामध्ये बदल घडवून, तिचे रूपांतरण करू शकतात. सर्वत्र ‘ईश्वर’च असल्याचा साक्षात्कार व्यक्तीला होऊ शकतो, सर्वांमध्ये ‘आत्मा’ आणि ‘आत्म्या’मध्ये सर्वकाही असल्याचा अनुभव तिला येऊ शकतो. विश्वात्मक ‘शक्ती’ या साऱ्या गोष्टी घडवीत आहे; आपण ‘ब्रह्मांडगत आत्म्यामध्ये किंवा आनंदमय भक्तीमध्ये किंवा ‘आनंदा’मध्ये विलीन होत आहोत अशी व्यक्तीला प्रचिती येऊ शकते.

मात्र, व्यक्ती ‘प्रकृती’च्या बाह्य सक्रिय भागांमधील जीवन बुद्धीच्या साहाय्याने किंवा फारफार तर अंतःस्फूर्त मनाच्या (intuitive mind) साहाय्याने विचार करत, मानसिक इच्छेच्या साहाय्याने संकल्प करत, प्राणाच्या पृष्ठवर्ती स्तरावर हर्ष व शोकाचा अनुभव घेत, शरीरात राहून शारीरिक आजारपणं आणि वेदना भोगत, जीवनसंघर्ष करत, शेवटी आजार व मृत्यु असे जीवन कंठत राहू शकते आणि सहसा हे असेच चालू राहते. यामध्ये जर का काही परिवर्तन होणे शक्य असेल तर ते फारफार तर एवढेच असू शकते की, व्यक्ती ‘प्रकृती’मधून बाहेर पडून पूर्णपणे ‘आत्म्या’मध्ये विलीन होत नाही तोपर्यंत तरी, उपरोक्त सर्व गोष्टी म्हणजे ‘प्रकृती’चा अपरिहार्य भाग आहे असे मानून, ‘अंतरात्मा’ या सगळ्याकडे विचलित न होता किंवा भांबावून न जाता, परिपूर्ण समत्वाने पाहू शकतो.

परंतु हे म्हणजे मला अभिप्रेत असणारे ‘रूपांतरण’ नव्हे. मला अभिप्रेत असणारे रूपांतरण म्हणजे ज्ञानाची एक निराळीच शक्ती आहे, ती निराळीच इच्छाशक्ती आहे, भावभावना आणि सौंदर्याचे ते एक आगळेवेगळे प्रकाशमान परिमाण आहे, शारीरिक चेतनेची ती एक निराळीच घडण आहे. आणि या साऱ्या गोष्टी अतिमानसिक परिवर्तनानेच (supramental change) घडून येणे आवश्यक आहे.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 273-274)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

स्वत:ला न फसविणे अवघड

  व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…

5 hours ago

प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन

  आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…

1 day ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४

  (भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…

2 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०३

  (भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…

3 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०२

  भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…

4 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०१

  साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…

5 days ago