ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – १९३

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०९

वरून होणाऱ्या अवतरणाच्या प्रक्रियेमध्ये आणि त्याच्या कार्याबाबत, स्वतःवर संपूर्णपणे विसंबून राहता कामा नये, ही गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची आहे. येथे ‘सद्गुरू’च्या मार्गदर्शनावर अवलंबून राहिले पाहिजे. जे जे काही घडते ते ते सारे त्यांच्या विवेकावर, मध्यस्थीवर आणि त्यांच्या निर्णयावर सोपविले पाहिजे.

कारण बरेचदा असे घडते की, या अवतरणामुळे, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्ती उत्तेजित होतात, उद्दीपित होतात आणि उच्चतर शक्तींमध्ये मिसळू पाहतात आणि त्यांना स्वत:च्या फायद्यासाठी स्वत:कडे वळवू पाहतात. बरेचदा तर असेही घडते की, परमेश्वर किंवा दिव्य मातेचे (मायावी) रूप घेऊन, एक किंवा अनेक अ-दैवी शक्ती प्रकट होतात आणि साधकाकडून सेवेची आणि शरणागतीची मागणी करतात. साधकाने जर त्यास संमती दिली तर मग अत्यंत विघातक परिणाम घडून येतात.

खरोखरच, साधक केवळ ‘ईश्वरी’ कार्यालाच सहमती देत असेल आणि त्याच्या मार्गदर्शनाला शरण जात असेल किंवा समर्पित होत असेल तर मग सारेकाही सुरळीत चालत राहते. ही सहमती देणे आणि सर्व अहंकारी शक्तींना किंवा अहंकाराला चुचकारणाऱ्या शक्तींना नकार देणे या गोष्टी साधनामार्गावरील संपूर्ण वाटचालीमध्ये संरक्षक कवचाप्रमाणे कार्य करतात. पण ‘प्रकृती’चे मार्ग हे मायाजालांनी भरलेले असतात, अहंकाराचे अगणित कपटवेश असतात; ‘राक्षसी माया’, ‘काळोखाच्या शक्तीं’ची भ्रांती, असाधारणरित्या कुशल असते. येथे तर्कबुद्धीचे मार्गदर्शन पुरे पडत नाही, बरेचदा त्यातून विश्वासघात होतो. आणि कोणत्याही आकर्षक, प्रलोभनकारी हाकेनुसार वागायला प्राणिक इच्छा तर आपल्यासोबत सदैव तयारच असते. आणि म्हणूनच आम्ही ज्याला ‘समर्पण’ असे संबोधतो, त्यावर ‘पूर्णयोगा’मध्ये आम्ही इतका अधिक भर देत असतो.

हृदयचक्र पूर्णपणे खुले झाले असेल आणि जर अंतरात्मा नेहमीच नियंत्रण ठेवत असेल तर, मग काही प्रश्नच उद्भवत नाही, मग सारेकाही सुरक्षित असते. परंतु कोणत्याही क्षणी, एखाद्या कनिष्ठ आवेगामुळे अंतरात्मा झाकोळला जाऊ शकतो. काही अगदी थोडेच जण या धोक्यांपासून दूर राहू शकतात आणि ही तीच माणसं असतात की, ज्यांना ‘समर्पण’ अगदी सहजतेने साध्य होते. या अतिशय कठीण प्रयासांमध्ये, जो ‘ईश्वरा’शी तादात्म्य पावलेला आहे किंवा जो ‘ईश्वरा’चे प्रतिनिधित्व करतो अशा व्यक्तीचे मार्गदर्शन आवश्यक आणि अनिवार्य ठरते.

‘योगाची केंद्रवर्ती प्रक्रिया’ याविषयी मला नेमके काय म्हणायचे आहे याची पुरेशी स्पष्ट कल्पना येण्यासाठी तुम्हाला या लिखाणाची मदत होईल. येथे मी काहीसे विस्ताराने लिहिले आहे पण, अर्थातच, मी येथे फक्त मूलभूत गोष्टीच समाविष्ट करू शकलो आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 329-330)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…

11 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा‌ या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…

1 day ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…

5 days ago