साधना, योग आणि रूपांतरण – १८६
योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०२
(योगामध्ये आपले आंतरिक मन, प्राण व शरीर हे चैत्य पुरुषाप्रत खुले आणि ऊर्ध्वदिशेस असणाऱ्या तत्त्वाप्रत उन्मुख होण्याची आवश्यकता असते. ती आवश्यकता असण्याचे) मूलभूत कारण असे की, मन, प्राण आणि शरीर या छोट्या गोष्टी ज्यांना आपण ‘मी’ असे संबोधतो, त्या गोष्टी म्हणजे केवळ बाह्यवर्ती गतीविधी असतात, या गोष्टी म्हणजे अजिबातच आपले खरे ‘स्वरूप’ नसते. या गोष्टी म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा केवळ एक बाह्यवर्ती अंशभाग असतो, जो एका छोट्याशा जीवनासाठी आणि अज्ञानाच्या लीलेसाठी पुढे करण्यात आलेला असतो. त्या व्यक्तिमत्त्वामध्ये सत्याच्या तुकड्यांच्या शोधासाठी धडपडणारे, अडखळणारे अज्ञानी मन असते; सुखाच्या चार क्षणांच्या शोधासाठी धावपळ करणारा अज्ञानी प्राण असतो आणि तमोग्रस्त व बहुतांशी अवचेतन असे शरीर असते. असे हे व्यक्तिमत्त्व, परिणामस्वरूप मिळणाऱ्या वेदना किंवा सुख यांच्यावर स्वामित्व मिळविण्याऐवजी वस्तुमात्रांचे परिणाम आणि दु:खभोग झेलत राहते.
या सर्व गोष्टी कधीपर्यंत स्वीकारल्या जातात? तर जोपर्यंत मनाला उबग येत नाही आणि ते जोवर स्वतःच्या आणि वस्तुमात्रांच्या खऱ्या ‘सत्या’चा शोध घ्यायला सुरुवात करत नाही, जोपर्यंत प्राणाला वीट येत नाही आणि खरा आनंद नावाची काही चीज अस्तित्वात आहे की नाही याविषयी तो विचार करू लागत नाही, आणि जोपर्यंत शरीर थकून जात नाही आणि स्वतःपासून आणि स्वतःच्या यातना आणि सुखापासून सुटका व्हावी असे त्याला वाटत नाही तोपर्यंत हे सारे (त्या बाह्यवर्ती व्यक्तिमत्त्वाकडून) स्वीकारले जाते.
(जेव्हा मनाला उबग येतो, प्राणाला वीट येतो, आणि शरीर थकून जाते) तेव्हा मग हे छोटे, अज्ञानी, आंशिक, बाह्यवर्ती व्यक्तिमत्त्व स्वतःच्या खऱ्या ‘स्वरूपा’कडे आणि त्याबरोबरच महत्तर गोष्टींकडे परतण्याची शक्यता असते, अथवा त्याचा म्हणजे त्या व्यक्तिमत्त्वाचा स्वतः होऊनच लय होऊन, त्याचे निर्वाण होणे शक्य असते.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 324-325)
- मानसिक प्रशिक्षण - February 13, 2025
- विचारमुक्त होण्याचा मार्ग - February 12, 2025
- दोन प्रकारचे आकलन - February 11, 2025