साधना, योग आणि रूपांतरण – १३१
साधना, योग आणि रूपांतरण – १३१
कर्म हे ‘पूर्णयोगा’चे एक आवश्यक अंग आहे. तुम्ही जर कर्म केले नाहीत आणि सगळा वेळ जर ‘ध्याना’मध्येच व्यतीत केलात तर तुमची साधना व तुम्ही तुमची वास्तवावरील पकड गमावून बसाल; (तुमची जीवनव्यवहाराशी फारकत होईल.) आणि तुम्ही स्वतःच्याच, व्यक्तिनिष्ठ अशा कोणत्यातरी अनियंत्रित कल्पनांमध्ये वाहवत जाऊन, स्वतःला हरवून बसाल…
भौतिक वास्तवाच्या (जीवनव्यवहारातील) सर्व संबंधांना दूर लोटून आणि (तुमच्या वस्तुनिष्ठ अस्तित्वाकडे लक्ष न पुरवता) केवळ एकाच म्हणजे व्यक्तिनिष्ठ अस्तित्वामध्येच (आंतरिक जीवनामध्ये) निवृत्त होऊन, तुम्ही चुकीच्या मार्गाला जात आहात आणि तुमची साधना तुम्ही धोक्यात आणत आहात, हे मी तुम्हाला निक्षून सांगतो…
सर्व प्रकारची आसक्ती आणि आत्म-रती या गोष्टी घातक असतात. वस्तुनिष्ठ जीवनातील ‘सत्य’ बाजूला ठेवणे आणि आसक्ती बाळगणे तसेच व्यक्तिनिष्ठ अनुभव व दूरस्थ ‘ध्यानादी’ गोष्टींमध्ये आत्म-रत होणे, या गोष्टी इतर कोणत्याही गोष्टींइतक्याच धोकादायक असतात. अशा चुका करू नका आणि साधनेचा खरा समतोल पुन्हा संपादन करून घ्या. तुम्हाला भौतिक जीवनामध्ये जर अंतरात्मा प्राप्त व्हावा असे वाटत असेल तर, केवळ ध्यानाला बसून आणि अमूर्त अनुभव घेऊन तो प्राप्त होणार नाही. भौतिक जीवन व त्यातील कर्मं यामध्ये त्याचा शोध घेतल्यानेच आणि प्रत्यक्षात इथे उपस्थित असलेल्या श्रीमाताजींचे आज्ञापालन केल्याने व कर्म-समर्पण केल्याने, तसेच श्रीमाताजींचे कार्य केल्याने तो तुम्हाला प्राप्त होईल.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 248-250)
- प्रामाणिकपणा आणि ‘दिव्य माते’चे संरक्षण - May 26, 2026
- समर्पणासाठी संपूर्ण प्रामाणिकपणाची आवश्यकता - May 21, 2026
- वासनामुक्तीची प्रामाणिक आस - May 18, 2026






