साधना, योग आणि रूपांतरण – १२०

ज्ञानासाठी, प्रेमासाठी किंवा कर्मासाठी ‘ईश्वरा’शी सायुज्य पावणे म्हणजे ‘योग’. माणसाच्या अंतरंगात आणि बाहेर असणाऱ्या, सर्वज्ञ व सर्वशक्तिमान ‘ईश्वरा’शी योगी स्वतःचे थेट नाते प्रस्थापित करतो. तो त्या अनंताशी जोडलेला असतो; या विश्वामध्ये ‘ईश्वरा’चे सामर्थ्य प्रवाहित करण्याची तो एक वाहिनी (channel) बनतो. मग ते शांत परोपकाराच्या भूमिकेद्वारे असेल किंवा सक्रिय उपकाराच्या भूमिकेद्वारे असेल.

– जेव्हा एखादा मनुष्य स्वतःची व्यक्तिगत दलदल सोडून, इतरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन, इतरांसाठी जगू लागतो;
– जेव्हा तो सुयोग्य रीतीने आणि प्रेमाने व उत्साहाने कर्म करू लागतो; मात्र परिणामांची चिंता सोडून देतो, तो विजयासाठी उत्सुक नसतो किंवा पराजयाची भीतीही बाळगत नाही;
– जेव्हा तो त्याची सारी कर्मे ‘ईश्वरा’ला अर्पण करतो आणि आपला प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती दिव्यत्वाच्या वेदीवर अर्पण करतो;
– जेव्हा तो भीती व द्वेष, घृणा व किळस, आसक्ती यांपासून मुक्त होतो आणि ‘प्रकृती’च्या शक्तींप्रमाणे, कोणतीही घाईगडबड न करता, अविश्रांतपणे, अपरिहार्यपणे, परिपूर्णपणे कर्म करतो;
– जेव्हा तो, ‘मी म्हणजे देह आहे’, ‘मी म्हणजे हृदय आहे’ किंवा ‘मी म्हणजे मन आहे’ किंवा ‘मी म्हणजे या तिन्हींची गोळाबेरीज आहे’; या विचारांच्या वर उठतो आणि जेव्हा तो स्वतःच्या, खऱ्या ‘स्व’ चा शोध घेतो;
– जेव्हा त्याला स्वतःच्या अमर्त्यतेची आणि मृत्युच्या अ-वास्तवतेची जाण येते;
– जेव्हा त्याला ज्ञानाच्या आगमनाची अनुभूती येते आणि जेव्हा मी स्वतः अकर्ता आहे, आणि ती दिव्य शक्ती माझ्या मनाच्या द्वारे, माझ्या वाणीच्या द्वारे, माझ्या इंद्रियांच्या द्वारे, आणि माझ्या सर्व अवयवांद्वारे अप्रतिहत (unresisted) रीतीने कार्य करत आहे, अशी जाण त्याला येते;
– अशा रीतीने, सर्वांचा ‘स्वामी’, मानवतेचा ‘साहाय्यक’ आणि ‘सखा’ असणाऱ्या ‘ईश्वरा’प्रत तो मनुष्य स्वतः जे काही आहे, तो स्वतः जे काही करतो ते आणि त्याच्यापाशी जे काही आहे, अशा सर्व गोष्टींचा, जेव्हा परित्याग करतो तेव्हा मग, तो नित्य त्या ‘ईश्वरा’मध्ये निवास करू लागतो आणि मग अशा तऱ्हेने दुःख, अस्वस्थता किंवा मिथ्या क्षोभ यांची त्याला बाधा होत नाही; तेव्हा तोच ‘योग’ असतो.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 11)

श्रीअरविंद