समाधी ही प्रगतीची खूण?
साधना, योग आणि रूपांतरण – ९२
साधक : समाधी-अवस्था ही प्रगतीची खूण आहे का?
श्रीमाताजी : ही अतिशय उच्च अवस्था आहे असे प्राचीन काळी मानले जात असे. एवढेच नव्हे तर, ती महान साक्षात्काराची खूण आहे, असे समजले जात असे. आणि त्यामुळे जे कोणी योगसाधना करू इच्छित असत ते नेहमीच या अवस्थेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असत. या अवस्थेसंबंधी आजवर सर्व तऱ्हेच्या अद्भुत गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. ज्याला जे वाटेल ते त्याने सांगावे असा काहीसा प्रकार याबाबतीत आढळतो कारण समाधीतून बाहेर आल्यावर व्यक्तीला काहीच आठवत नसते. जे जे कोणी या अवस्थेमध्ये प्रविष्ट झाले होते त्यांच्याबाबतीत त्या अवस्थेमध्ये नेमके काय घडले होते हे काही ते सांगू शकत नसत. आणि त्यामुळे व्यक्तीला जे वाटते ते ती सांगू शकते.
मी तुम्हाला एक प्रसंग सांगते, सर्व तथाकथित आध्यात्मिक साहित्यामध्ये या समाधी अवस्थेसंबंधी अनेक अद्भुत गोष्टी सांगितलेल्या असायच्या आणि त्या नेहमीच माझ्या वाचनात यायच्या आणि मला तर तशा प्रकारचा अनुभव कधीच आलेला नव्हता. आणि त्यामुळे ही काही कमतरता आहे की काय असे मला वाटायचे.
आणि मी जेव्हा येथे (पाँडिचेरीला) आले, तेव्हा श्रीअरविंदांना मी ज्या शंका विचारल्या होत्या त्यातील ही एक शंका होती. मी त्यांना विचारले होते, “ज्या समाधी अवस्थेमध्ये गेल्यावर (त्या स्थितीतून परत आल्यावर) व्यक्तीला कशाचेच स्मरण राहत नाही अशा अवस्थेबद्दल तुमचे काय मत आहे? म्हणजे व्यक्ती आनंदमय वाटेल अशा एका स्थितीमध्ये प्रवेश करते परंतु जेव्हा ती त्या स्थितीमधून बाहेर येते तेव्हा तिथे काय घडले ते तिला काहीच माहीत नसते.’’
मी काय म्हणू इच्छित आहे, हे त्यांनी जाणले आणि मग ते म्हणाले, “ही चेतनाविहीनता (unconsciousness) आहे.”
मी (आश्चर्याने) विचारले, “काय?” आणि म्हणाले, “अधिक खुलासेवार सांगाल का?”
ते मला सांगू लागले की, “जेव्हा व्यक्ती स्वतःच्या सचेत अस्तित्वाच्या बाहेर जाते तेव्हा, ज्याला ‘समाधी’ असे म्हटले जाते त्या समाधी अवस्थेमध्ये ती प्रवेश करते आणि तेव्हा व्यक्ती तिच्या अस्तित्वाच्या पूर्णतः चेतनाविहीन असलेल्या एका भागामध्ये प्रवेश करते. किंवा अशा एका प्रांतामध्ये ती प्रवेश करते की तेथील चेतनेशी संबंधित असणारी चेतना तिच्यापाशी नसते. म्हणजे तिच्या चेतनेचे जे क्षेत्र असते त्या क्षेत्राच्या ती पलीकडे जाते आणि जेथे ती सचेत राहू शकत नाही अशा एका प्रांतात प्रवेश करते. तेव्हा ती व्यक्ती अवैयक्तिक (impersonal) स्थितीमध्ये असते, म्हणजे ती व्यक्ती चेतनाविहीन अशा एका अवस्थेत जाते आणि म्हणूनच, साहजिकपणे, तिला तेथील काहीच आठवत नाही, कारण तेव्हा ती कशाविषयीही सचेत नसते.”
हे ऐकल्यावर मी काहीशी आश्वस्त (reassured) झाले आणि त्यांना म्हणाले, “परंतु हा असा अनुभव मला कधीच आलेला नाही.”
ते म्हणाले, “मलाही असा अनुभव कधी आलेला नाही!”
आणि तेव्हापासून, लोकं जेव्हा मला समाधीविषयी विचारतात तेव्हा मी त्यांना सांगते की, “तुम्ही तुमचे आंतरिक व्यक्तित्व विकसित करा म्हणजे मग तुम्ही याच प्रांतांमध्ये पूर्ण जाणिवपूर्वकपणे, सचेत रीतीने प्रवेश करू शकाल. आणि उच्चतर प्रांतांशी सायुज्य झाल्याचा आनंद तुम्हाला अनुभवास येईल आणि तेव्हा तुमची चेतनाही तुम्ही गमावलेली नसेल तसेच अनुभूतीऐवजी हाती शून्य घेऊन तुम्ही परतलेले नसाल.” समाधी ही प्रगतीची खूण आहे का, असे विचारणाऱ्या व्यक्तीस माझे हे उत्तर आहे.
समाधी-अवस्थेमध्ये प्रविष्ट न होतादेखील, व्यक्ती जेथे चेतनाविहीनता नावाला सुद्धा शिल्लक नसते, अशा प्रांतात जाऊ शकते तेव्हा ती प्रगतीची खूण असते.
– श्रीमाताजी (CWM 08 : 274-275)
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८ - January 30, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७ - January 29, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६ - January 28, 2026






