साधना, योग आणि रूपांतरण – ६८

काल तुम्ही पत्रामध्ये ज्या रितेपणाचे (emptiness) वर्णन केलेत ती गोष्ट वाईट नाही. हे अंतर्मुख आणि बहिर्मुख रितेपण हे बरेचदा नवीन चेतनेकडे जाणारी योगमार्गावरील पहिली पायरी असते. मनुष्याची प्रकृती ही एखाद्या गढूळ पाण्याने भरलेल्या पेल्यासारखी असते. त्यातील गढूळ पाणी फेकून द्यावे लागते आणि तो पेला स्वच्छ करून, त्यामध्ये दिव्य रस ओतला जावा यासाठी प्रथम तो पेला रिकामा करावा लागतो.

(मात्र यामध्ये) अडचण अशी असते की, मानवाच्या शारीरिक चेतनेला हा रितेपणा सहन करणे अवघड वाटते. कारण त्या चेतनेला सर्व प्रकारच्या लहानसहान प्राणिक आणि मानसिक गतिविधींमध्ये व्यग्र राहायची सवय लागलेली असते. त्या चेतनेला त्यात स्वारस्य वाटते, तिचे मनोरंजन होते आणि अगदी दुःखसंकटामध्ये असतानासुद्धा ती सक्रिय राहते. त्या गोष्टी नाहीशा झाल्या तर ते सहन करणे चेतनेला अतिशय कठीण जाते. तिला नीरस व अस्वस्थ वाटू लागते आणि जुन्याच आवडीच्या गोष्टी, गतिविधी यांबाबत ती पुन्हा आतुर होते. परंतु या अस्वस्थपणामुळे अविचलतेला धक्का लागतो आणि बाहेर फेकून दिलेल्या गोष्टी पुन्हा परतून येतात. तुमच्यामध्ये सध्या हीच अडचण निर्माण होत आहे आणि तिचाच अडथळा होत आहे.

हा रितेपणा म्हणजे खऱ्या चेतनेकडे आणि खऱ्या गतिविधींकडे जाणारा एक टप्पा आहे अशा रीतीने जर तुम्ही त्या रितेपणाचा स्वीकार केलात तर या अडथळ्यापासून सुटका करून घेणे तुम्हाला सोपे जाईल. (तुम्ही लिहिले आहे त्याप्रमाणे, श्रीअरविंद आश्रमातील) प्रत्येकजणच काही या नीरसपणाच्या भावनेतून किंवा अनास्थेमधून जात आहे असे नाही. परंतु बरेच जण या अवस्थेमधून जात आहेत कारण ज्या गतिविधींना ते ‘जीवन’ समजायचे त्या शारीरिक व प्राणिक मनाच्या जुन्या गतिविधींना, वरून अवतरित होणारी ‘ईश्वरी शक्ती’ हतोत्साहित (discouraging) करत आहे. आणि या गोष्टींचा परित्याग करणे किंवा शांती किंवा नीरवतेच्या आनंदाचा स्वीकार करणे या गोष्टी अजून त्यांच्या अंगवळणी पडलेल्या नाहीत.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 74)

साधना, योग आणि रूपांतरण – ६७

नाउमेद न होता किंवा निराशेच्या गर्तेत जाऊन न पडता अडचणींवर मात करण्यासाठी, (तुम्हाला तुमच्यामध्ये असणाऱ्या) सातत्यपूर्ण उत्कट अभीप्सेचे आणि ईश्वराभिमुख झालेल्या अविचल आणि अढळ इच्छेचे साहाय्य लाभते. परंतु अडीअडचणी येतच राहतात कारण त्या मानवी प्रकृतीमध्येच अंतर्भूत असतात. आंतरिक अस्तित्वामध्ये (ईश्वरविषयक) ओढीचा एक प्रकारे अभाव जाणवत आहे, (त्या दृष्टीने) कोणतीच पावले पडत नाहीयेत असे वाटत राहणे, अशा प्रकारचे साधनेमधील विरामाचे कालावधी अगदी उत्तम साधकांबाबत सुद्धा असतात.

(तुमच्यामधील) भौतिक प्रकृतीमध्ये काही अडचण उद्भवली असेल तर तिचे निराकरण करण्यासाठी किंवा पडद्यामागे काही तयारी चाललेली असेल तर त्यासाठी किंवा तशाच काही कारणासाठी अशा प्रकारचे विरामाचे कालावधी येत असतात.

मन आणि प्राण, जे अधिक घडणसुलभ असतात, त्यांच्यामध्ये जेव्हा साधनेचे कार्य चालू असते तेव्हा अशा प्रकारचे कालावधी वारंवार येतात आणि जेथे शरीराचा प्रश्न असतो (साधना जेव्हा शारीर स्तरावर चालू असते तेव्हा) ते अनिवार्यपणे येतातच. आणि तेव्हा ते सहसा कोणत्याही दृश्य संघर्षाद्वारे दिसून येत नाहीत तर, पूर्वी ज्या ऊर्जा कार्यरत असायच्या त्या आता अचल आणि जड झाल्याचे जाणवणे (यामधून त्या विरामाच्या कालावधीची जाणीव होते.) मनाला ही गोष्ट फार त्रासदायक वाटते कारण आता सारेकाही संपले आहे, प्रगतीसाठी आपण अक्षम झालो आहोत, अपात्र ठरलो आहोत असे काहीसे त्याला वाटू लागते. परंतु वस्तुतः ते तसे नसते.

तुम्ही अविचल राहिले पाहिजे आणि (ईश्वरी शक्तीच्या) कार्याप्रति स्वतःला खुले करत गेले पाहिजे किंवा (किमान) तसे करण्याची इच्छा बाळगत राहिली पाहिजे. तसे केल्यास नंतर अधिक प्रगती घडून येईल. अशा कालावधीमध्ये बरेच साधक नैराश्यवृत्तीमध्ये जातात आणि त्यांची भावी (काळा) वरील श्रद्धाच ढळल्यासारखे होते आणि त्यामुळे पुनरूज्जीवनासाठी विलंब होतो, मात्र हे टाळले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 67)

साधना, योग आणि रूपांतरण – ६६

निश्चल-नीरव (silence) स्थितीमध्ये प्रवेश करणे ही सोपी गोष्ट नाही. मानसिक आणि प्राणिक गतिविधींना बाहेर फेकून दिल्यानेच ते शक्य होते. (मात्र) त्या नीरवतेला, त्या शांतीला तुमच्यामध्ये प्रविष्ट होण्यासाठी वाव देणे अधिक सोपे असते. म्हणजे तुम्ही स्वतःला उन्मुख करा, खुले करा आणि तिचे अवतरण होण्यासाठी तिला वाव द्या, हे सोपे असते. हे करणे आणि उच्चतर शक्तींनी अवतरित व्हावे म्हणून त्यांना आवाहन करणे या दोन्हीचा मार्ग समानच असतो. तो मार्ग असा की, ध्यानाच्या वेळी अविचल (quiet) राहायचे, मनाशी झगडा करायचा नाही किंवा ‘शांती’ची शक्ती खाली खेचण्यासाठी कोणताही मानसिक खटाटोप करायचा नाही तर, त्यांच्यासाठी (शांतीसाठी किंवा उच्चतर शक्तींनी अवतीर्ण व्हावे म्हणून) केवळ एक शांत आस, अभीप्सा बाळगायची.

मन जर सक्रिय असेल तर तुम्ही मागे सरून फक्त त्याच्याकडे पाहायला आणि त्याला अंतरंगामधून कोणतीही अनुमती न देण्यास शिकले पाहिजे. मनाच्या सवयीच्या किंवा यांत्रिक गतिविधींना अंतरंगामधून कोणताही आधार न मिळाल्यामुळे त्या हळूहळू गळून पडत नाहीत तोपर्यंत असे करत राहायचे. परंतु मनाच्या गतिविधी तरीही सुरूच राहिल्या तर कोणत्याही तणावाविना किंवा संघर्षाविना त्याला सातत्याने नकार देत राहणे ही एकच गोष्ट करत राहिली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 300)

 

साधना, योग आणि रूपांतरण – ६५

मन निश्चल-नीरव करण्यासाठी, येणारा प्रत्येक विचार परतवून लावणे पुरेसे नसते, ती केवळ एक दुय्यम क्रिया असू शकते. तुम्ही सर्व विचारांपासून दोन पावले मागे सरले पाहिजे आणि विचार आलेच तर नीरव चेतना या भूमिकेतून त्यांचे निरीक्षण केले पाहिजे, मात्र स्वतःहून विचार करायचे नाहीत किंवा विचारांबरोबर एकरूप व्हायचे नाही अशा रीतीने त्या विचारांपासून स्वतःला अलग केले पाहिजे. विचार म्हणजे पूर्णपणे बाहेरच्या गोष्टी आहेत, असे तुम्हाला वाटले पाहिजे. तसे झाले तर मग, विचारांना नकार देणे किंवा मनाची अविचलता बिघडवू न देता त्यांना तसेच निघून जाऊ देणे, या गोष्टी सहजसोप्या होतील.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 335)

साधना, योग आणि रूपांतरण – ६४

भौतिक मनाच्या (physical mind) गोंगाटाला, तुम्ही अस्वस्थ न होता, अविचलपणे नकार दिला पाहिजे. इथपर्यंत नकार दिला पाहिजे की तो (गोंगाट) नाउमेद होऊन जाईल आणि मान हलवत निघून जाईल आणि म्हणेल, “छे! हा माणूस फारच शांतचित्त आणि कणखर आहे.”

नेहमीच अशा दोन गोष्टी असतात की ज्या वर उफाळून येतात आणि तुमच्या शांत अवस्थेवर हल्ला चढवितात. प्राणाकडून आलेल्या सूचना आणि भौतिक मनाची यांत्रिक पुनरावृत्ती या त्या दोन्ही गोष्टी असतात. दोन्ही बाबतीत शांतपणे नकार देत राहणे हाच उपाय असतो.

अंतरंगात असणारा पुरुष हा प्रकृतीला आदेश देऊ शकतो आणि तिने काय स्वीकारावे किंवा काय नाकारावे हे तिला सांगू शकतो. मात्र त्याची इच्छा ही शक्तिशाली, अविचल इच्छा असते; तुम्ही जर अडचणींमुळे अस्वस्थ झालात किंवा क्षुब्ध झालात तर एरवी त्या ‘पुरुषा’ची इच्छा जितकी परिणामकारक रीतीने कार्य करू शकली असती तितकी परिणामकारक रीतीने (तुम्ही अस्वस्थ किंवा क्षुब्ध असताना) ती कार्य करू शकत नाही.

उच्चतर चेतना ही प्राणामध्ये पूर्णपणे उतरली असताना कदाचित सक्रिय साक्षात्कार (dynamic realisation) होऊ शकेल. उच्चतर चेतना जेव्हा मनामध्ये उतरते तेव्हा ती आपल्याबरोबर ‘पुरुषा’ची शांती आणि मुक्ती तसेच ज्ञानसुद्धा घेऊन येते. ती जेव्हा प्राणामध्ये उतरते तेव्हा सक्रिय साक्षात्कार वर्तमानात प्रत्यक्षात होऊ शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 304-305)

साधना, योग आणि रूपांतरण – ६३

(साधना, उपासना काहीच घडत नाहीये असे वाटावे) अशा प्रकारचे कालावधी नेहमीच असतात. तुम्ही अस्वस्थ होता कामा नये, अन्यथा ते कालावधी दीर्घकाळपर्यंत टिकून राहतात आणि साधनेमध्ये अडथळे निर्माण होतात. तुम्ही अविचल राहिले पाहिजे आणि कोणत्याही आवेशाविना स्थिरपणे अभीप्सा बाळगली पाहिजे. किंवा तुम्ही परिवर्तनाच्या दृष्टीने जोर लावत असाल तर तोसुद्धा अविचल, स्थिर असला पाहिजे.

*

नेहमीच काही कालावधी असे असतात की, जेव्हा तुम्ही शांत, स्थिर राहून फक्त अभीप्साच बाळगू शकता. जेव्हा संपूर्ण अस्तित्व सज्ज झालेले असते आणि अंतरात्मा सातत्याने अग्रभागी आलेला असतो तेव्हाच फक्त प्रकाश आणि शक्तीची अव्याहत क्रिया शक्य असते.

*

चेतना झाकोळली गेली आहे (असे वाटण्याचे) असे कालावधी प्रत्येकाच्या बाबतीतच येत असतात. तसे असले तरी, तुम्ही साधना करत राहिले पाहिजे आणि तुम्ही ‘श्रीमाताजीं’कडे कडे वळलात आणि तुमच्या अभीप्सेमध्ये सातत्य ठेवलेत तर, असे कालावधी हळूहळू कमी होत जातील आणि मग तुमची चेतना ‘श्रीमाताजी’प्रति अधिकाधिक खुली होत जाईल.
अशा कालावधींमध्ये (निराशा, वैफल्य, निरसता इत्यादी) गोष्टींना तुमचा ताबा घेऊ देण्यास मुभा देऊ नका, त्याऐवजी, तुम्ही त्यांच्यापासून स्वतःला अलग केले पाहिजे आणि त्या गोष्टी जणू काही परक्या आहेत आणि तुम्हाला त्यांना नकार द्यायचा आहे, असे समजा.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 63)

साधना, योग आणि रूपांतरण – ६२

अभीप्सेच्या शक्तीमधील आणि साधनेच्या ऊर्जेमधील चढ-उतार अटळ असतात. आणि जोवर साधकाचे संपूर्ण अस्तित्व हे रूपांतरणासाठी तयार झालेले नसते तोवर सर्वच साधकांच्या बाबतीत हे चढ-उतार नेहमीचेच असतात. अंतरात्मा जेव्हा अग्रभागी आलेला असतो किंवा तो सक्रिय असतो आणि मन, प्राण त्याला सहमती दर्शवितात तेव्हा तेथे उत्कटता आढळून येते.

परंतु अंतरात्मा जेव्हा तितकासा अग्रेसर नसतो आणि कनिष्ठ प्राण जेव्हा त्याच्या सामान्य गतिविधी बाळगून असतो किंवा मन हे त्याच्या अज्ञानी कृतीमध्ये मग्न असते आणि तेव्हा जर साधक अगदी सतर्क नसेल तर विरोधी शक्ती साधकामध्ये प्रवेश करतात. सहसा सामान्य शारीरिक चेतनेमधून जडत्व येते. विशेषतः जेव्हा साधनेला प्राणाचा सक्रिय आधार मिळत नाही, तेव्हा जडत्व येते. उच्चतर आध्यात्मिक चेतना सातत्याने अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये खाली उतरवीत राहिल्यानेच या गोष्टींचे निवारण करणे शक्य होते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 61)

साधना, योग आणि रूपांतरण – ६१

(साधनेमध्ये काही कालखंड प्रगतीचे तर काही कालखंड नीरसपणे जात आहेत अशी तक्रार एका साधकाने केलेले दिसते. त्याला श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर…)

तुम्ही ज्या चढ-उतारांविषयी तक्रार करत आहात, त्याचे कारण असे की, चेतनेचे स्वरूपच तशा प्रकारचे असते; म्हणजे, काही काळ जागे राहिल्यानंतर थोडी निद्रेची गरज भासते. बरेचदा सुरुवातीला सजग अवस्था थोड्या वेळासाठी असते आणि निद्रा दीर्घ असते; नंतर दोन्हीचा कालावधी समसमान होतो आणि त्यानंतर निद्रेचा कालावधी कमी-कमी होत जातो.

या चढ-उतारांचे आणखी एक कारण असे असते की, जेव्हा तुम्ही ग्रहण करत असता तेव्हा, ते आत्मसात करण्यासाठी तुमच्या प्रकृतीला स्वतःला बंदिस्त करून घेण्याची गरज जाणवते. कदाचित तुमची प्रकृती खूप जास्त ग्रहण करू शकते परंतु जेव्हा तो अनुभव येणं सुरू असते तेव्हा त्याबरोबर जे येत असते, ते प्रकृती योग्य रीतीने पचवू शकत नाही आणि म्हणून ते आत्मसात करण्यासाठी ती स्वतःला बंदिस्त करून घेते.

रूपांतरणाच्या कालावधीमध्ये आणखी एक निमित्त कारण ठरते. ते असे की, तुमच्या प्रकृतीमधला एक भाग परिवर्तित झालेला असतो आणि तुम्हाला बराच काळ असेच वाटत राहते की झालेला बदल हा संपूर्ण आणि चिरस्थायी आहे. परंतु तो बदल नाहीसा झालेला आढळताच तुम्ही निराश होता आणि मग त्या पाठोपाठ, चेतनेचे निम्न स्तरावर पतन होण्याचा कालावधी येतो. हे असे घडते कारण आता चेतनेचा दुसरा एखादा भाग परिवर्तन व्हावे म्हणून अग्रभागी आलेला असतो आणि त्याच्या पाठोपाठ, पूर्वतयारीचा व पडद्यामागे चालू असणाऱ्या कामाचा कालावधी सुरू होतो आणि तो कालावधी तुम्हाला अंधकाराचा किंवा त्याहूनही वाईट असा वाटू लागतो.

साधकाच्या उत्सुकतेला आणि अधीरतेला या गोष्टी हुरहूर लावतात, कधी निराश करतात तर कधी व्याकुळ करतात. परंतु तुम्ही जर त्या अविचलपणे स्वीकारल्या आणि त्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा किंवा योग्य दृष्टिकोन कसा अंगीकारायचा हे जर तुम्हाला ज्ञात असेल तर, या अंधकाराच्या कालावधींनादेखील तुम्ही सचेत साधनेचा एक भाग बनवू शकता. आणि म्हणूनच वैदिक ऋषींनी या चढ-उतारांचे वर्णन “रात्र आणि दिवस दोघेही आळीपाळीने दिव्य शिशुला स्तनपान करवितात,” असे केले आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 59)