सौख्य आणि शांती यांचा अनुभव
साधना, योग आणि रूपांतरण – ८०
अंतरंगामध्ये खूप खोलवर आणि दूर गेल्यावर सौख्य आणि शांती यांचा अनुभव येतो कारण या गोष्टी अंतरात्म्यामध्ये (psychic) असतात आणि अंतरात्मा हा आपल्या अंतरंगामध्ये खूप खोलवर, मन आणि प्राण यांनी झाकलेला असतो. तुम्ही जेव्हा ध्यान करता तेव्हा तुम्ही या अंतरात्म्याप्रत खुले होता, उन्मुख होता, आणि तेव्हा तुम्हाला अंतरंगामध्ये खोलवर असणाऱ्या आंतरात्मिक चेतनेची जाणीव होते आणि मग तुम्हाला सौख्य, शांती या गोष्टी जाणवतात. सौख्य, शांती आणि आनंद या गोष्टी अधिक समर्थ व स्थिर व्हाव्यात आणि त्यांचा अनुभव तुमच्या सर्व व्यक्तित्वामध्ये, आणि अगदी शरीरामध्येदेखील यावा यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये अधिक खोलवर गेले पाहिजे आणि अंतरात्म्याची पूर्ण शक्ती शारीरिक अस्तित्वामध्ये आणली पाहिजे.
खऱ्या चेतनेसाठी अभीप्सा बाळगून, नियमित एकाग्रता आणि ध्यान केल्याने, हे सर्वाधिक सहजतेने शक्य होते. हे कर्माद्वारे, निष्ठेद्वारेसुद्धा शक्य होते; स्वतःसंबंधी विचार न करता, हृदयामध्ये श्रीमाताजींप्रति सातत्याने आत्मनिवेदन (consecration) करत राहण्याच्या संकल्पनेवर नेहमी लक्ष केंद्रित करून, ‘ईश्वरा’साठीच कर्म करत राहिल्यानेसुद्धा हे शक्य होते. परंतु हे परिपूर्णपणे सुयोग्य रीतीने करणे सोपे नसते.
*
‘ईश्वरा’च्या संपर्कात असण्यासाठी समाधीमध्येच असले पाहिजे असे नाही.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 299), (CWSA 30 : 250)
- नैराश्यापासून सुटका – ०१ - September 19, 2025
- जीवन जगण्याचे शास्त्र – ०१ - August 14, 2025
- आत्मसाक्षात्कार – ०१ - July 17, 2025







