ध्यान आणि आत्मसंतुष्टी
साधना, योग आणि रूपांतरण – २१ (भाग ०५)
(‘ध्यान’ आणि ‘कर्म’ या दोन्ही गोष्टींसंबंधीचे विचार आपण कालच्या भागामध्ये लक्षात घेतले. परिणामकारकतेच्या दृष्टीने, ‘ध्याना’पेक्षा ‘योग्य रीतीने केलेले कर्म’ हे अधिक सरस असते, असा श्रीमाताजींचा अभिप्राय असल्याचे येथे साधकाच्या लक्षात आले. तेव्हा त्याच्या मनात ध्यानाच्या उपयुक्ततेविषयीच साशंकता निर्माण झाली. ती त्याने श्रीमाताजींपाशी मोकळेपणाने व्यक्त केली आहे.)
साधक : तर मग ध्यानाचा काहीच उपयोग नाही का?
श्रीमाताजी : नाही, तसे नाही, पण जोपर्यंत ते आवश्यक असेल तोवर ते अगदी उत्स्फूर्तपणे, सहजपणे होत राहील. अचानकपणे, एखाद्या गोष्टीकडून (उच्चतर दिव्य शक्तीकडून) तुमचा ताबा घेतला जाईल आणि त्यामुळे तुम्ही अगदी निश्चल होऊन जाल, तेव्हा तुम्हाला एखाद्या संकल्पनेच्या दर्शनावर किंवा एखाद्या मानसिक अवस्थेवर लक्ष एकाग्र करायला प्रवृत्त केले जाईल. ती गोष्ट तुमचा ताबा घेईल, तेव्हा मात्र तुम्ही तिला विरोध करता कामा नये. मग तुम्ही आवश्यक ती प्रगती साध्य करून घ्याल. आणि अशा एखाद्या अवचित क्षणी तुम्हाला असे आढळते की, तुम्हाला काहीतरी उमगले आहे आणि तुम्हाला जे आंतरिकरित्या काहीतरी गवसले आहे त्यानिशी पुन्हा अगदी पुढच्या क्षणीच तुम्ही तुमचे काम करू लागाल, परंतु त्यामध्ये कोणताही आविर्भाव, कोणतेही ढोंग नसेल.
जे ध्यानाला बसतात आणि आपण कोणीतरी असामान्य व्यक्ती आहोत असा स्वतःविषयी ग्रह करून घेतात त्यांची मला सर्वात जास्त चिंता वाटते. सर्व गोष्टींमध्ये ही गोष्ट सर्वात जास्त धोकादायक असते कारण ते लोक आत्मसंतुष्टीने इतके भरून जातात आणि विफल बनतात की, ते अशा प्रकारे प्रगतीचे सर्व मार्गच बंद करून टाकतात.
– श्रीमाताजी (CWM 05 : 44)
- नैराश्यापासून सुटका – ३३ - October 22, 2025
- नैराश्यापासून सुटका – ३२ - October 21, 2025
- नैराश्यापासून सुटका – ३१ - October 20, 2025







