अमृतवर्षा १२

तुम्हाला जर साधना करायची असेल तर, साहजिकच थोडा वेळ तरी तुम्ही निरपेक्ष, नि:स्वार्थी कामासाठी, म्हणजेच जे काम केवळ स्वत:साठीच केलेले नाही अशा कामासाठी दिला पाहिजे. …तुम्हाला जर साधनेला सुरुवात करायची असेल तर मग अशा वेळी तुमचा स्वत:चा असा कोणताही स्वार्थ ज्यामध्ये नाही अशी कोणतीतरी गोष्ट तुम्ही केली पाहिजे. थोडे का होईना पण नि:स्वार्थी वृत्तीने व्यक्तीने काहीतरी केले पाहिजे. कारण जर एखादी व्यक्ती स्वत:मध्येच मग्न राहत असेल तर ती जणूकाही एखाद्या कोशात बंदिस्त झाल्याप्रमाणे होते आणि तेव्हा ती वैश्विक शक्तींना खुली होऊ शकत नाही. मात्र एखादी लहानशी नि:स्वार्थी कृती, अहंकारविरहित एखादी छोटीशी कृती ही व्यक्तीच्या क्षुद्र व अतिशय खुज्या अशा व्यक्तिमत्त्वापलीकडील काही वेगळ्या अशा गोष्टींसाठीची दालने व्यक्तीला खुली करून देते.

व्यक्ती सहसा स्वत:ला एका कोशात बंदिस्त करून घेते आणि जेव्हा तिला एखादा धक्का बसतो किंवा काही संघर्ष होतो तेव्हाच त्या व्यक्तीला इतर कोशांची जाणीव होते. परंतु सर्वांच्यामध्ये प्रवाहित असलेल्या एका महान शक्तीची जाणीव होणे, मानवी जीवनाच्या व विश्वातील प्रत्येक जिवाच्या परस्परावलंबी स्वरूपाची जाणीव होणे ही एक दुर्मिळ बाब आहे आणि साधनेतील अपरिहार्य अशा अवस्थांपैकी ही एक अवस्था आहे.

– श्रीमाताजी (CWM 06 : 153)

अमृतवर्षा ११

 

प्रश्न : योगसाधना करण्याची पात्रता अंगी येण्यासाठी व्यक्तीने काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : प्रथमतः आपण जागृत झाले पाहिजे. आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या अगदीच अल्प अंशाची जाणीव असते. उरलेल्या भागाबद्दल आपण अनभिज्ञ असतो. अचेतनेमुळे आपण आपल्या असंस्कारित प्रकृतीला चिकटून राहतो आणि या अचेतनेमुळेच प्रकृतीमध्ये काही परिवर्तन किंवा रूपांतरण घडून आणण्यामध्ये अडसर निर्माण होतो. या अचेतनेच्या माध्यमातूनच अदिव्य शक्ती आपल्यामध्ये प्रवेश करतात आणि आपल्याला त्यांचे गुलाम बनवून टाकतात.

तुम्ही स्वत:विषयी जागृत झाले पाहिजे, तुमची प्रकृती व तुमच्यामध्ये निर्माण होणारी आंदोलने यांविषयी तुम्ही सजग झाले पाहिजे. तुम्ही काही गोष्टी का करता व कशा करता, त्याविषयी तुमच्या भावना कशा प्रकारच्या आहेत व त्या तशा का आहेत, त्या गोष्टीसंबंधी तुमचे विचार काय आहेत व ते तसे का आहेत याचे ज्ञान तुम्ही करून घेतले पाहिजे. जे हेतू व ज्या उर्मी, ज्या प्रकट वा अप्रकट शक्ती तुम्हाला कृतिप्रवण करतात त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. सारांश असा की, तुम्ही आपल्या अस्तित्वरूपी यंत्राचे भाग सुटे सुटे करून निरखून पारखून पाहिले पाहिजेत.

अशा रीतीने एकदा का तुम्ही जागृत झालात की, तुम्हाला वस्तुस्थिती ओळखता येईल, तिचे पृथक्करण करता येईल. तुम्हाला खाली खेचणाऱ्या शक्ती कोणत्या आणि तुम्हाला साह्यभूत होणाऱ्या शक्ती कोणत्या, हे तुम्हाला ओळखता येईल. योग्य काय नि अयोग्य काय, सत्य काय नि असत्य काय, दिव्य काय नि अदिव्य काय हे एकदा का तुम्हाला समजू लागले की मग जे योग्य, सत्य, दिव्य असेल त्याला धरूनच तुम्ही अगदी काटेकोरपणे आचरण केले पाहिजे. म्हणजेच जे योग्य व दिव्य त्याचा निश्चयपूर्वक स्वीकार करून, तद्विरोधी सर्वांचा त्याग केला पाहिजे.

पदोपदी हे द्वंद्व तुमच्यापुढे उभे राहील आणि पदोपदी तुम्हाला निवड करावी लागेल. तुम्हाला धीर धरावा लागेल, चिकाटीने व सावधगिरीने प्रयत्न करावा लागेल. जणू डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागेल. संतसत्पुरुष सांगतात त्याप्रमाणे, दिव्यत्वाच्या विरोधी असणाऱ्या अदिव्याला कोणतीच संधी मिळू नये यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी अदिव्याला नकार दिला पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 03 : 02]

अमृतवर्षा १०

 

धीर धरा! उगवता सूर्य दररोज प्रात:काळी आपल्या पहिल्यावहिल्या किरणांच्या द्वारे जी शिकवण, जो संदेश या पृथ्वीतलावर प्रक्षेपित करतो आहे, तो ऐका;  तो आशेचा आणि दिलासादायक संदेश असतो. जे रडत आहेत, जे दु:खभोग सहन करत आहेत, जे भयकंपित झाले आहेत, ज्यांना दु:खवेदनांचा अंतच दिसत नाही असे तुम्ही सारे, धीर धरा!

अशी कोणतीच निशा नाही जिच्या अंती उषेचा उदय होत नाही; अंधकार जेव्हा अति घनदाट होतो त्याचवेळी अरुणोदय होतो. सूर्यप्रकाशाने भेदले जाणार नाही असे कोणतेच धुके नसते आणि त्याच्या उज्ज्वल किरणांनी ज्याची कड सोनेरी होत नाही असा कोणताच मेघ नसतो. असा कोणता अश्रू आहे की जो कधीच सुकणार नाही? असे कोणते तुफान आहे की ज्याच्या शेवटी विजयदर्शक इंद्रधनु सप्त किरणांनी चमकणार नाही? सूर्यप्रकाशाने वितळणार नाही असे बर्फ कुठे आहे का?

– श्रीमाताजी [CWM 02 : 44]

अमृतवर्षा ०९

सर्वकाही सर्वांचे आहे. ‘एखादी गोष्ट माझी आहे’ असे म्हणणे वा तसा विचार करणे म्हणजे विलगता, विभाजन निर्माण करण्यासारखे आहे, मात्र वास्तवात असे विभाजन नसतेच. सर्वकाही सर्वांचे आहे, आपण ज्यापासून बनलो आहोत ते मूलद्रव्यदेखील सर्वांचे आहे. क्रमश: होत जाणाऱ्या वाटचालीमधील एका टप्प्यावर, ज्या अणुरेणूंच्या समुदायापासून आपली संरचना झालेली आहे, आणि ज्यांच्यापासून उद्या एक वेगळीच संरचना तयार होणार आहे, ते अणुरेणू, ते मूलद्रव्यसुद्धा सर्वांचे आहे.

काही लोकांकडे पुष्कळशी भौतिक साधनसंपत्ती असते, हे खरे आहे. परंतु वैश्विक कायद्याशी सुसंगत राहायचे असेल तर त्यांनी स्वत:ला, ‘आपण त्या संपत्तीचे विश्वस्त आहोत, राखणदार आहोत’, असे मानले पाहिजे. सर्वांच्या हितासाठी त्याचा विनियोग करावा या हेतूने, त्या संपत्तीची व्यवस्था लावण्यासाठी त्यांच्याकडे ती संपत्ती विश्वासाने सोपविण्यात आलेली असतेहे त्यांना माहीत असले पाहिजे.

“एखादी कल्पना ही माझी आहे” असे जे म्हणतात आणि इतरांना त्याचा लाभ घेऊ देण्याची परवानगी देणे म्हणजे आपण फार मोठा परोपकार करत आहेत असा ज्यांचा विचार असतो, ते मूर्ख असतात. कल्पनांचे हे विश्वही सर्वांचे आहे आणि बौद्धिक शक्ती हीदेखील वैश्विक शक्ती आहे.

– श्रीमाताजी [CWM 02 : 103]

अमृतवर्षा ०८

 

आपली मने आणि हृदये, आपले सर्व विचार, आपल्या सर्व कृती या ईश्वराने पूर्णत: व्यापल्या जाव्यात आणि त्या ‘त्या’च्या महान तेजोमयतेने प्रकाशमान व्हाव्यात या हेतूने एक उत्कट अभीप्सा बाळगून, पूर्ण प्रामाणिकता बाळगून, शुभसंकल्प करत, रोज स्वत:ला ‘सत्यसूर्या’प्रत, ‘परमप्रकाशा’प्रत, या विश्वाच्या उगमाप्रत आणि विश्वाच्या बौद्धिक जीवनाप्रत उन्नत करण्याचा एक निश्चय आपण सर्वांनी केला पाहिजे असे मला वाटते.

तेव्हाच खऱ्या अर्थाने गतकाळातील थोर सत्पुरुषाच्या उपदेशाचे अनुसरण करण्याचा लाभ आणि अधिकार आपण प्राप्त करून घेऊ शकू. ते आपल्याला सांगतात की : ”करूणेने ओथंबलेल्या हृदयानिशी, दुःखपीडेमुळे छिन्नविछिन्न झालेल्या या जगाकडे वळा; मार्गदर्शक व्हा आणि जिथे कोठे अज्ञानांधकार सत्ता गाजवीत असेल तेथे प्रकाशदीप प्रज्वलित करा.”

– श्रीमाताजी [CWM 02 : 29]

अमृतवर्षा ०७

 

आपल्या अंतरंगातील ‘देवता’ कधीही सक्ती करत नाही. कोणतीही मागणी करत नाही किंवा भयदेखील दाखवीत नाही; ती स्वत:चेच आत्मदान करते, प्राणिमात्र आणि वस्तुजात यांच्या हृदयांमध्ये ती दडून बसते; आणि ती स्वत:चेच विस्मरण करविते. ती कोणाला दोष देत नाही, की गुणदोषांचे मोजमाप करत बसत नाही. कोणास शाप देत नाही की कोणाची निंदाही करत नाही. तर ती कोणत्याही प्रतिबंधाविना पूर्णत्व आणण्याचे कार्य अथकपणे करत राहते; कानउघडणी न करता सुधारणा घडवून आणण्याचे, उतावीळपणा न करता प्रोत्साहित करत राहण्याचे कार्य अथकपणे करत राहते. व्यक्तीच्या ग्रहणशीलतेनुसार प्रत्येकाला वैभवसंपन्न करण्यासाठी ती अथकपणे झटत राहते.

ती माऊली आहे. तिच्या प्रेमरूपी फळांकरवी ती भरणपोषण करते; सांभाळ करते आणि रक्षण करते; सल्ला देते व सांत्वन करते; कारण ती सर्वकाही जाणते, ती सर्वकाही सहन करू शकते, ती सर्वांच्या चुका पदरात घेते व क्षमा करते; सर्वांविषयी आशा बाळगते आणि सर्वांना सर्व गोष्टींसाठी सुसज्ज करते.

तिने सर्वकाही तिच्या स्वत:मध्येच धारण केलेले असल्यामुळे, जी सर्वांसाठी असू शकत नाही अशी कोणतीच गोष्ट तिच्या मालकीची नसते. तिची सत्ता सर्वत्रांवर चालत असल्यामुळेच ती सर्वांची सेवकही असते. याच कारणासाठी लहान अथवा थोर, जे कोणी तिच्याबरोबर सत्ताधीश होण्याची किंवा तिच्यामधील देवपद मिळविण्याची इच्छा करतात, ते तिच्याप्रमाणे सर्व बांधवांचे सेवक बनून जातात; जुलमी सत्ताधीश बनत नाहीत.

सेवकाची ही विनम्र भूमिका खरोखर किती सुंदर आहे! सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या ‘ईश्वरा’चे संदेशदूत होणे आणि सर्व वस्तुंना जीवन देणाऱ्या ‘दिव्य प्रेमा’ची अभिव्यक्ती करणे हे ज्यांचे जीवितकार्य आहे त्या सर्वांचीच अशा प्रकारची सेवकाची भूमिका असते.

– श्रीमाताजी [CWM 02 : 42-43]