अंतरंग व बहिरंग भाग यांचे एकत्व
अमृतवर्षा २६
(आपल्या व्यक्तित्वामधील विभिन्न घटकांमध्ये ऐक्य, एकजिनसीपणा कसा निर्माण करावा, हे श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)
संकल्प दृढ ठेवा. आज्ञापालन न करणाऱ्या मुलांना ज्याप्रमाणे योग्य वळण लावले जाते त्याप्रमाणे, तुमच्यातील अडेलतट्टू, हट्टी भागांना वळण लावा. त्यांच्यावर सातत्यपूर्वक, सहनशीलतेने काम करा. त्यांच्या चुका त्यांना समजावून सांगा.
तुमच्या चेतनेच्या आत खोलवर चैत्य पुरुष (Psychic being) असतो. हा चैत्य पुरुष म्हणजे तुमच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’चे मंदिर असते. या केंद्राभोवती तुमच्यातील विभिन्न असणाऱ्या सर्व भागांचे, तुमच्या अस्तित्वातील सगळ्या परस्परविरोधी हालचालींचे एकीकरण झाले पाहिजे. एकदा का तुम्हाला त्या चैत्य पुरुषाची चेतना व त्याची अभीप्सा प्राप्त झाली की, सगळ्या शंका, अडचणी नाहीशा होऊ शकतात. त्याला कमी-अधिक वेळ लागेल, परंतु अंतिमत: तुम्ही यशस्वी होणार हे निश्चित!
एकदा जरी तुम्ही ‘ईश्वरा’कडे वळला असाल आणि म्हणाला असाल की, “मला तुझे होऊन राहायचे आहे”, आणि तो जर “हो” म्हणाला असेल, तर हे अखिल जग सुद्धा तुम्हाला त्यापासून रोखू शकणार नाही. अंतरात्मा (Inner being) जेव्हा स्वत:चे समर्पण करतो तेव्हा मुख्य अडचणच नाहीशी होते.
बाह्य अस्तित्व हे केवळ एखाद्या कवचाप्रमाणे असते. सामान्य व्यक्तींमध्ये हे कवच इतके टणक आणि जाड असते की, त्यामुळे त्यांना त्यांच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’ची यत्किंचितही जाणीव नसते. (परंतु) एकदा, अगदी एका क्षणासाठी जरी, अंतरात्मा म्हणला असेल, “मी इथे आहे आणि मी तुझाच आहे” तर जणू एक प्रकारचा सेतू निर्माण होतो आणि मग ते बाह्य कवच हळूहळू पातळ होत जाते. जोपर्यंत अंतरंग व बहिरंग भाग पूर्णपणे जोडले जाऊन, एकत्व पावत नाहीत तोपर्यंत ही प्रक्रिया चालू राहते.
– श्रीमाताजी [CWM 03 : 07]
- स्वत:ला न फसविणे अवघड - March 16, 2026
- प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन - March 15, 2026
- द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४ - March 14, 2026







