चेतनेचे घटक व तिची परिणामकारकता
विचारशलाका ३५
स्व व वस्तुमात्रांविषयीची जाणीव आणि शक्ती व तिचे सामर्थ्य या दोन घटकांनी ‘चेतना’ बनलेली असते.
जाणीव ही पहिली आवश्यक गोष्ट आहे, तुम्ही योग्य चेतना राखून वस्तुंबाबत जाणीव बाळगली पाहिजे; योग्य प्रकारे, त्यांना त्यांच्यातील सत्याद्वारे जाणून घेतले पाहिजे. पण त्यासाठी केवळ जाणीव असणे पुरेसे नाही. तर चेतना प्रभावी ठरण्यासाठी संकल्प आणि शक्ती असणे आवश्यक आहे.
कोणता बदल होणे आवश्यक आहे, काय निघून जायला हवे, त्याच्या जागी काय यायला हवे, याबाबतीत कदाचित एखाद्याला पूर्ण जाणीव असू शकेल, मात्र तसा बदल घडवून आणण्यास तो असमर्थ असू शकेल. किंवा दुसऱ्या एखाद्याकडे इच्छाशक्ती असू शकेल परंतु, योग्य जाणिवेच्या अभावी ती इच्छाशक्ती योग्य ठिकाणी आणि योग्य रीतीने कशी वापरायची हे समजण्यास तो असमर्थ असू शकेल.
तुम्ही आंतरात्मिक चेतनेमध्ये (Psychic Consciousness) असण्याचा उपयोग असा असतो की, तुमच्याकडे योग्य ती जाणीव असते आणि तुमची इच्छा ही ‘श्रीमाताजीं’च्या इच्छेशी सुसंगत असल्याने, तुम्ही योग्य ते परिवर्तन घडून यावे म्हणून ‘श्रीमाताजींच्या शक्ती’ला आवाहन करू शकता.
पण मन आणि प्राण यांमध्येच ज्या व्यक्ती जगत असतात, अशा व्यक्ती मात्र हे करू शकत नाहीत; अशा व्यक्तींना बरेचदा वैयक्तिक प्रयत्न करणे भाग पडते. तसेच त्यांच्यामधील मनाची व प्राणाची जाणीव, त्यांची इच्छा, त्यांची शक्ती या गोष्टी परस्परांहून विभक्त असतात आणि अपूर्ण असतात; त्यामुळे केलेले कार्यही सदोष असते व ते निर्णायकदेखील नसते. केवळ अतिमानसामध्येच (supermind) ‘जाणीव’, ‘संकल्प’, ‘शक्ती’ या नेहमीच एकत्वाने कार्यरत असतात आणि म्हणून त्या स्वाभाविकपणेच अधिक परिणामकारक असतात.
– श्रीअरविंद [CWSA 28 : 24-25]
- जगाची नवनिर्मिती तरुणच करतील - June 22, 2026
- दुर्गुणांचे शुद्धीकरण - June 18, 2026
- नैतिक शिक्षणाची संधी - June 17, 2026






