विचारशलाका २९
धम्मपद : ज्याप्रमाणे रणक्षेत्रातील हत्ती धनुष्यातून सुटलेले बाण सहन करतो त्याप्रमाणे मी अपमान सहन करेन कारण या जगात अनेक दुष्ट मनाची माणसे आहेत.
पाळीव हत्ती हा रणक्षेत्रामध्ये नेला जातो, त्यावर राजा आरुढ होतो. जो शांतपणे अपमान, निंदा सहन करतो तो माणसांमध्ये उत्तम मनुष्य होय.
श्रीमाताजी : येथे मोठा चांगला सल्ला दिला आहे : रणक्षेत्रातील हत्ती, ज्याला चांगले प्रशिक्षण देण्यात आले असते तो बाणांच्या भडिमाराने इतस्तत: पळायला सुरुवात करत नाही. तो वेदना सहन करतो, एखाद्या वीराने प्रतिकार करावा त्याप्रमाणे वृत्ती राखत तो पुढे पुढे चालतच राहतो. ज्याला योगमार्गाचे अनुसरण करायचे असते, साहजिकपणेच त्याला सर्व प्रकारच्या वाईट इच्छांच्या हल्ल्यांना सामोरे जावेच लागते. कारण इतर जण त्याला केवळ समजून घेऊ शकत नाहीत असे नाही, तर त्यांना जे समजत नाही त्याचा ते द्वेष करू लागतात.
सामान्य माणसे तुमच्याविषयी जे द्वेषपूर्ण उद्गार काढतात त्यामुळे, जर तुम्ही चिंताग्रस्त झालात, दुःखी झालात किंवा नाउमेद झालात तर तुम्ही मार्गावर फार पुढे जाऊ शकणार नाही. अशा गोष्टी तुमच्यापर्यंत येतात कारण तुम्ही दुर्दैवी आहात किंवा तुमच्या नशीबातच सुख नाही असे नसून, उलट दिव्य ‘चेतने’ने व दिव्य ‘कृपे’ने तुमचा संकल्प गांभीर्याने घेतला आहे आणि तुमचा निश्चय किती प्रामाणिक आहे, मार्गातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही किती खंबीर आहात हे पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिस्थितीचा तिने एखाद्या (सोन्याचा) कस पाहणाऱ्या दगडाप्रमाणे (कसोटीचा दगड) म्हणून उपयोग केलेला असतो.
त्यामुळे जर का कोणी तुमचा उपहास केला किंवा कोणी तुमच्याविषयी निंदनीय शब्द उच्चारले तर पहिली गोष्ट तुम्ही ही केली पाहिजे की, अंतर्मुख होऊन, आपल्यातील कोणत्या दुर्बलतेमुळे वा कोणत्या अपूर्णतेमुळे असे घडले ते पाहिले पाहिजे. तसेच तुम्ही उदास, संतप्त किंवा उद्विग्न होता कामा नये, कारण तुमची खरी किंमत काय त्याची लोकांना कदर नसते. त्यापेक्षा तुमचा कोणता दोष, कोणती दुर्बलता वा कोणती विकृती दुरुस्त करायला हवी हे दाखवून दिल्याबद्दल तुम्ही दिव्य ‘कृपे’चे ऋणी असले पाहिजे.
आणि दुःखी होण्याऐवजी, तुम्ही पूर्णपणे संतुष्ट होऊ शकता आणि तुमच्या विरोधात, तुमचे अहित व्हावे म्हणून जो घाट घातला गेला होता त्याचा तुम्ही खूप फायदा करून घेऊ शकता.
तुम्हाला जर खरोखर या योगमार्गाचे अनुसरण करायचे असेल आणि योगसाधना करायची असेल, तर ती तुम्ही कोणत्याही कौतुकासाठी वा सन्मानासाठी करता कामा नये. ती तुमच्या जिवाची अनिवार्य अशी निकड असली पाहिजे, कारण तुम्ही त्याव्यतिरिक्त कोणत्याही इतर मार्गाने आनंदीच होऊ शकणार नाही, त्यासाठी तुम्ही ती केलीच पाहिजे. लोकांनी तुमची प्रशंसा केली काय किंवा नाही केली काय, ती गोष्ट अजिबात महत्त्वाची नाही. तुम्ही आधीच स्वत:ला हे समजावले पाहिजे की, तुम्ही सामान्य माणसांपेक्षा जेवढे अधिक प्रगत व्हाल, आणि जसजसे तुम्ही सामान्य जीवनपद्धतीला परके व्हाल, तेवढे लोकं तुमची प्रशंसा कमी करू लागतील; कारण साहजिकच आहे की, तुम्हाला ते नीट समजून घेऊ शकणार नाहीत. आणि मी पुन्हा एकवार सांगते की, हे अजिबात महत्त्वाचे नाही.
तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहूच शकत नाही म्हणून, मार्गावर प्रगत होत राहण्यामध्येच खरी प्रामाणिकता सामावलेली आहे. तुम्ही दिव्य जीवनासाठी स्वत:ला समर्पित करता कारण त्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही; तुम्ही स्वत:चे रूपांतरण करण्यासाठी धडपडता, प्रकाशाला उन्मुख होता कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही, कारण तेच तुमच्या जीवनाचे प्रयोजन असते. जेव्हा हे असे असते तेव्हा खात्री बाळगा की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.
– श्रीमाताजी [CWM 03 : 282-284]
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०५ - April 17, 2025
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०४ - April 16, 2025
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०३ - April 15, 2025