विचारशलाका – ०५

साधक : आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा आम्ही बाळगली पाहिजे का?

श्रीमाताजी : आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा बाळगण्यापेक्षा, प्रगतीची आस बाळगणे किंवा अधिक सचेत, अधिक जागृत होण्याविषयी आस बाळगणे किंवा चांगले काही करावे, चांगले बनावे अशी आकांक्षा बाळगणे अधिक सुज्ञपणाचे आहे, असे मला वाटते. कारण आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा बाळगण्यातून, कमीअधिक काल्पनिक आणि भ्रामक अनुभवांची दारे उघडू शकतात, उच्च गोष्टींचे रूप धारण करणाऱ्या प्राणिक हालचालींची दारे उघडू शकतात. त्याद्वारे व्यक्ती स्वत:चीच फसवणूक करून घेऊ शकते. आध्यात्मिक अनुभव हे वस्तुत: केवळ ‘अनुभवासाठी अनुभव’ अशा पद्धतीने येता कामा नयेत तर, ते सहजस्फूर्तपणे आले पाहिजेत, आंतरिक प्रगतीचा परिणाम म्हणून आले पाहिजेत.

*

आध्यात्मिक अनुभव म्हणजे स्वत:मधील किंवा बाहेरील, ‘ईश्वरा’च्या संपर्कात येणे. हा अनुभव सर्व देशांमध्ये, सर्व माणसांमध्ये, सर्व काळामध्ये सारखाच असतो. तुम्हाला जर ‘ईश्वर’ भेटला तर तो तुम्हाला नेहमीच सर्वत्र सारख्याच प्रकारे भेटतो. (आलेल्या अनुभवाचे वर्णन, ‘कोणी येशू ख्रिस्ताचे दर्शन झाले’ असे करतो तर ‘कोणी श्रीकृष्णाचे दर्शन झाले’ असे करतो, हा असा फरक पडतो.) कारण, आलेला अनुभव आणि त्याची शब्दांतील मांडणी यामध्ये एक खोल दरी असते. तुम्हाला प्रत्यक्ष आध्यात्मिक अनुभव येतो तो तुमच्या ‘आंतरिक चेतनेमध्ये’ आणि तो शब्दांकित केला जातो तुमच्या ‘बाह्य चेतनेमध्ये’! तुमचे शिक्षण, तुमची श्रद्धा, तुमच्या मानसिक वृत्तीप्रवृती यानुसार तो शब्दांकित केला जातो. केवळ एकच सत्य, एकच सद्वस्तु अस्तित्वात आहे, पण ते सत्य, ती सद्वस्तु ज्या रूपांमधून अभिव्यक्त होते ती रूपे मात्र अनंत आहेत.

– श्रीमाताजी [CWM 06 : 432], [CWM 03 : 17]

श्रीमाताजी