वेळेचा सदुपयोग
आध्यात्मिकता ४०
(पूर्वार्ध)
जीवनामध्ये कित्येक वेळा एक प्रकारचे रिकामपण जाणवते, कधी एखादा रिकामा क्षण, किंवा काही मिनिटे, किंवा कधीकधी त्याहूनही अधिक वेळ मिळतो. आणि तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही स्वतःचे लक्ष लगेचच दुसरीकडे कोठेतरी वळविण्याचा प्रयत्न करता आणि वेळ जाण्यासाठी मूर्खपणाच्या या नाहीतर त्या गोष्टी शोधून काढता. ही अगदी सार्वत्रिक बाब आहे. लहानमोठे सारेच जण, कंटाळा येऊ नये म्हणून, काही ना काही तरी करत राहण्यात वेळ घालवितात. कंटाळा या गोष्टीचा त्यांना सर्वात जास्त तिटकारा असतो आणि त्या कंटाळ्यापासून सुटका करून घेण्याचा त्यांचा मार्ग म्हणजे मूर्खपणाच्या गोष्टी करत राहणे हा असतो.
पण, कंटाळ्यापासून सुटका करून घेण्याचा, त्यापेक्षा एक अधिक चांगला मार्ग आहे, तो म्हणजे स्मरण ठेवणे. तुमच्याजवळ जेव्हा थोडासा रिकामा वेळ असतो, एक तास असो किंवा काही मिनिटे असोत, स्वतःला सांगा, “निदान आता तरी मला काही वेळ एकाग्र होण्यासाठी, विखुरलेल्या ‘मी’चे एकत्रीकरण करण्यासाठी, जीवनाचे प्रयोजन जगण्यासाठी, ‘सत्य’ आणि ‘शाश्वता’प्रत स्वतःला समर्पित करण्यासाठी मिळाला आहे.”
तुम्ही जेव्हा बाह्य परिस्थितीने गांजलेले नसता तेव्हा, त्या प्रत्येक वेळी तुम्ही जर अशा गोष्टी केल्यात तर, तुम्ही या मार्गावर वेगाने प्रगती करत आहात, असे तुम्हाला आढळेल. तुमचा वेळ वायफळ गप्पांमध्ये, निरुपयोगी गोष्टींमध्ये, तुमची चेतना ज्यामुळे निम्नतर पातळीवर उतरते अशा गोष्टींचे वाचन करण्यामध्ये घालविण्यापेक्षा; तसेच तुम्हाला चंचल, विचलित करणाऱ्या इतर सर्व गोष्टींमध्ये वेळ घालविण्यापेक्षा, वर सांगितलेल्या गोष्टींसाठी म्हणजेच योग्य कारणांसाठी वेळ व्यतीत करणे अधिक उत्तम.
– श्रीमाताजी [CWM 03 : 250]
- चैत्य पुरुष म्हणजे काय? - September 14, 2026
- तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व - September 13, 2026
- दिव्य अस्तित्वाचा शोध - September 11, 2026






