जीवनाचे रूपांतर

आध्यात्मिकता २६

जीवनाचा त्याग करणे ही खरी आध्यात्मिकता नव्हे, तर ‘ईश्वरी पूर्णत्वा’च्या साहाय्याने जीवन परिपूर्ण बनविणे ही खरी आध्यात्मिकता असते. भारताने आता जगाला ही खरी आध्यात्मिकताच दाखविली पाहिजे.

*

आध्यात्मिकतेच्या दृष्टीने पहिले असता भारत हा जगातील अग्रगण्य देश आहे. आध्यात्मिकतेचे आदर्श उदाहरण घालून देणे हे त्याचे जीवितकार्य आहे. आणि जगाला ही शिकवण देण्यासाठी श्रीअरविंदांनी या भूतलावर देह धारण केला.

*

खरी आध्यात्मिकता जीवनाचे रूपांतर घडविते.

*

मनुष्यामध्ये अभीप्सेच्या बिजाला जर खऱ्या आध्यात्मिकतेचे खतपाणी दिले तर तो ‘दिव्यत्वा’मध्ये विकसित होईल.

*

आध्यात्मिकता म्हणजे परम साधेपणा. खरी आध्यात्मिकता ही अतिशय साधी सरळ असते.

*

कर्मामध्ये ‘पूर्णत्वा’साठी असलेली ओढ ही खरी आध्यात्मिकता असते.

*

तुम्ही आध्यात्मिकतेच्या त्या स्तराशी संबंधित आहात ज्या स्तरावर जडभौतिकाला नकार देण्याची आवश्यकता असते आणि जी आध्यात्मिकता जडभौतिकापासून सुटका करून घेऊ इच्छित असते. परंतु ‘उद्याची आध्यात्मिकता’ ही जडभौतिकाला हाती घेईल आणि तिचे रूपांतर घडवून आणेल.

– श्रीमाताजी [CWM 13 : 357, 13 : 244, 14 : 32, 14 : 75, 14 : 151, 14 : 306, 15 : 85]

श्रीमाताजी