बहुधा कोणतेही दोन मार्ग अगदी एकसारखेच असत नाहीत, प्रत्येकाने स्वत:चा मार्ग स्वत:च शोधला पाहिजे. पण येथे व्यक्तीने एक चूक करता कामा नये; ती म्हणजे तो मार्ग ‘तर्कबुद्धी’ने ‘शोधता’ कामा नये, तर तो मार्ग ‘अभीप्से’च्या (Aspiration) आधारे ‘शोधला’ पाहिजे. अभ्यास आणि विश्लेषण यांद्वारे नव्हे तर, अभीप्सेची तीव्रता आणि आंतरिक उन्मुखतेबद्दलचा (Inner opening) प्रामाणिकपणा यांच्या माध्यमातून तो मार्ग शोधला पाहिजे.
व्यक्ती खरोखर आणि पूर्णपणे जेव्हा त्या आध्यात्मिक ‘सत्या’प्रतिच अभिमुख झालेली असते, – मग त्याला नाव कोणतेही दिलेले असूदे, जेव्हा बाकी सर्व गोष्टी तिच्या दृष्टीने गौण ठरतात, जेव्हा ते आध्यात्मिक सत्यच तिच्या लेखी अपरिहार्य आणि अटळ गोष्ट बनते, तेव्हा त्याकडून उत्तर मिळण्यासाठी, त्याकडून प्रतिसाद मिळण्यासाठी तीव्र, निरपवाद, संपूर्ण एकाग्रतेचा केवळ एक क्षणदेखील पुरेसा असतो. अशा उदाहरणामध्ये अनुभव आधी येतो, नंतर त्याचा परिणाम आणि स्मृती म्हणून त्या अनुभवाची मांडणी स्पष्ट होते. आणि अशा रीतीने वाटचाल केल्यास, व्यक्तीकडून कोणतीही चूक होण्याची शक्यता उरत नाही….
हे तुमच्यासाठी चांगले असते, हेच केवळ आवश्यक असते. मात्र ती काहीही असू दे, अगदी ती स्वयंपूर्ण असली तरीदेखील तुम्ही जेव्हा ती इतरांवर लादू पाहता तेव्हा ती मिथ्या बनते…
…मार्ग दाखविला पाहिजे, प्रवेशद्वारे खुली केली पाहिजेत मात्र प्रत्येकाने स्वत:चाच मार्ग अनुसरला पाहिजे, त्या प्रवेशद्वारांमधून जात, स्वत:च्या वैयक्तिक साक्षात्काराच्या दिशेने स्वत:च वाटचाल केली पाहिजे.
अशा वेळी, केवळ एकच मदत मिळू शकते आणि तीच स्वीकारली पाहिजे; ती मदत असते ‘ईश्वरी कृपेची’! ही कृपा, प्रत्येकामध्ये ज्याच्या त्याच्या गरजेनुरूप, स्वत:ची अशी योजना करीत असते.
– श्रीमाताजी
(CWM 09 : 406-407)
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०५ - April 17, 2025
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०४ - April 16, 2025
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०३ - April 15, 2025