कृतज्ञता – १६
प्राण्यांचे मन अगदी अर्धविकसित असते. अविरत चालणाऱ्या विचारमालिकांमुळे माणसांची जशी छळवणूक होते तशी, प्राण्यांची होत नाही. उदाहरणार्थ, त्यांच्याशी कोणी प्रेमाने वागले तर, त्यांच्यामध्ये अगदी सहजपणे कृतज्ञतेची भावना निर्माण होते.
पण हेच जर माणसांबाबतीत घडले तर, १०० पैकी ९९ वेळा माणसे विचार करायला लागतात. मनाशीच म्हणतात, ”अमुक एक व्यक्ती माझ्याशी चांगली वागली, त्यामध्ये तिचा नक्की काय हेतू असेल बरे?” मानसिक क्रियांपैकी ही एक मोठी दुःखद बाब आहे. मात्र प्राणी यापासून मुक्त असतात आणि म्हणून जेव्हा तुम्ही त्यांच्याशी ममत्वाने वागता तेव्हा, ते अगदी सहजपणे तुमच्याविषयी कृतज्ञ राहतात. त्यांचा विश्वास असतो. त्यांचे प्रेम तशा प्रकारचे असते आणि मग त्याचे रूपांतर अगदी घट्ट अशा जवळिकीमध्ये होते. तुमच्या भोवती भोवती घुटमळत राहण्याची एक अदम्य अशी निकड त्यांना भासू लागते.
त्यात आणखीही काही असते. म्हणजे जर मालक खरोखरच चांगला असेल आणि प्राणी विश्वासू असेल तर, त्यांच्यामध्ये एक प्रकारे प्राणिक आणि आंतरात्मिक शक्तींचे आदानप्रदान होते; हे आदानप्रदान प्राण्यांच्या दृष्टीने खूपच सुंदर, अद्भुत असते; ते त्यांना उत्कट आनंद मिळवून देते. अशा प्रकारे, जेव्हा त्यांना तुमच्या जवळ राहायचे असते आणि जेव्हा तुम्ही त्यांना हृदयाशी कवळून घेता तेव्हा, त्यांना आतूनच ते स्पंदन जाणवते. व्यक्ती त्यांना ती शक्ती देते – प्रेमाचे सामर्थ्य, हळुवारतेचे, सौहार्दाचे, संरक्षणाचे, सारे सारे काही – त्यांना जाणवते आणि त्यांच्यामध्ये त्या व्यक्तीविषयीचा एक खूप गाढ असा अनुबंध निर्माण होतो. इतकेच काय पण त्यामधून, कुत्री, हत्ती आणि घोड्यांसारख्या वरच्या श्रेणीतील प्राण्यांमध्ये तर, अगदी उत्स्फूर्तपणे एक प्रकारची भक्तीची गरज निर्माण होते. (मनाच्या सर्व तार्किकतेनेही किंवा युक्तिवादांनीही ती नाकारता येत नाही.) ती मुळातच अगदी विशुद्ध आणि उत्स्फूर्त अशी भावना असते.
मनुष्यामध्ये मनाचे कार्य सुरू झाले तेव्हा, त्याच्या अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये, त्याच्या पहिल्यावहिल्या आविष्करणामध्ये, त्याने अनेक गोष्टी बिघडवून टाकल्या, ज्या वास्तविक पूर्वी खूप सुंदर होत्या.
तेव्हा हे उघड आहे की, माणूस जर उच्चतर पातळीवर जाईल आणि त्याच्या बुद्धीचा सुयोग्य उपयोग करेल तर, त्यामुळे गोष्टींना अधिक मूल्य प्राप्त होईल. पण या दोहोंच्या दरम्यान, एक असा प्रांत आहे की, जेथे माणूस त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर अगदी असभ्य आणि खालच्या पातळीवरून करतो. तो मनाला हिशोबाचे, वर्चस्वाचे, फसवणुकीचे साधन बनवितो आणि त्यामुळे ते मन कुरूप होऊन जाते. मला जीवनात असे काही प्राणी माहीत आहेत की, ज्यांना मी माणसांपेक्षाही अधिक श्रेष्ठ समजत असे. कारण तो घृणास्पद हिशोबीपणा, दुसऱ्यांना फसवायचे आणि स्वतःचा लाभ करून घेण्याची इच्छा त्या प्राण्यांच्या ठिकाणी नसायची. असेही काही प्राणी असतात की, जे माणसाच्या सहवासात आल्यानंतर या साऱ्या गोष्टी शिकतात, पण काही प्राणी असे असतात की, ज्यांच्या ठायी याचा लवलेशही नसतो.
या जगातील चैत्य जाणिवेच्या (psychic consciousness) अनेकविध सुंदर रूपांपैकी, ‘निरपेक्ष, निर्व्याज कृती’ हे एक सर्वोत्तम रूप आहे. (उत्क्रांतीच्या श्रेणीमध्ये प्राणिजगताकडून मनुष्यजगताकडे) तुम्ही मानसिक गतिविधींच्या दिशेने जसजसे वरवर चढू लागता तसतशी ही निरपेक्ष, निर्व्याज कृती दुर्मिळ होऊ लागल्याचे आढळते. कारण बुद्धी आली की त्या बुद्धीच्या बरोबरीने सर्व चलाखी, अक्कलहुशारी, भ्रष्टपणा, देवाणघेवाण यांची सुरुवात होते.
उदाहरणार्थ असे पाहा की, जेव्हा एखादे गुलाबाचे फूल उमलते तेव्हा ते अगदी सहज-स्वाभाविकपणे उमलते. सुंदर असण्याच्या आनंदाने, मधुर सुगंध देण्यासाठी, जीवनाचा आनंद अभिव्यक्त करण्यासाठी ते उमलते; कोणत्याही लाभहानीचा ते विचार करत बसत नाही, त्याला त्यामधून काही मिळवायचे नसते, ते अगदी सहजस्फूर्तपणे, अस्तित्वाच्या आणि जीवनाच्या आनंदाने बहरून येते. आणि आता याच्या जागी, उदाहरण म्हणून मनुष्याचा विचार करू. काही सन्माननीय अपवाद वगळता, ज्या क्षणी मनुष्याचे मन सक्रिय होते त्याच क्षणी मन त्या सौंदर्यापासून आणि हुशारीपासून काही लाभ मिळवू पाहते; त्यापासून काहीतरी मिळावे अशी त्याची अपेक्षा असते, लोकांकडून स्तुती किंवा कौतुक किंवा त्याहीपेक्षा जास्त असा काहीतरी लाभ व्हावा अशी त्याची अपेक्षा असते. परिणामत: चैत्य दृष्टिकोनातून पाहिले असता, गुलाबाचे फूल हे माणसापेक्षा अधिक चांगले असते.
– श्रीमाताजी
(CWM 05 : 239-240)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…