‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

ब्रिटिश शासनाची अरविंद घोष यांच्यावर कायमच वक्र दृष्टी राहिली. त्यांच्याबद्दल ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये ‘भारतातील सर्वात भयानक माणूस म्हणजे अरविंद घोष’ अशी चर्चा असे. ‘वंदे मातरम्’ ह्या वृत्तपत्राच्या लेखनामध्ये अरविंदांचा हात आहे असा ब्रिटिश सरकारला संशय होता आणि त्यामुळे राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यासाठी ब्रिटिश सरकार अगदी उत्सुक होते. अरविंदांच्या नावाने अटक वॉरंट निघाले. या घटनेने आजवर गुप्तपणे कार्यरत असलेले अरविंद एका रात्रीत नेते म्हणून प्रसिद्धीस आले. तेव्हा भारतभरातून वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी या घटनेची दखल घेतली. ‘मराठा’ वृत्तपत्रात लोकमान्य टिळकांनी लिहिले, “कोणी सांगावे जे कृत्य आज राजद्रोह म्हणून गणले जात आहे ते उद्या दैवी सत्य म्हणून गणले जाईल.”

दि. ०८ सप्टेंबर १९०७ च्या अंकात गुरूदेव रवीन्द्रनाथ टागोरांनी अरविंदांना अभिवादन करणारी कविता बंगालीतून लिहिली. ‘Salutation’ या नावाने असलेल्या या कवितेमध्ये त्यांनी अरविंदांना उद्देशून ‘देशमित्र’, ‘अवतारी व्यक्तिमत्त्व’, ‘भारताचा आत्मा’ अशी विविध विशेषणे योजिली आहेत.

अरविंद यांना जेव्हा अटक झाली तेव्हा देशबंधू चित्तरंजन दास यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले होते. खटल्याच्या दरम्यान न्यायाधीशांसमोर अपील करताना त्यांनी अरविंदांविषयी जे उद्गार काढले ते प्रसिद्ध आहेत. ते म्हणाले होते, “हे सगळे वितंडवाद जेव्हा शांत झालेले असतील, ही सगळी धामधुम, ही सगळी आंदोलने थंड झालेली असतील, भविष्यात जेव्हाकेव्हा अरविंद या जगाचा निरोप घेतील तेव्हा ते ‘देशभक्त कवी’, ‘राष्ट्रवादाचे प्रणेते’ आणि ‘मानवतेचे प्रेमी’ म्हणून ओळखले जातील. ते गेल्यानंतरही त्यांचे शब्द पुनःपुन्हा या भारतातच नव्हे, तर दूरदेशी आणि साता समुद्रापारही घुमत राहतील.” आणि कालौघात आज हे शब्द अक्षरश: खरे ठरत आहेत. (क्रमश:)

अभीप्सा मराठी मासिक