क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला ‘भारत’ – १९
(इ. स. १९१२)
सर्व प्रकारच्या संधी आणि संकटांमधून, काही मोजक्या किंवा अनेकांच्याद्वारे, सातत्याने उच्चतर ज्ञान जतन व्हावे म्हणून ‘ईश्वर’ स्वतःसाठी असा एक खास देश निवडतो आणि सद्यस्थितीत, या ‘चतुर्युगा’मध्ये तो देश ‘भारत’ आहे. जेव्हा कधी तो ‘ईश्वर’ अज्ञानाचे, द्वैताचे, संघर्षाचे, वेदनेचे आणि अश्रुंचे, दुर्बलतेचे, स्वार्थीपणाचे, तामसिक व राजसिक सुखोपभोगांचे, थोडक्यात म्हणजे ‘कालीच्या लीले’चे पूर्ण सौख्य उपभोगण्याची निवड करतो तेव्हा, तो भारतातील ज्ञान मंद करतो, भारताला दुर्बलतेमध्ये आणि अवनतीमध्ये लोटतो; जेणेकरून भारताने स्वतःमध्येच विश्राम करावा आणि त्याच्या लीलेच्या गतिविधींमध्ये हस्तक्षेप करू नये. जेव्हा त्याला स्वतःला या दलदलीतून वर उठण्याची इच्छा होते आणि मानवातील ‘नारायण’ हा पुन्हा एकदा बलवान, प्रज्ञावान आणि आनंदपूर्ण बनावा असे त्याला वाटते; तेव्हा तो भारतामध्ये ज्ञानवर्षाव करतो आणि भारताची अशा रीतीने उन्नती घडवून आणतो की जेणेकरून, भारताने ज्ञान व त्याचा परिणाम म्हणून येणारी बलवत्ता, प्रज्ञा आणि आनंद या गोष्टी अखिल विश्वाला प्रदान कराव्यात. जेव्हा ज्ञानाचे संकोचन झाल्याची प्रवृत्ती आढळून येते, तेव्हा ‘भारता’तील योगी हे या विश्वापासून दूर होत, स्वतःच्या मुक्तीसाठी व आनंदासाठी किंवा काही मोजक्या शिष्यांच्या मुक्तीसाठी योगाभ्यास करतात; पण जेव्हा ज्ञानप्रवृत्ती पुन्हा एकदा प्रसरण पावते तेव्हा त्याबरोबर ‘भारता’चा आत्माही विस्तार पावतो, तेव्हा ते योगी पुनश्च पुढे येतात आणि या जगामध्ये, जगासाठी कार्य करत राहतात. जनक, अजातशत्रू, कार्तवीर्य यांसारखे योगी मग पुन्हा विश्वसिंहासनावर विराजमान होतात आणि राष्ट्रांवर राज्य करू लागतात.
– श्रीअरविंद
(CWSA 13 : 71-72)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४५ - December 13, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ - December 12, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ - December 11, 2025







