जीवनाचे स्वरूप
विचार शलाका – १४
तुम्ही जर ‘दिव्य चेतने’शी एकरूप झालेले असाल तर, जी गोष्ट करायची आहे ती करायला मानवी गणनेनुसार एक वर्ष लागते की हजार वर्षे लागतात, या गोष्टीला फारसे काही महत्त्व नाही; कारण तेव्हा तुम्ही मानवी प्रकृतीच्या सर्व गोष्टी तुमच्या बाहेर ठेवता आणि ‘दिव्य प्रकृती’च्या अनंततेमध्ये आणि शाश्वततेमध्ये प्रवेश करता. तेव्हा मग, घाईगडबडीच्या अतीव उत्सुकतेच्या भावनेपासून तुमची सुटका झालेली असते. माणसं अक्षरशः या भावनेमुळे पछाडलेली असतात कारण त्यांना गोष्टी पूर्ण झालेल्या पाहायच्या असतात. क्षोभ, घाईगडबड, अस्वस्थता या गोष्टीतून काहीच साध्य होत नाही. या गोष्टी समुद्रावरील फेसासारख्या असतात; जर सतत धावपळ करत राहिले नाही आणि कोणत्यातरी कार्यांत स्वतःला झपाटल्यासारखे गुंतवून घेतले नाही तर, आपण काहीच करत नाहीये अशी माणसांची एक समजूत झालेली असते. या सगळ्या तथाकथित हालचालींमुळे गोष्टी बदलतात असे मानणे हा एक भ्रम आहे. जणू एखादा कप घ्यावा आणि त्यामध्ये पाणी ढवळत राहावे तसे हे आहे. ते पाणी हिंदकळताना दिसते पण तुमच्या त्या ढवळण्याने त्या पाण्यामध्ये तीळमात्रही बदल झालेला नसतो. असा कार्यभ्रम हा मानवी प्रकृतीच्या मोठमोठ्या भ्रमांपैकी एक मोठा भ्रम आहे. यामुळे प्रगतीला बाधा पोहोचते कारण त्यामुळे सतत काहीतरी उत्तेजित हालचाली करत राहण्याची घाई करण्याची आवश्यकता तुम्हाला भासत असते. जर तुम्हाला यातील भ्रम कळेल आणि हे किती निरुपयोगी आहे, त्यामुळे कोणतीच गोष्ट बदलत नाही, हे कळेल तर किती बरे होईल! तुम्हाला यामधून काहीच साध्य होत नसते. अशा रीतीने जे घाईगडबडीत असतात ती माणसं शक्तींच्या हातातील साधने असतात, आणि अशा माणसांना त्या शक्ती स्वतःच्या मनोरंजनासाठी नाचायला लावत असतात; आणि या शक्ती चांगल्या नसतात.
या जगामध्ये ज्या कोणत्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या अशा व्यक्तींकडून घडलेल्या आहेत की ज्या व्यक्ती कृतींच्या पलीकडे, शांतीमध्ये उभ्या राहू शकतात. कारण या व्यक्ती ‘ईश्वरी शक्ती’ची माध्यमं असतात. अशा व्यक्ती सक्रिय प्रतिनिधी असतात, जागृत साधने असतात. या व्यक्ती अशा शक्तींचे अवतरण घडवितात ज्यामुळे हे विश्व बदलून जाते. गोष्टी अशा प्रकारे घडविल्या जातात, घाईगर्दीच्या कृतीमुळे नाहीत. शांती, शांतता आणि स्थिरतेमध्येच या विश्वाची रचना झाली आणि जेव्हा कधी खरेखुरे असे काही घडवायचे असते, तेव्हा ते शांती, शांतता आणि स्थिरतेमध्येच केले पाहिजे. जगासाठी काही करावयाचे तर सर्व प्रकारच्या निष्फळ गोष्टींवर काम करत सकाळपासून रात्रीपर्यंत धावत राहिले पाहिजे, ही समजूत अज्ञानीपणाची आहे.
एकदा का तुम्ही या गरगर फिरणाऱ्या शक्तींपासून मागे हटून शांत प्रांतामध्ये प्रवेश केलात की, मग तुमच्या लक्षात येईल की, तो केवढा मोठा भ्रम होता. माणसं म्हणजे आंधळ्या प्राण्यांचा एक समूह आहे आणि ते काय करत आहेत, ते का करत आहेत हे काहीही माहीत नसताना उगाच धडपडणाऱ्या, एकमेकांवर आदळणाऱ्या आणि ठोकरा खाणाऱ्या प्राण्यांचा तो समूह आहे, असे तुम्हाला वाटू लागेल. आणि यालाच ते कर्म आणि जीवन असे संबोधत असतात. ही तर फक्त पोकळ खळबळ असते, हे कर्म नव्हे, हे खरे जीवन नाही.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 66-67)
- स्वत:ला न फसविणे अवघड - March 16, 2026
- प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन - March 15, 2026
- द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४ - March 14, 2026





