ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

धक्के-चपेटे यांची जीवनात आवश्यकता काय?

ईश्वरी कृपा – १०

(तुम्ही केलेल्या धाव्याला ईश्वरी कृपेने प्रतिसाद दिला आणि नंतर ईश्वरी कृपेमुळे आपण संकटातून, अडचणीमधून बाहेर पडलो हे विसरलात तर काय होते, त्याबद्दल श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)

तुम्ही कडीकोयंडा लावून दरवाजा बंद करून टाकता आणि त्यानंतर मग तुम्ही काहीही ग्रहण करू शकत नाही. तुमच्या अशा प्रकारच्या आंतरिक मूर्खपणापासून स्वतःला बाहेर काढण्यासाठी तुम्ही स्वतः काहीच करू शकत नाही, याची तुम्हाला पुन्हा एकदा जाणीव व्हावी म्हणून, पुन्हा एखादा तीव्र झटका, एखादी भयानक अडचण आवश्यक होऊन बसते. कारण आपण शक्तिहीन आहोत याची जाणीव जेव्हा तुमच्यामध्ये वाढू लागते तेव्हाच, तुम्ही थोडेसे खुले आणि लवचीक होऊ लागता. कारण, तुम्ही जे काही करता ते तुमच्या स्वतःच्या कौशल्यावर आणि तुमच्या स्वतःच्या क्षमतांवर अवलंबून आहे असे जोवर तुम्हाला वाटत असते तोवर, तुम्ही एकच दरवाजा बंद करता असे नाही, तर खरोखरच तुम्ही एकापाठोपाठ अनेक दरवाजे बंद करत असता, अगदी कडीकोयंडे लावून ते बंद करत असता. तुम्ही जणू काही एखाद्या गढीमध्ये स्वतःला बंद करून घेता आणि मग त्यामध्ये कोणत्याच गोष्टीचा प्रवेश होऊ शकत नाही. ही मोठीच उणीव आहे, व्यक्ती चटकन साऱ्या गोष्टी विसरून जाते. स्वाभाविकपणे ती स्वतःच्याच क्षमतांवर समाधानी राहते.

प्रामाणिक असणे खरोखरच खूप कठीण असते… आणि म्हणूनच धक्क्या-चपेट्यांची संख्या वाढते आणि ते आघात कधी कधी अधिक भयानक होतात कारण तुमच्यामधील मूर्खपणा मोडीत काढण्याचा तो एकमेव मार्ग असतो; याप्रकारे आपत्तींचे स्पष्टीकरण करता येते. फक्त जेव्हा तुम्ही अतीव वेदनादायी अशा परिस्थितिमध्ये सापडलेले असता आणि तुमच्यावर खोलवर परिणाम करेल अशा परिस्थितिला तुम्हाला सामोरे जावे लागते, तेव्हा तुमच्यातील मूर्खपणा काही अंशाने का होईना नाहीसा होतो. पण तो अगदी काही अंशाने जरी नाहीसा झाला तरी, अजूनही आतमध्ये काहीतरी शिल्लक राहतेच. आणि म्हणूनच या साऱ्या गोष्टी इतक्या दीर्घकाळ चालू राहतात…

आपण म्हणजे कोणीच नाही, आपण काहीच करू शकत नाही, आपण अस्तित्वातच नाही, आपण खरोखर अगदी कोणीच नाही, त्या दिव्य चेतनेखेरीज आणि ईश्वरी कृपेखेरीज खरोखर कोणते अस्तित्वच नाही, याची व्यक्तिला खोल अंतःकरणात जाण येण्यासाठी, जीवनामध्ये कितीतरी धक्केचपेटे आवश्यक असतात. आणि ज्या क्षणी व्यक्तिला या गोष्टीची जाण येते तेव्हा सारे (दुःखभोग) संपलेले असतात, साऱ्या अडचणी नाहीशा झालेल्या असतात. व्यक्तिला हे पूर्णपणे कळावे लागते आणि त्याला विरोध करणारे तिच्यामध्ये काहीच शिल्लक राहता कामा नये… अर्थात या गोष्टीला खूप काळ लागतो.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 323-324)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…

14 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा‌ या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…

5 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…

6 days ago