‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १२
ईश्वर स्वत:बरोबर परिपूर्ण स्थिरता आणि शांती घेऊन येत असतो. हे खरे आहे की, भक्तांचा एक विशिष्ट असा वर्ग स्वत:चे एक वेगळेच चित्र निर्माण करतो; ते उड्या मारतात, रडतात, हसतात, गातात. त्यांचे म्हणणे असे असते की, ह्या साऱ्या गोष्टी ते भक्तिच्या आवेशात करत असतात. पण वास्तविक ही मंडळी दिव्यत्वामध्ये वास करत नसतात तर ते बहुतांश प्रमाणात प्राणिक जगतामध्ये जगत असतात….
तुमच्यापाशी सशक्त देह आणि सुदृढ स्नायू असले पाहिजेत. तुमच्या बाह्य अस्तित्वामध्येदेखील समत्वाचा भक्कम पाया असलाच पाहिजे. तुमच्यापाशी जर असा भक्कम पाया असेल तर, तुम्ही अंतरंगामध्ये भावनांचे विश्व सामावून घेऊ शकाल आणि तरीही तुम्ही कोणताही आक्रोश करणार नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही भावावेग व्यक्त करू शकत नाही, परंतु तुम्ही तो सुंदर रीतीने, सुसंवादी पद्धतीने व्यक्त करू शकता. रडणे, आरडाओरडा करणे किंवा नाचणे-उडणे या नेहमीच दुर्बलतेच्या खुणा असतात; मग ही दुर्बलता प्राणिक असेल, मानसिक असेल किंवा शारीरिक प्रकृतीची असेल; पण स्तर कोणताही असला तरी सर्वच स्तरावर या कृती म्हणजे स्व-संतुष्टतेच्या कृती असतात. जी व्यक्ती नाचते, उड्या मारते, आरडाओरडा करते त्या व्यक्तीला असे वाटत असते की, तिचा हा आवेग काहीतरी असामान्य आहे. अशावेळी खरेतर त्या व्यक्तीची प्राणिक प्रकृती त्यामध्ये आनंद घेत असते.
जर तुम्हाला ईश्वरी अवतरणाचा दाब (pressure) पेलायचा असेल तर तुम्ही खूप सुदृढ, शक्तिशाली असले पाहिजे, नाहीतर तुमचे नाहीतर तुमचे तुकडे तुकडे होऊन जातील. काही लोकांनी असे विचारले, ”ईश्वर अजून अवतरित का होत नाही?” तर त्याचे उत्तर, ”अजून तुम्ही तयार नाही,” हे आहे. सद्वस्तुच्या अवतरणाचा एखादा अल्पसा थेंब जर तुम्हाला गायला, नाचायला आणि आरडाओरडा करायला लावत असेल तर, जर संपूर्ण सद्वस्तुच खाली अवतरली तर काय होईल?
म्हणूनच आम्ही सांगत असतो की, ज्या लोकांकडे देह, प्राण आणि मन यांच्यामध्ये एक भक्कम, सुस्थिर आणि विशाल पाया नाही त्यांनी ईश्वरी शक्ती खेचू नये. याचा अर्थ असा की, ”ईश्वरी शक्ती खाली ओढण्याचा प्रयत्न करू नका तर, शांती आणि स्थिरता धारण करून वाट पाहा.” याचे कारण अशा व्यक्ती ते अवतरण पेलू शकणार नाहीत. परंतु ज्यांच्याकडे असा आवश्यक पाया आहे, अधिष्ठान आहे त्यांना आम्ही उलट सांगतो की, अभीप्सा बाळगा आणि खेचून घ्या. कारण अशा व्यक्तीच ते ग्रहण करू शकतील आणि तरीही ईश्वराकडून अवतरित होणाऱ्या त्या शक्तींमुळे त्या विचलित होणार नाहीत.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 10-11)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…