मानसिक परिपूर्णत्व – ०६
इतर कोणा व्यक्तीला, कोणत्याही कल्पनेला, कोणत्याही गोष्टीला, तुम्ही तुमच्या आणि ईश्वराच्यामध्ये का येऊ देता? जेव्हा तुम्ही पूर्ण अभीप्सायुक्त असता, आनंदात असता तेव्हा इतर कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही; ईश्वर आणि तुमची अभीप्सा याव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीला महत्त्व देता कामा नये. जर एखाद्या व्यक्तीला ईश्वर त्वरेने, संपूर्णतः, समग्रतेने मिळावा असे वाटत असेल, तर त्या व्यक्तीचा दृष्टिकोन तसाच संपूर्ण, सर्वसमावेशक असावयास हवा. तोच त्याचा एकमेव उद्दिष्टबिंदू असावयास हवा आणि त्यामध्ये इतर कशाचीही, अगदी कशाचीही लुडबूड असता कामा नये.
ईश्वर कसा असावा, त्याने कसे वागावे, त्याने कसे वागता कामा नये, यासंबंधीच्या मानसिक कल्पनांना काहीही किंमत नाही, उलट त्या मानसिक कल्पना म्हणजे मार्गातील धोंडच ठरतात. एक ईश्वरच केवळ महत्त्वाचा आहे. जेव्हा तुमची चेतना ईश्वराला कवळून घेते, तेव्हाच खऱ्या अर्थाने ईश्वर काय आहे हे तुम्हाला समजते, त्या आधी नाही. कृष्ण हा कृष्ण आहे, त्यामुळे त्याने काय केले, काय केले नाही याला मग अशी व्यक्ती महत्त्व देत नाही तर ती व्यक्ती त्याला पाहाते, त्याला भेटते; त्याचा प्रकाश, त्याची उपस्थिती, त्याचे प्रेम, त्याचा आनंद हाच काय तो त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आध्यात्मिक अभीप्सेबाबतीत नेहमी हे असेच असते – हा आध्यात्मिक जीवनाचा कायदा आहे.
कोणत्याही मानसिक कल्पना किंवा प्राणिक चढउतार यांच्यावर वेळ वाया घालवू नका – ते ढग पळवून लावा. जी एकमेव आवश्यक गोष्ट आहे त्यावरच तुमचे लक्ष केंद्रित करा.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 55-56)
- श्रीमाताजी आणि समीपता – १२ - May 7, 2025
- श्रीमाताजी आणि समीपता – १० - April 29, 2025
- श्रीमाताजी आणि समीपता – ०९ - April 28, 2025