अज्ञानमूलक चुका सुधारणे म्हणजे अंधकार नाहीसा करण्यासारखे आहे, जणू तुम्ही दिवा लावता आणि अंधार नाहीसा होतो; पण एखादी गोष्ट चुकीची आहे असे माहीत असूनदेखील, तीच चूक पुन्हा करणे म्हणजे जणू कोणीतरी दिवा प्रज्ज्वलित केलेला असावा आणि तुम्ही तो हेतुपुरस्सर विझवून टाकावा!… हे असे करणे म्हणजे, अंधकाराला हेतुपुरस्सर परत बोलावण्यासारखेच आहे.

-श्रीमाताजी
(CWM 09 : 306)

एकत्व – ०८

 

भगवान बुद्ध त्यांच्या शिष्यांना सांगत असत की, जेव्हा जेव्हा तुम्ही एखादे स्पंदन वातावरणामध्ये सोडता, उदाहरणार्थ एखादी इच्छा, एखाद्या विशिष्ट गोष्टीविषयीची इच्छा, तेव्हा ती इच्छा एका व्यक्तिकडून दुसऱ्या व्यक्तिकडे, दुसऱ्या व्यक्तिकडून तिसऱ्या व्यक्तिकडे अशी जगभर संक्रमित होत जाते आणि नंतर ती फिरून परत तुमच्यापाशीच येते. आणि वातावरणात सोडलेली ती काही एकमेव अशी गोष्ट नसते, तर गोष्टींचे एक आख्खे विश्वच असते आणि पुन्हा असे की, तुम्ही या विश्वातील प्रक्षेपण करणारे एकमेव केंद्र नसता तर, प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रक्षेपणाचे एक केंद्र असते – तेव्हा हा एवढा गोंधळ असतो की, तुम्ही तुमची भूमिकाच तेथे गमावून बसता. परंतु ही सर्व स्पंदनं अगदी एकाच, अगदी एकसारख्या क्षेत्रातूनच संक्रमित होत असतात. केवळ त्या स्पंदनांचे एकमेकांवर धडकणे, त्यांची व्यामिश्रता, यामुळे काहीतरी वेगळे, स्वतंत्र असल्याची भावना तुम्हाला होते.

स्वतंत्र, अलग असे काहीच नसते. एकच एक मूलद्रव्य आहे, एकच शक्ती आहे, एकच चेतना आहे, एकच संकल्प आहे जो अगणित अशा व्यक्तिमत्त्वांमधून संचार करत असतो. हे इतके गुंतागुंतीचे आहे की, व्यक्तिला त्याची जाणच नसते, परंतु जर व्यक्ती थोडी मागे सरकेल आणि त्या विचारप्रवाहाचा मागोवा घेत जाईल, मग तो विचारप्रवाह कोणता का असेना, तेव्हा व्यक्तिच्या लक्षात येईल की, ही विचारस्पंदनेच स्वतः एकातून दुसरे या पद्धतीने फैलावत जातात. वस्तुतः प्रत्यक्षात तेथे एकमेव एकत्व असते – मूलद्रव्याचे एकत्व, चेतनेचे एकत्व, संकल्पाचे एकत्व. येथे एकच एक सत्यता आहे. बाह्यतः एक प्रकारचा आभास असतो. अलगपणाचा, वेगळेपणाचा आभास असतो.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 52-53)

वाईट कालावधीचा अंत करण्यासाठी, अस्वस्थ होणे किंवा अधीर होणे हे खचितच उपयोगी पडणार नाही. उलट, तुम्ही थोडी जरी आंतरिक स्थिरता राखू शकलात तर, तुम्ही तुमच्या अडचणींमधून अधिक त्वरेने बाहेर पडाल. केवळ स्थिर अवस्थेमध्येच व्यक्ती स्वतःच्या आंतरात्मिक चेतनेच्या संपर्कात येऊ शकते.

श्रीमाताजी
(CWM 17 : 92)

एकत्व – ०७

जर तुम्ही काळजीपूर्वक विश्लेषण केलेत तर, तुमच्या असे लक्षात येईल की, तुम्ही जे काही विचार करत असता, ते इतरांनी केलेले विचार असतात. त्यांचे ते विचार फिरत असतात आणि तुमच्या मधून जात असतात, परंतु ते विचार तुम्ही निर्माण केलेले नसतात, तुम्ही त्या विचारांचे निर्माणकर्ते नसता. तुमच्या सर्व प्रतिक्रिया या अनुवंशिकतेतून येतात, ज्यांनी तुम्हाला जन्म दिलेला असतो, ज्या परिसरात तुम्ही जीवन जगत असता, आजवर ज्या गोष्टी तुमच्या मनावर कोरल्या गेलेल्या असतात, त्यातून तुमची घडण झालेली असते. आणि तुम्हाला वाटत असते की, त्या साऱ्या गोष्टी म्हणजेच तुम्ही आहात. असे असूनसुद्धा ते विचार तुम्ही निर्माण केलेले नसतात, तर तुम्हाला ते जाणवलेले असतात, तुमच्या अनुभवास आलेले असतात. ते विचार जेव्हा तुमच्यामधून जात असतात, तेव्हा तुम्हाला त्यांची जाणीव होते, पण तुम्ही त्यांचे निर्माणकर्ते नसता, म्हणजे तुम्ही त्या विचारांना जन्म दिलेला नसतो.

उदाहरण द्यायचे झाले तर, असे म्हणता येईल की, ते विचार ध्वनींसारखे असतात. कोणत्याही प्रकारचे ध्वनी घ्या – शब्द, संगीत, कोणतेही ध्वनी – जे एका उपकरणाने ध्वनिमुद्रित केलेले असतात आणि ग्रामोफोनसारख्या दुसऱ्या एका उपकरणाच्या माध्यमातून ते परत वाजविण्यात आलेले असतात, त्याप्रमाणे हे असते. तुम्ही जो ध्वनी ऐकत आहात तो ग्रामोफोनने निर्माण केला आहे, असे तुम्ही म्हणाल का? नाही, असा विचारही तुमच्या मनाला शिवणार नाही. परंतु तुम्हाला तुमच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा भास होत असल्याने, तुमच्या मनाच्या माध्यमातून जे विचार दुसरीकडे जातात, ते विचार अभिव्यक्त होतात, तुमच्या प्राणिक अस्तित्वातून ज्या संवेदना जात असतात, त्यांना अभिव्यक्ती मिळते आणि तुम्हाला असे वाटते की, ते विचार, त्या संवेदना तुमच्याकडून आल्या आहेत, परंतु तुमच्याकडून काहीही येत नाही. निर्माण करण्यासाठी मुळात ‘तुम्ही’च असता कुठे ?

तुमच्या अस्तित्वातील सर्जक वास्तवेची तुम्हाला जाण येण्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचा जो शाश्वत गाभा आहे, तो शोधावयास हवा, त्यासाठी तुम्ही खूप आत, आत, अंतरंगात गेले पाहिजे.

आणि एकदा का तुम्हाला त्या शाश्वत गाभ्याचा शोध लागला की, तुम्हाला जाणीव होईल की, ती एकच एक अशी एकमेव सद्वस्तु आहे, इतर सर्वांमध्येही तीच सद्वस्तु आहे आणि मग असे असेल तर, तुमचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व शिल्लक रहातेच कोठे? काहीच शिल्लक रहात नाही.

हो, ती केवळ ध्वनिमुद्रण करणारी आणि पुन्हा ध्वनी वाजवणारी उपकरणे असतात आणि त्यामध्ये नेहमीच विकार निर्माण होत राहतात. काही विकार चांगल्यासाठी असतात, काही विकार वाईटासाठी असतात, मुळातील विचारांमध्ये फार मोठे बदल घडण्याचीही शक्यता असते. एका व्यक्तिमधून दुसऱ्यामध्ये ते विचार संक्रमित होत असताना, ते जसेच्या तसे संक्रमित होत नाहीत कारण आंतरिक रचनाच तशा असतात, ते उपकरण अतिशय जटिल असे असते.

परंतु ती एकच आणि समान अशी गोष्ट असते की, जी जागृत संकल्पाद्वारे संचालित होत असते, ती सर्व वैयक्तिक इच्छांपासून स्वतंत्र अशी असते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 51-52)

आपले समग्र अस्तित्वच जेव्हा ‘ईश्वरा’च्या प्रकाशाकडे आणि प्रभावाकडे वळते तसेच ते अस्तित्व हातचे काहीही राखून न ठेवता, सर्व काही त्या ‘ईश्वरा’वर सोपविते, तेव्हा त्याला खरे समर्पण आणि प्रामाणिकपणा म्हणतात.

– श्रीमाताजी
(Mother You Said So: 02.03.1956)

एकत्व – ०६

 

भांडणं न करतासुद्धा व्यक्ती जीवन जगू शकते. असे म्हणणे हे काहीसे विचित्र वाटेल कारण गोष्टी आज जशा आहेत, तशा पाहिल्या तर हे जीवन जणू काही भांडणतंट्यांनीच बनलेले असावे असे दिसते. म्हणजे असे की, जी माणसं एकत्र राहतात त्यांचा मुख्य उद्योग हा जणू भांडाभांडी करणे, मग ती उघडपणे असोत किंवा छुपी असोत, हाच असतो. आपण अगदी प्रत्येक वेळीच बाचाबाची करतो असे नाही, किंवा अगदी हमरीतुमरी वर येतो असेही नाही – सुदैवाने – पण आतून तुम्ही सतत एकसारख्या चिडचिडलेल्या अवस्थेमध्ये वावरत असता कारण, तुम्हाला स्वतःमध्ये जी परिपूर्णता आणावयाची इच्छा असते ती तुम्हाला तुमच्या आजूबाजूला सापडत नाही. वास्तविक ती गोष्ट प्रत्यक्षात उतरविणे तुम्हाला देखील अवघड असते – परंतु तुम्हाला मात्र असे वाटत असते की, ती इतरांनी प्रत्यक्षात आणलीच पाहिजे.

…प्रत्येक गोष्टीकडे हसतमुखाने पाहा. ज्या गोष्टींमुळे तुमची चिडचिड होते त्या गोष्टींकडे तुम्ही एक धडा या दृष्टीने पाहा. तसे कराल तर तुमचे जीवन हे अधिक शांतिपूर्ण आणि अधिक प्रभावीदेखील असेल. कारण जी परिपूर्णता तुम्ही स्वतः प्रत्यक्षात आणू इच्छित असता, ती तुम्हाला इतरांमध्ये दिसली नाही तर, तुमची जी चिडचिड होते त्यामध्ये निश्चितपणे तुमच्यामधील पुष्कळशी ऊर्जा तुम्ही गमावून बसता.

इतरांनी परिपूर्णता प्रत्यक्षात उतरवली पाहिजे या मुद्द्यापाशीच तुम्ही थांबता आणि जे उद्दिष्ट वास्तविक तुम्ही साध्य करून घेतले पाहिजे त्याविषयी तुम्ही क्वचितच जागरुक असता. जर तुम्ही त्याविषयी जागरुक झालात, म्हणजे, तुम्हाला जे नेमून देण्यात आले आहे ते कार्य करावयास तुम्ही सुरुवात केलीत तर, म्हणजे, तुमचे जे काही कर्तव्य आहे ते प्रत्यक्षात आणावयास सुरुवात केलीत तर, इतर काय करतात, याची चिंता करणे सोडून द्या. कारण, खरंतर ते तुमचे कामच नाही. आणि खऱ्याखुऱ्या योग्य दृष्टिकोनाचा मार्ग सांगावयाचा झाला तर तो हाच की, “जे कोणी माझ्या अवतीभोवती आहेत, जी कोणती परिस्थिती जीवनात माझ्या वाट्याला आली आहे, माझ्या जवळच्या असणाऱ्या ज्या कोणी व्यक्ती आहेत त्या म्हणजे, मी कोणती प्रगती करावयास हवी हे मला दाखवून देणारे जणू काही ईश्वरी चेतनेने माझ्यासमोर धरलेले आरसेच आहेत. इतरांच्या जर कोणत्या एखाद्या गोष्टीचा मला धक्का बसला तर, त्याचा अर्थ हाच की, मला ते कार्य माझ्या स्वतःमध्ये करणे आवश्यक आहे.”

आणि जर व्यक्ती स्वतःमध्ये अशी खरीखुरी परिपूर्णता बाळगेल तर व्यक्तिला तीच परिपूर्णता बऱ्याचदा इतरांमध्येही आढळून येईल.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 22-23)

विरोधी शक्ती माणसाच्या प्रामाणिकपणाची परीक्षा घेत असतात, आणि केवळ म्हणूनच या जगात त्यांना सहन केले जाते. ज्या दिवशी मनुष्य संपूर्णतः प्रामाणिक बनेल, त्या दिवशी त्या निघून जातील, कारण तेव्हा त्यांना येथे अस्तित्वात राहण्यासाठी कोणतेच कारण शिल्लक उरणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 21)

एकत्व – ०५

दुसऱ्या व्यक्तिच्या जाणिवेमध्ये काय चालू आहे, हे नेमकेपणाने जाणण्यासाठी तुम्ही कधीच त्या व्यक्तिच्या जाणिवेमध्ये शिरण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. तुमची जाणीव त्या व्यक्तिमध्ये प्रक्षेपित करावयाची नाही; कारण तसे केलेत तर, तुम्हाला त्या व्यक्तिमध्ये स्वतःचेच दर्शन होईल आणि ते काही स्वारस्यपूर्ण नाही – त्याऐवजी त्या व्यक्तिच्या आतमध्ये असणाऱ्या जाणिवेच्या संपर्कात प्रवेश करावयाचा, उदाहरणार्थ, जेव्हा तुम्हाला दुसऱ्या व्यक्तिच्या काही गोष्टी पटत नाहीत तेव्हा, तुम्ही अमुक एका गोष्टीकडे अमुक एका पद्धतीने पाहत असता, तर दुसरी व्यक्ती त्याच गोष्टीकडे दुसऱ्याच पद्धतीने पाहत असते. जर माणसं समंजस असतील तर ती भांडत बसत नाहीत. पण जेव्हा माणसं समंजस नसतात तेव्हा, ती भांडाभांडी करायला सुरुवात करतात. तेव्हा, भांडत बसण्यापेक्षा एक चांगली गोष्ट अशी करावयास हवी; ती म्हणजे, दुसऱ्याच्या जाणिवेमध्ये प्रवेश करावयाचा आणि स्वतःला विचारायचे की, तो अमुक अमुक गोष्टी अशा का करत आहे, त्याला असे म्हणायला किंवा करायला लावणारे कोण आहे ? त्याने असा दृष्टिकोन बाळगावा यासाठी, वस्तुमात्रांकडे पाहण्याची त्याची कोणती दृष्टी कारणीभूत आहे, त्या पाठीमागचे आंतरिक कारण काय असेल ? हे खूपच रोचक असते. जर तुम्ही असे कराल, तर तुमचे रागावणे ताबडतोब बंद होईल. पहिली गोष्ट अशी घडेल की, तुम्ही रागावूच शकणार नाही. तेव्हा हा एक फारच मोठा फायदा आहे. आणि दुसरे म्हणजे, जरी दुसऱ्याचे रागावणे चालूच राहिले तरी त्याचा तुमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. आणि नंतर मग, हळूहळू, व्यक्तिने दुसऱ्याशी स्वतः पूर्णतया एकत्व पावण्याचा व त्याद्वारा मग भेदाभेदाच्या, विरुपतेच्या स्पंदनांना रोखण्याचा आणि भांडणं थांबवायचा प्रयत्न करायचा. हे अतिशय उपयोगी ठरते.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 424-425)

मानसिक संकुचितपणा हा मनुष्यमात्रांमध्ये सर्वात जास्त फैलावलेला आजार आहे. स्वतःच्या जाणिवेमध्ये जे आहे तेवढेच मनुष्याला समजू शकते आणि त्याखेरीज अन्य काहीही त्याला सहन होत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 267)

एकत्व – ०४

 

जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीमधील एखादी गोष्ट अजिबात पटण्याजोगी नसते किंवा ती तुम्हाला अगदी हास्यास्पद वाटते – ‘तो तसा आहे, तो तसा वागतो, तो असे असे म्हणतो, तो अशा अशा गोष्टी करतो.’ – तेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाशी म्हटले पाहिजे, “बरं, ठीक आहे, पण कदाचित मी देखील माझ्या नकळतपणे तशाच गोष्टी करत असेन. टिका करण्यापूर्वी मी माझ्या स्वतःकडेच नीट लक्षपूर्वक पाहिले पाहिजे, की मी तीच गोष्ट किंचितशा वेगळ्या पद्धतीने तर करत नाहीये ना ? ह्याची खात्री करून घेतली पाहिजे.” प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीच्या वागण्याचा धक्का बसतो तेव्हा तेव्हा, असा विचार करण्यासाठी लागणारी चांगली जाणीव आणि बुद्धिमत्ता जर तुमच्यापाशी असेल; तर तुमच्या असे लक्षात येईल की, तुमच्यामध्ये ज्या ज्या अपूर्णता, दुर्बलता आहेत त्या तुम्हाला अगदी सहजतेने आणि अगदी स्पष्टपणे पाहता याव्यात यासाठी, जीवनामध्ये तुमचे इतरांशी असणारे संबंध हे जणू काही एखाद्या आरशाप्रमाणे तुमच्या समोर मांडण्यात येतात.

सर्वसाधारणपणे आणि अगदी निरपवादपणे सांगावयाचे झाले तर, तुम्हाला इतरांमधील जी गोष्ट खटकत असते, अगदी नेमकी तीच गोष्ट तुम्ही स्वतःमध्ये कमीअधिक झाकलेल्या स्वरूपात, कमीअधिक गुप्त स्वरूपात, कदाचित किंचितशा वेगळ्या वेषात बाळगत असता. ही तीच गोष्ट असते जिच्यामुळे तुमची फसगत होत असते. स्वतःमधील जी गोष्ट तुम्हाला फारशी त्रासदायक वाटत नसते तीच जेव्हा तुम्हाला दुसऱ्यामध्ये दिसते, तेव्हा ती एकदम भयंकर वाटू लागते.

ह्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी त्याची पुष्कळच मदत होईल. आणि त्यामुळे इतरांबरोबर असणाऱ्या तुमच्या नात्याबाबत तुमच्यामध्ये एक सूर्यवत् सहिष्णुता उदयाला येईल; समजूतदारपणातून येणारी सदिच्छा उदयाला येईल आणि त्यामधून मग बरेचदा, ह्या अगदी निरर्थक झगड्यांचा शेवट होईल.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 21-22)