सर्वसमावेशक नियम
संवादक : “कोणतेही नियम वा कायदे केले जाणार नाहीत. जसेजसे ऑरोविलचे गर्भित सत्य उदयास येत जाईल आणि ते हळूहळू आकार घेऊ लागेल, तसतशा गोष्टी नियमबद्ध होत जातील. आम्ही आधीपासूनच कशाचीही अटकळ बांधत नाही.”
श्रीमाताजी : मला असे म्हणायचे आहे की, सर्वसाधारणपणे – आत्तापर्यंत तरी आणि आता तर अधिकाधिकपणे – माणसं त्यांच्या त्यांच्या संकल्पनांनुसार, त्यांच्या त्यांच्या आदर्शानुसार, मानसिक नियम तयार करतात आणि ते जगावर लादतात. पण हे अगदी मिथ्या आहे, बेताल आहे, असत्य आहे – आणि त्याचा परिणाम असा होतो की गोष्टी बंड तरी करतात किंवा प्राणहीन होतात आणि नाहीशा होतात… जीवनानुभवच असे सांगतो की, नियम हे हळूहळू उलगडत गेले पाहिजेत आणि ते सतत प्रगतिशील राहू शकतील इतके लवचिक व शक्य तितके व्यापक असले पाहिजेत. काहीच ठरीव नसावे.
शासनकर्त्यांची ही मोठी चूक होते; ते एक चौकट तयार करतात आणि म्हणतात, “आम्ही असे असे नियम तयार केले आहेत आणि आता आपण त्यानुसार जगले पाहिजे.” आणि अशा रीतीने ते जीवनाचा चुराडा करतात आणि त्याला प्रगत होण्यापासून रोखतात. खरेतर नियम असे असावेत, जे शक्य तितके सर्वसमावेशक असतील की ज्यामुळे ते अतीव लवचिक आणि गरजांनुरुप बदलू शकतील आणि गरजा व सवयी जेवढ्या त्वरेने बदलतात तेवढ्याच त्वरेने ते नियम बदलू शकतील, अशा नियमांची हळूहळू बांधणी करत करत जीवनाने स्वत:च प्रकाश, ज्ञान, शक्ती या दिशेने प्रगत व्हावयास हवे.
(मौन)
बुद्धीच्या मानसिक शासनाची जागा आध्यात्मिकीकरण (Spiritualised) झालेल्या जाणिवेच्या शासनाने घेणे येथवर ही समस्या येऊन पोहोचते.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 267)
- स्वत:ला न फसविणे अवघड - March 16, 2026
- प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन - March 15, 2026
- द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४ - March 14, 2026





