आंतरिक कर्म
संवादक : “ऑरोविलमधील रहिवासी तेथील जीवनात आणि त्याच्या विकसनात सहभागी होतील.”
श्रीमाताजी : तेथील रहिवासी त्यांच्या त्यांच्या क्षमतांनुसार आणि त्यांच्याकडील साधनांनुसार, तेथील जीवनात आणि त्याच्या विकसनात सहभागी होतील. तो सहभाग यंत्रवत् नसावा तर जिवंत आणि खराखुरा असावयास हवा. तो प्रत्येकाच्या क्षमतेनुसार असेल : म्हणजे, ज्यांच्याकडे भौतिक साधने आहेत, उदा. ज्याच्याकडे कारखान्यात निर्माण होणारे उत्पादन असेल तो त्यातील काही हिस्सा उत्पादनाच्या प्रमाणात पुरवेल. दर माणशी, दरडोई असे येथे काही नसेल…..
संवादक : “सहभाग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असू शकतो”… म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे का, की जे ज्ञानी आहेत, जे आंतरिकरित्या काम करतात…
श्रीमाताजी : हो, तसेच आहे. ज्यांना उच्चतर असे आंतरिक ज्ञान प्राप्त झाले आहे त्यांनी प्रत्यक्ष हातांनीच काम करायला हवे असे नाही, असे मला म्हणावयाचे आहे.
संवादक : “तेथे कोणतेही कर नसतील, पण प्रत्येकाने सामूहिक हितासाठी कर्मरूपाने, वस्तुरूपाने किंवा द्रव्यरूपाने योगदान द्यावयास हवे.”
श्रीमाताजी : हो हे अगदी स्पष्ट आहे : तेथे कर नसतील. पण प्रत्येकाने सामूहिक हितासाठी त्याच्या त्याच्या कर्माद्वारे, किंवा द्रव्य वा वस्तुरुपाने योगदान देणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे केवळ पैसाच आहे, अन्य काही नाही; ते पैसाच देतील. पण खरे सांगावयाचे तर, येथे ‘कर्म’ म्हणजे आंतरिक कर्म अपेक्षित आहे. – पण तसे उघडपणे म्हणता येत नाही, कारण लोक पुरेसे प्रामाणिक नसतात. कर्म हे पूर्णपणे आंतरिक, गूढ स्वरूपाचे असू शकते, पण त्यासाठी ते पूर्णपणे प्रामाणिक आणि सचोटीचे असावयास हवे, तसे करण्याची क्षमता हवी, ढोंग नको.
खरेतर, भौतिकदृष्ट्या प्रत्येक मानवाचा अधिकार आहे… पण तो ‘हक्क’ नाही… व्यवस्थाच अशी असली पाहिजे की, ज्या व्यवस्थेमध्ये प्रत्येकाच्या भौतिक गरजांच्या पूर्तीची काळजी घेतली जाईल; ती पूर्तता हक्क आणि समतेच्या संकल्पनेनुसार नसेल, तर कमीतकमी गरजांवर आधारित असेल. आणि एकदा का अशा व्यवस्थेची घडी बसली की, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या – आर्थिक साधनांनुसार नव्हे – तर आंतरिक क्षमतांनुसार त्याचे त्याचे जीवन घडविण्याचे स्वातंत्र्य असेल.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 265-66)
- नैराश्यापासून सुटका – ३३ - October 22, 2025
- नैराश्यापासून सुटका – ३२ - October 21, 2025
- नैराश्यापासून सुटका – ३१ - October 20, 2025







