अगदी भौतिक वातावरणामध्येदेखील, या पृथ्वीच्या वातावरणामध्ये, असंख्य छोटेछोटे जीव असतात, जे तुम्हाला दिसत नाहीत, कारण तुमची दृष्टी ही खूपच मर्यादित असते, पण ते मात्र तुमच्या वातावरणात इतस्ततः फिरत असतात. त्यातील काहीकाही चांगलेसुद्धा असतात, इतर दुष्ट असतात. सामान्यतः प्राणिक अस्तित्वाच्या विघटनामधून हे छोटे छोटे जीव तयार होतात – त्यांची पैदास होत राहते – आणि त्यांचा एक असुखद असा पुंजकाच तयार होतो. त्यातील काही जण काही चांगल्या गोष्टीही करतात.

या छोट्याछोट्या क्षुद्र जीवांचे गट असतात आणि मग त्यांच्यात एकमेकांमध्ये झगडे होतात. कारण त्यांच्या त्यांच्यामध्ये सुद्धा ते शांततामय जीवन जगत नसतात, तर त्यांच्या परस्परांमध्ये मारामाऱ्या, लढाईझगडे, भांडणतंटे चालू असतात. ते एकमेकांना मारु पाहत असतात, विनाश घडवून आणू पहात असतात आणि हेच रोगजंतुंचे उगमस्थान असते. त्या शक्ती विघटनकारी असतात. आणि अशा त्या दुभंगलेल्या, छिन्नविछिन्न झालेल्या रूपातसुद्धा ते जिवंत राहतात आणि तेच सूक्ष्म जीवजंतु आणि रोगजंतुंचे मूळ असते. म्हणूनच बऱ्याचशा रोगजंतूंच्या मागे ही दुरिच्छा असते आणि त्यामुळे ते एवढे भयानक बनतात. आणि या रोगजंतुंचा दर्जा, त्यांच्या दुरिच्छेचे स्वरूप समजल्याशिवाय आणि त्यांच्यावर कार्य करण्याची क्षमता असल्याशिवाय, नव्याण्णव टक्के वेळा पूर्ण खात्रीशीर इलाज सापडणे शक्य नसते.

सूक्ष्म भौतिक विश्वात जिवंत असणाऱ्या अशा कोणत्यातरी गोष्टीचे एक अगदी जडभौतिक रूप म्हणजे हे रोगजंतू असतात. आणि ते तुमच्या अवतीभोवती वावरत असतात, तुमच्यामध्ये वावरत असतात, अनेक वर्षे ते तुम्हाला काहीही इजा पोहोचवीत नाहीत. नंतर कधीतरी अचानकपणे तुम्हाला ते आजारी पाडतात आणि इथेच दुसरे कारण महत्त्वाचे ठरते.

रोगजंतुंचे मूळ आणि त्यांना साहाय्य लाभते ते विसंवादामध्ये आणि विरोधी शक्तींविषयीची व्यक्तीची जी ग्रहणशीलता असते त्यामध्ये ! त्यासंबंधी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते.
(क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)

श्रीमाताजी