सद्यस्थितीमध्ये, मानवाचे जीवन हे बुद्धीने शासित केले जात आहे; मनाच्या सर्व कृती, हालचाली त्याला नेहमीच्या उपयोगाच्या अशा आहेत; निरीक्षण व अनुमान ही त्याच्या ज्ञानाची साधने आहेत; तो त्याच्या तर्कबुद्धीच्या आधारे जीवनातील निर्णय घेतो, मार्गाची निवड करतो. किंवा तो तर्कबुद्धीच्या आधारे तो तसे करतो, अशी त्याची समजूत असते.
परन्तु नवीन वंश हा मात्र अंतर्ज्ञानाने, म्हणजेच आंतरिक दिव्य कायद्याच्या थेट बोधाने शासित होईल. ही अंतर्ज्ञानशक्ती काही माणसांना खरंतर माहीत असते, आणि तिचा त्यांनी अनुभवदेखील घेतलेला असतो. ज्याप्रमाणे, मानवाच्या उदयापूर्वी जंगलातील काही ठरावीक अशा मोठ्या गोरिलांना निश्चितपणे तर्कबुद्धीची झलक दिसलेली होती, त्याप्रमाणे काही माणसांना ही अंतर्ज्ञानशक्ती माहीत असते, आणि तिचा त्यांनी अनुभवदेखील घेतलेला असतो. ज्यांनी आपला अंतरात्मा विकसित केलेला आहे, ज्यांनी आपल्या अस्तित्वाचा खरा कायदा काय, ह्याच्या शोधासाठी आपल्या ऊर्जा एकवटलेल्या आहेत, मानववंशातील अशा अगदी काही मोजक्याच व्यक्तींमध्ये अंतर्ज्ञानाची कमीअधिक शक्ती आढळते.
जेव्हा मन पूर्णपणे शांत असते, एखाद्या घासूनपुसून चकचकीत केलेल्या आरशाप्रमाणे स्वच्छ असते, वाराविरहित दिवशी असलेल्या निस्तरंग तळ्याप्रमाणे जेव्हा मन निस्तरंग असते तेव्हा, ज्याप्रमाणे, त्या पाण्यामध्ये वरून चांदण्यांचा प्रकाश पडतो, त्याप्रमाणे अतिमानवाचा, आंतरिक सत्याचा प्रकाश निश्चल मनाला उजळवून टाकतो आणि त्यातून अंतर्ज्ञानाचा उदय होतो. शांतीमधून येणारा हा आवाज ऐकण्याची ज्यांना सवय आहे, अशा व्यक्ती त्याकडे आपल्या कृतींचा प्रेरक प्रारंभ म्हणून पाहतात. जेव्हा इतर सर्वसामान्य माणसं बुद्धीच्या जटिल मार्गांवरून इतस्ततः भटकत राहतात, तेव्हा अशा व्यक्ती मात्र अंतर्ज्ञानाच्या साहाय्याने, या सरस उपजतप्रेरणेच्या साहाय्याने, जीवनाच्या वळणावळणाच्या मार्गावरून सरळ पुढे जातात; जणूकाही त्यांना सामर्थ्यवान आणि अमोघ अशा हातांकडून मार्गदर्शन मिळत असावे.
ही जी आत्ता अपवादात्मक आणि असामान्य वाटणारी अशी क्षमता आहे, ती उद्याच्या मानवासाठी, येणाऱ्या नवीन प्रजातीसाठी, नूतन वंशासाठी अगदी सर्वसामान्य आणि स्वाभाविक असेल. पण कदाचित त्याचा सातत्यपूर्ण वापर हा बौद्धिक क्षमतांना बाधक ठरू शकेल. ज्याप्रमाणे माकडाकडे असलेल्या आत्यंतिक शारीरिक क्षमता ह्या माणसांमध्ये आढळत नाहीत, त्याचप्रमाणे मानवाकडे असलेली आत्यंतिक मानसिक क्षमता, अतिमानवाने गमावलेली असेल.
आजवर मानवाने जे काही विकसित केले आहे, – अगदी त्यामध्ये, जिच्या बद्दल त्याला सार्थ आणि तरीही उगीचच अभिमान असतो अशी बुद्धीदेखील आली; – ते सारे आता त्याला पुरेसे वाटत नाही, असे जाहीर करण्याचे धाडस जेव्हा मानव करेल आणि त्याच्या अंतरंगांत असलेल्या महत्तर शक्ती खुल्या करणे, त्यांचे अनावरण करणे, त्या बाहेर काढणे, हाच जेव्हा त्याचा मोठ्यातला मोठा उद्यम होईल, तेव्हा मानवाचा अतिमानत्वाकडे जाणारा मार्ग खुला होईल.
– श्रीमाताजी
(CWM 02 : 163-64)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…