ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

मानवामध्ये उपजतच आध्यात्मिक आस असते; कारण पशुंमध्ये नसणारी अपूर्णतेची आणि मर्यादांची जाणीव त्याच्यामध्ये असते आणि तो आज जे काही आहे त्याच्या पलीकडे प्राप्त करण्याजोगे काहीतरी आहे, हे ही त्याला जाणवत असते. स्वत:च्या पलीकडे जाण्याची ही उर्मी मानववंशामधून पूर्णपणे कधीही नाहीशी होत नाही.

जडामधून, विकसित अशा विचारी मनाचा उदय होण्याची आजवर झालेली वाटचाल ही आत्मभान असणाऱ्या अभीप्सेमुळे, हेतुपूर्वक, संकल्पपूर्वक किंवा जिवंत व्यक्तीच्या धडपडीतून घडून आलेली नसून, ती अर्धजागृतपणे किंवा नकळतपणे, प्रकृतीच्या यांत्रिक कार्याचा भाग म्हणून घडून आली आहे.

हे असे घडले कारण, अचेतनेपासून उत्क्रांतीला सुरुवात झाली आणि त्या अचेतनेपासून गुप्त चेतना अजूनपर्यंत पुरेशी उदयास आली नव्हती. जिवंत प्राणिमात्राची आत्म-जागृत वैयक्तिक इच्छेचा सहभाग होऊन, त्या माध्यमातून काही कार्य घडून यावे इतपत ती उदयास आली नव्हती. परंतु मानवामध्ये मात्र आवश्यक तो बदल घडून आलेला आहे – मानव जागृत झाला आहे आणि त्याला स्वत:विषयीची जाणीव निर्माण झालेली आहे. ज्यायोगे इच्छाशक्ती विकसित होईल, ज्ञान वृद्धिंगत होईल व आंतरिक अस्तित्व अधिक सखोल होईल, बाह्य अस्तित्व अधिक व्यापक होईल, प्रकृतीच्या क्षमता वाढीस लागतील अशा प्रकारच्या शक्ती मनामध्ये आविष्कृत करण्यात आल्या आहेत.

आपल्यापेक्षा अधिक उच्च अशी जाणिवेची एक अवस्था आहे हे मानवाला दिसले आहे. त्याच्या मनामध्ये, त्याच्या प्राणामध्ये उत्क्रांतीची प्रेरणा वसलेली आहे, स्वत:ला ओलांडून पलीकडे जाण्याची आस त्याच्यामध्ये वसली आहे. त्याला त्याच्या आत्म्याची जाणीव झाली आहे, त्याला स्व आणि चेतनेचा शोध लागला आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 21 : 875-76)

*

जर तुम्ही जागरूक अभीप्सेच्या स्थितीमध्ये असाल आणि अगदी प्रामाणिक असाल तर, तुमच्या सभोवताली असणाऱ्या साऱ्या गोष्टी या तुमच्या अभीप्सेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे साहाय्यक होतील, अशा रीतीनेच रचल्या जातील. एकतर त्या तुमची प्रगती व्हावी म्हणून, एखाद्या नवीनच गोष्टीशी तुमचा संपर्क साधून देतील किंवा जी गोष्ट नाहीशी होणे गरजेचे होते अशी तुमच्या प्रकृतीमधील एखादी गोष्ट काढून टाकतील. ही काहीतरी लक्षणीय गोष्ट आहे.

जर तुम्ही खरोखर अभीप्सेच्या उत्कट स्थितीमध्ये असाल, तर अशी कोणतीच परिस्थिती नसते की, जी तुमची अभीप्सा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मदत करत नाही. प्रत्येक गोष्ट, अगदी प्रत्येक गोष्ट जणु काही एका अतिशय परिपूर्ण व निपुण चेतनेने तुमच्याभोवती गुंफली जाते. आणि तुमच्या बहिर्वर्ती चेतनेला कदाचित ते जाणवणारही नाही आणि परिस्थिती जे रूप धारण करून तुमच्या समोर उभी ठाकते ती पाहून, तुम्ही कदाचित तिला विरोध करता, तक्रार करता, ती बदलविण्याचा प्रयत्न करता; परंतु काही काळाने, जेव्हा तुम्ही काहीसे अधिक प्रगल्भ होता आणि तुम्ही व ती घटना यांमध्ये काहीसे अंतर निर्माण होते, तेव्हा तुम्हाला कळून चुकते की, तुम्हाला आवश्यक असणारी प्रगती घडविण्यासाठी ती परिस्थिती अगदी तशीच असणे भाग होते.

तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की, एक संकल्प, परम सद्भाव हाच तुमच्या सभोवार साऱ्या गोष्टींची रचना करत आहे आणि तुम्ही अगदी कितीही तक्रार केलीत, ती स्वीकारण्याऐवजी त्याचा विरोध करत राहिलात तरीही, अगदी त्याच घडीला तो सद्भाव सर्वाधिक परिणामकारक रीतीने कार्य करत असतो.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 176)

अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…

8 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा‌ या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…

1 day ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…

5 days ago